- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोथरुडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मंत्री तथा आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निवेदन
मुंबई – कोथरुड विधानसभा मतदारसंघातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मिसिंग लिंक संदर्भात सविस्तर चर्चा करून आवश्यक निधी देण्यासंदर्भात आज निवेदन दिले.मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, पुणे शहरातील कोथरुड मतदारसंघात एका बाजूने मुंबई-हिंजवडी मार्गे आणि दुसऱ्या बाजुने सातारा मार्गे येणारी अवजड वाहनांसह प्रचंड वाहतूक आणि मुंबईकडून पुण्याच्या पुढे जाणारे प्रवासी आणि साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने प्रवास करणारे प्रवासी नागरिकांना सतत वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना नाईला जास्तव मुंबई-सातारा मार्गावरील सध्याच्या पुणे बायपास मार्गावरुन जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. ही गंभीर समस्या वेळेत सोडविणे आवश्यक असल्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन निदर्शनास आणून दिले.नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कालबद्ध नियोजन करून यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असे सांगून या विकासकामाला अधिक गती देण्यासाठी रोड टीडीआर (ट्रान्स्फर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स) निर्माण करणे बंधनकारक करण्यात येईल.तसेच जे विकासक रोड टीडीआर घेण्यास इच्छुक असतील, त्यांना दोन टक्के अतिरिक्त प्रोत्साहन देण्यात येईल असे सांगून यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले. पुणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील ३३ प्रमुख रस्त्यांपैकी १५ प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी ‘मिशन १५’ हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी एकूण ८७० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, कोथरुड मतदारसंघातील रस्ते विकासासाठी ३२५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यापैकी १५० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून अपेक्षित आहे.पुणे शहराचा वेगाने होत असलेला विस्तार लक्षात घेता, येथील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. त्यामुळे रस्ते सुधारणा, पुलांचे बांधकाम आणि वाहतूक व्यवस्थापनासंदर्भात ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. याकरिता राज्य सरकार आणि पुणे महापालिकेच्या संयुक्त प्रयत्नांतून तांत्रिक व प्रशासकीय अडथळे दूर करून विकासकामांना गती देऊन पुणेकरांच्या सोयीसाठी हे काम प्राधान्याने पूर्ण केले जाईल, असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले.