राज्यसभेचे माजी खासदार बसवराज पाटील यांचे प्रतिपादन ; भारत विकास संगम व महा एनजीओ फेडरेशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय राष्ट्र सेवा मंथन २०२१ चा समारोप
पुणे : जगात किंवा देशात भूकंपासारखी नैसर्गिक किंवा सामुहिक रोगासारखी संकटे येतात. त्यावेळी परिस्थितीनुसार सरकार समाजाला मदत करण्याचे काम करते. त्यामुळे सरकार आणि समाज यांच्या संकटकाळातील कार्याचे एकत्रित मूल्यांकन होणे गरजेचे आहे. याकाळात चांगले काम होते, ते समाजाकडूनच होते. सरकार सुविधा पुरविण्याचे काम करीत असते. त्यामुळे अशा संकटकाळात समाजाचा खरा वाटा असतो, असे मत राज्यसभेचे माजी खासदार बसवराज पाटील यांनी व्यक्त केले.
भारत विकास संगम व महा एनजीओ फेडरेशन यांच्यावतीने राष्ट्रसेवा मंथन २०२१ या विशेष राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्ह्यातील मरकळ येथील आर्ट आॅफ लिव्हिंगच्या त्रिवेणी आश्रमात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बसवराज पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य संयोजक व महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
बसवराज पाटील म्हणाले, देशात चांगले काम करणारे अनेकजण आहेत. मात्र, त्यांना त्यांच्या कामात गती आणण्याकरीता नव्या कल्पना व दिशा मिळत नाही. सामाजिक काम करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे राष्ट्र सेवा मंथनातून यांसारख्या अडचणींवर मात करीत कामाची दिशा मिळते. विचारांची देवाणघेवाण होऊन देशाचा आणि समाजाचा विकास करण्याची उर्जा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य संयोजक शेखर मुंदडा म्हणाले, देशासाठी आयुष्य अर्पित केलेले १६ ते १७ मान्यवर या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्याकरीता सहभागी झाले होते. देशाची प्रगती ही प्राकृतिक पद्धतीने व्हावी, यावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. शेती, गाईचे महत्व, आयुर्वेद, कर्करोगावरील आयुर्वेदिक उपचार असे अनेक विषय चर्चेला होते. माझा देश माझी जबाबदारी या नात्याने देशासाठी काय काम करता येईल, ही विचार उपस्थितांना मांडला. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील २ एनजीओना बोलावण्यात आले होते. देश घडविण्यात एनजीओ चे योगदान मोठे आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह आता देशभरात महा एनजीओ फेडरेशन उपक्रम होती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प.पू. श्री श्री रविशंकर, भारत विकास संगमचे संस्थापक के.एन. गोविंदाचार्य, संजय पटेल, शिवगंगा प्रकल्प झाबुवाचे पद्मश्री महेश शर्मा, राष्ट्रीय संयोजक वाय. माधव रेड्डी, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, आर्ट आॅफ लिव्हिंगचे चंद्रकांत राठी, लक्ष्मणसिंग लोपोडीया, डॉ. अशोक ठाकूर, उमाशंकर पांडे, गोपाल सुतारिया, संतोष फड, रवींद्र धारिया, प्रमोद देशमुख, प्रमोद कुलकर्णी, माधव देशपांडे, मनीष कटके, डॉ. आराधना कटके, डॉ. अनिता तिवळे, महादेव गोमारे आदींनी मार्गदर्शन केले. शेखर मुंदडा यांच्यासह अशोक टांकसाळे, विलास देशपांडे, विजय वरुडकर, गणेश बाकले, मुकुंद शिंदे, अमोल उंबरजे, राहुल पाटील, शशांक ओंभासे, ह.भ.प.अक्षय महाराज भोसले आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.

