पुणे, दिः २६ ऑगस्ट: “देशातील प्रत्येक नागरिक जो पर्यंत आपला इतिहास आणि सनातन ओळख जोपासणार नाही तो पर्यंत वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर निघू शकणार नाही. त्याच प्रमाणे नव्या पिढीला शिक्षणाच्या माध्यमातूनच या विचारधारेतून बाहेर काढू शकू.” असे मत माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) तर्फे ‘वसाहतवादी मानसिकता बदलणे’(Overcoming the Colonial Mindset) या विषयावर आयोजित पहिल्या राष्ट्रीय एक दिवसीय ऑनलाईन चर्चा सत्रात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या प्रसंगी प्रसिद्ध वकील डॉ. ललीत भसीन, माजी मुख्य निवडणूक आयुक्त पद्मभूषण एन. गोपालस्वामी, प्रसिद्ध महिला समाजसेविका अॅड. ऋत्तुपर्णा मोहंतो, आरटीआय कार्यकर्ता विवेक वेलणकर, राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा डॉ. पोर्णिमा आडवाणी, खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकुर, शारदा ज्ञान प्रतिष्ठानचे संस्थापक पं.वसंतराव गाडगीळ आणि युवक क्रांतीदलाचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तऋषी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते.
तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. एन.टी.राव, मिटसॉगच्या सहयोगी संचालिका डॉ. शैलश्री हरिदास हे उपस्थित होते.
डॉ. सुब्रमण्यम स्वामी म्हणाले,“इंग्रजांनी वसाहतीच्या मानसिकतेने आपल्यात विभाजन करण्याचा कठोर प्रयत्न केला. त्यांनी आपली शिक्षण पद्धती व मातृभाषेतील शिक्षणावर लक्ष केंद्रीत करून ते संपूर्ण मुळा सहित संपविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या देशात आज ही ब्रिटिश शिक्षण पद्धती सुरू असून आम्ही त्याच विचारधारेत आहोत. हे सर्व थांबवायचे असेल तर उच्चप्रतिचे शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे. याचा परिणाम म्हणजे भविष्यात इंडिया हा शब्द जावून हिंदूस्थान हे नाव प्रचलित होईल.”
प्रा.डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले,“भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञान समजून घेण्याची गरज आहे. ब्रिटिशांना हवे तशी शिक्षण पद्धत लागू केल्यानंतर ही आमच्या देशाची स्थिती बदलली. मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धतीच्या विचारधारेचे बीज पेरणे गरजेचे आहे. स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्यानुसार २१ व्या शतकात भारत हा विश्वगुरू बनेल आणि त्याच दिशेने आमची वाटचाल सुरू आहे.”
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या,“लॉर्ड मेकॉलेने भारतीय पारंपरिक शिक्षण व्यवस्था उध्वस्त करत ब्रिटिशांची शिक्षण प्रणाली देशावर लादली. यातून देशवासीयांवर गुलामीची मानसिकता लादली गेली. शिक्षण हे एकमेव माध्यम असून त्याद्वारे लोकांमध्ये मोठे बदल घडविता येतात. भारतवासी एक झाले तर या देशावर कोणीही राज्य करू शकणार नाही. आपल्या पिढीला सुधारण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ही संकल्पना शैक्षणिक उपक्रमात कशी जोडता येईल यावर कार्य सुरू आहे. ब्रिटिशांच्या विचारधारेला कुठे तरी छेद देण्याचे कार्य आधुनिक काळात होणे गरजेचे आहे. देशात ज्या पद्धतीने बॉम्बे या शहराला मुंबई असे नाव दिले गेले आहे, तश्याच गोष्टींची विचारधारा आता कालानुरूप गरजेची आहे. भविष्यात हीच विचारधारा एक मोठी चळवळ होईल.”
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले,“या देशात जेव्हा समता आणि बंधुत्व वाढेल तेव्हाच हा देश बनेल. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी भूतकाळात न जाता भविष्यकाळाचा विचार करावा. या देशात स्त्री पुरूष समानता असावी. देशात धर्माचा आधार घेतला तर हा देश तालिबान बनण्यास वेळ लागणार नाही. आता जाती भेद व धर्म भेद हद्दपार करण्याची वेळ आली आहे.”
ऋतूपर्णा मोहंतो म्हणाल्या,“या देशातील प्रत्येकाची विचारधारा बदलण्यासाठी शिक्षण हा एकमात्र पर्याय आहे. तसेच, या देशाचे नेतृत्व करणार्या व्यक्तीच्या दृढ इच्छाच्या आधारे जनतेला प्रोत्साहित केले जावू शकते. भारताला भारत बनविण्याचा विचार प्रत्येकाच्या मनात रूजावा. भारताने सदैव विश्व शांतीवर भर दिला आहे आणि हीच विचारधारा सर्वांची मानसिकता बदलेल.”
तसेच डॉ. पोर्णिमा आडवाणी, पं.वसंतराव गाडगीळ आणि विवेक वेलणकर यांनी वसाहतवादी मानसिकता बदलण्यासाठी युवकांना नवा विचार दयावा आणि हे शिक्षणाच्या माध्यमातून होईल.
प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनुराधा पराशर यांनी आभार माानले.
भारतीय शिक्षण पध्दती वसाहतवादी मानसिकता बदलेल- डॉ. सुब्रमण्यम स्वामी
Date:

