श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत सारसबाग मंदिराच्या सिद्धिविनायक देवतेच्या वार्षिक महोत्सवात डिजिटल व सायबर क्राईम ‘या विषयावर व्याख्यान
पुणे : मुलांच्या लैंगिक अत्याचाराचे आणि महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. समाज माध्यमातून होणारे चॅट, गेमिंग साईटस मुळे असे गुन्हे घडताना दिसतात. या गुन्ह्यांची नोंद खूप कमी प्रमाणात होते. ज्येष्ठ नागरीक देखील याला बळी पडताना दिसून येतात. समाजाने पीडिताला दोष देणे यामुळे ९२ टक्के महिला याबद्दल बोलत नाहीत. याबद्दल आपण विचार करण्याची गरज आहे. असे मत अॅड. वैशाली भागवत यांनी व्यक्त केले.
श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत सारसबाग मंदिरातील श्री सिद्धिविनायक देवतेच्या वार्षिक महोत्सवात आयोजित ‘ डिजिटल व सायबर क्राईम ‘या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. यावेळी श्री देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत, संस्थानचे विश्वस्त सुधीर पंडित, पुष्कर पेशवा, जगन्नाथ लडकत, आशिष कुलकर्णी उपस्थित होते.
अॅड. वैशाली भागवत म्हणाल्या, बाहेरच्या देशातील लोकांना समाजमाध्यमाच्या माध्यमातून आपल्या मुलांपर्यंत पोहोचणे सोपे आहे. भारतासारख्या देशात सेक्शुअल टुरीझम होते. बाहेरच्या देशातील लोकांना समाजमाध्यमाच्या माध्यमातून आपल्या मुलांपर्यंत पोहोचणे सोपे आहे. पालकांनी मुलांच्या बाबत सजग असणे गरजेचे आहे.
त्या पुढे म्हणाल्या, आधार कार्डवर अतिशय संवेदनशील माहिती असते. त्यामुळे सहजरित्या आपले आधार कार्ड कोणालाही देऊ नका. आधारवरील माहिती चुकीच्या हातात पडली तर आपणच जबाबदार आहोत.
काही गुन्ह्यामध्ये अवैध मार्गाने पैसा बाहेर जातो, अशावेळी पैसे परत मिळण्याची शक्यता कमी असते. अशावेळी गुन्ह्याची नोंद करायची नाही असे करु नका. ही आंतरराष्ट्रीय संघटीत गुन्हेगारी असते, त्याची पोलिसात नोंद करणे आवश्यक आहे.
रमेश भागवत म्हणाले, जे तंत्रज्ञान आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त वाटते, ज्याच्या माध्यमातून आपण सहज कितीतरी गोष्टी करतो, ते तंत्रज्ञान तितकेच घातक आहे. त्यामुळे जबाबदारीने सतर्क होऊन तंत्रज्ञान वापरले पाहिजे. अशक्य वाटले तरी योग्य काळजी घ्यायला हवी, नाहीतर त्याची किंमत मोजावी लागते. सायबर गुन्हे आणि कायद्याविषयी प्रबोधन होण्यासाठी संस्थानच्या वतीने येत्या काळात या विषयावरील व्याख्याने आयोजित करु, असेही त्यांनी सांगितले.