श्री देवदेवेश्वर संस्थान तर्फे शरदशास्त्री जोशी आणि स्वानंद पुंड यांना श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक ,अध्यात्मिक आणि सामाजिक पुरस्कार प्रदान
पुणे: भारतीय ज्ञान साधना आणि भारतीय संस्कृती ही अत्यंत साधेपणाने असणारी आहे. आजच्या काळामध्ये हा सात्विक आविष्कार कमी होत चालला आहे. ही भारताची संस्कृती आणि ज्ञानसाधना धार्मिक संस्थानी पुढे न्यायला हवी. लोक हे वरवरच्या गोष्टीना भुलतात आणि खरेपणापासून लांब राहतात. ही समाजातील दरी आहे आणि ही दरी कमी करण्याचे काम धार्मिक संस्थांनी केले पाहिजे, असे मत प. पू. भागवताचार्य शरदशास्त्री जोशी यांनी व्यक्त केले.
श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत सारसबाग मंदिरातील श्री सिद्धिविनायक देवतेच्या वार्षिक महोत्सवात श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक ,अध्यात्मिक आणि सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदाचा पुरस्कार प. पू. भागवताचार्य शरदशास्त्री जोशी (पुणे) आणि प्रा.स्वानंद पुंड (वणी) यांना डॉ. कल्याणीताई नामजोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागव , विश्वस्त सुधीर पंडित, पुष्कर पेशवा, जगन्नाथ लडकत, आशिष कुलकर्णी उपस्थित होते. रोख रक्कम, सन्मानपत्र, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. कल्याणीताई नामजोशी म्हणाल्या, महाराष्ट्रामध्ये पुष्कळ कर्मयोगी आहेत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये यज्ञांची सत्रे केली आहेत आणि त्यांचा कर्ममार्ग उजळला आहे. आताचा योग वेगळा आहे, पूर्वीचा योग अंतकरणात ठेवा. कुंभच्या निमित्ताने योगींचे दर्शन होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रा.स्वानंद पुंड म्हणाले, पुराणकथांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असायला पाहिजे. त्या समजून घेण्याच्या कथा आहेत. अनंत कोटी ब्रह्मंडात जे काही आहे ते आपल्यात आहे. त्यामळे या कथा आपल्यामध्ये पहायच्या आहेत. आपल्या ऋषीमुनींना काही पहायचे असेल तर ते डोळे मिटतात आणि अंतर्मुख होतात. अष्ट विकारांवर मात करणारे अष्ट विनायक आपल्यातच आहेत. विकारांनीच आपण तयार झालेले असतो, त्यामुळे विकार सुटत नाहीत, परंतु ते नियंत्रित आणि सुनियोजित करता येतात. रमेश भागवत यांनी प्रास्ताविक केले. सुधीर पंडित यांनी आभार मानले. अदिती अत्रे यांनी सूत्रसंचालन केले.

