पुणे : विद्यार्थी सहाय्यक समितीचे संस्थापक व प्रसिद्ध गणितज्ञ डॉ. अच्युतराव आपटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. आर्थिक दुर्बल घटक वर्गातून कष्ट करीत शिक्षणाची कास धरणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका योजनेसह कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकृष्ट्या स्वावलंबी करण्याचा संकल्प डॉ. आपटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त करण्यात आल्याचे ते म्हणाले. यंदापासून समितीच्या कार्याचा विस्तार करण्याचा आमचा मानस आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नगरमध्ये जून महिन्यापासून समितीची शाखा उघडण्यात येणार आहे. समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर पाटील, विश्वस्त तुषार रंजनकर, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, माजी विद्यार्थी राजू इंगळे आदी उपस्थित होते.
प्रतापराव पवार म्हणाले, “ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेता यावे, यासाठी त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने डॉ. आपटे यांनी विद्यार्थी सहायक समितीची 1955 मध्ये स्थापना केली. तीन विद्यार्थ्यांपासून सुरवात केल्यावर आता समितीचे कार्य विस्तारले असून, शहरात पाच वसतिगृहांत सुमारे 775 विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहे. आपटे यांचे जन्मशताब्दी वर्ष 8 नोव्हेंबर रोजी सुरू झाले आहे. समितीच्या माध्यमातून केवळ वसतिगृह चालविले जात नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून स्वावलंबनाचे धडे देत चारित्र्यवान पिढी निर्माण करण्यात येते. समितीची वसतिगृहे म्हणजे परिवर्तनाची आणि व्यक्तिमत्व विकासाची केंद्रे आहेत. नवीन वसतिगृहासह कौशल्य विकास प्रशिक्षण, कार्यशाळा, अभ्यासिका, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहेत,” असे पवार यांनी नमूद केले.
तुकाराम गायकवाड म्हणाले, “संस्थेत सध्या विदर्भ-मराठवाड्यातील सुमारे 450 विद्यार्थी असून, सुमारे 30 विद्यार्थी दिव्यांग आहेत. तसेच लेह-लडाख, अरुणाचल प्रदेश येथील गरजू विद्यार्थ्यांनाही संस्थेने संधी दिली आहे. संस्थेत विद्यार्थी- विद्यार्थिनी, जात-धर्म असा भेदभाव केला जात नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला कमवा- शिका योजनेतून स्वावलंबनाची शिकवणही दिली जाते. संस्थेचे माजी विद्यार्थीही समितीच्या कामात सक्रिय आहेत. कार्यकर्ते आणि माजी विद्यार्थी कोणतेही मानधन न घेता ते संस्थेचे कामकाज चालवतात.”
“संस्थेत दाखल मुलाला निवास, आहार आणि सर्व प्रकारची शैक्षणिक मदत केली जाते. एका विद्यार्थ्यामागे वर्षासाठी सुमारे 45 हजार रुपये खर्च येतो. त्यातील 22 हजार रुपये विद्यार्थ्याने करायचा आहे, तर उर्वरित 23 हजार रुपये संस्था देणगीदारांच्या माध्यमातून उभारते. येथील सर्व कामात विद्यार्थी सहभाग घेत असून, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी व्यायाम, योगासने, तज्ज्ञ मार्गदर्शन, आरोग्य शिबिर आदी उपक्रम सुरु असतात. सध्या एका विद्यार्थ्यामागे वर्षाला २२ हजार रुपयांची तूट सहन करावी लागते. त्यामुळे समाजातील दानशूरांनी अर्थसहाय्य करावे,” असे आवाहन प्रभाकर पाटील यांनी केले.