पाकिस्तानात रविवारी मोठा राजकीय घटनाक्रम घडला. विरोधी पक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वातील सरकार विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव नॅश्नल असेंब्लीच्या उपसभापतींनी फेटाळून लावला. यासाठी त्यांनी परदेशांनी रचलेले कथित कट कारस्थान व राज्यघटनेतील कलम 5 चा दाखला दिला. त्यानंतर संसदेचे कामकाज तत्काळ तहकूब करण्यात आले. या घटनाक्रमानंतर इम्रान यांनी देशाला केलेल्या एका संक्षिप्त संबोधनात संसद भंग करण्याची घोषणा केली. यासंबंधीचा एक प्रस्ताव त्यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याकडे पाठवला. राष्ट्रपतींनीही तो लागलीच मंजूर केला. त्यामुळे पाकिस्तानात 90 दिवसांच्या आत सार्वत्रिक निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.दरम्यान पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल असेंब्लीच्या विसर्जनाची स्वतःहून दखल घेतलीअसल्याचे वृत्त आहे .
लष्कराची कोणतीही भूमिका नाही,
“अजिबात नाही. आज जे काही घडले, त्यात लष्कराची कोणतीही भूमिका नाही,” असे आंतर-सेवा जनसंपर्क महासंचालक बाबर इफ्तिखार यांनी आज दुपारी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्ली विसर्जित करण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
विरोधकांनी रचले होते कट कारस्थान
इम्रान यांनी आपल्या भाषणात विरोधकांनी परदेशी सरकारच्या मदतीने आपले सरकार पाडण्याचा कट रचल्याचा आरोप केला. ‘विरोधकांनी दुसऱ्या देशांच्या मदतीने आमचे सरकार उलथावून टाकण्याचा कट रचला होता. पण, सभापतींनी तो हाणून पाडला. आता सरकार जनतेच्या दरबारात जाऊन न्याय मागेल. जनतेने निवडणुकांची तयारी करावी,’ असे ते म्हणालेत. ‘सभापतींनी विरोधकांचा अविश्वास फेटाळला. याबद्दल देशाला देशाला शुभेच्छा. काल सर्वजण हैराण झाले होते. पुढे काय होईल असा प्रश्न मला विचारत होते. कुणीही घाबरू नये, असे मी त्यांना सांगेन. आज सभापतींनी आपल्या घटनात्मक अधिकारांतर्गत निर्णय घेतला. त्यानंतर मी राष्ट्रपतींना संसद भंग करण्याची शिफारस केली. विरोधकांनी संपूर्ण समाजाचा विश्वासघात करण्याचा कट रचला होता,’ असे इम्रान यावेळी म्हणाले.
विरोधक मागणार सुप्रीम कोर्टात दाद
दुसरीकडे, विरोधी पक्षांनी सभापतींच्या अविश्वास प्रस्ताव फेटाळण्याच्या निर्णयावर जोरदार आक्षेप घेतला आहे. तसेच या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचीही घोषणा केली आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी इम्रान यांच्यावर संविधानाची अवहेलना केल्याचा आरोप केला आहे. ‘पंतप्रधान इम्रान यांनी संविधानाचे उल्लंघन केले आहे. विरोधक याविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागतील. तसेच संपूर्ण विरोधी पक्ष संसदेत धरणे आंदोलन करतील’, असे ते म्हणाले.
सभापतींवर पक्षपातीपणाचे आरोप
तत्पूर्वी, विरोधी पक्षांनी संसदेचे सभापती असद कैसर यांच्याविरोधात अविश्वसाची नोटीस दिली होती. कैसर तटस्थपणे काम करत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपानंतर कैसर यांनी संसदीय कामकाजापासून अंतर राखले. त्यांच्या अनुपस्थितीत उपसभापती कासिम सुरी यांनी नॅश्नल असेंब्लीची धूरा वाहिली. त्यांनी विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव घटनाबाह्य असल्याचा दाखला देत धूडकावून लावला. वाढत्या तणावामुळे राजधानी इस्लामाबादसह देशातील सर्वच महत्वाच्या शहरांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.दुसरीकडे, शनिवारी रात्री इम्रान यांनी आपल्या निवासस्थानी समर्थक खासदारांची बैठक बोलावली होती. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, या बैठकीला अवघे 142 खासदार पोहोचले होते. दुसरीकडे, विरोधकांच्या पाकिस्तान डेमोक्रॅटीक फ्रंट किंवा पीडीएमच्या खासदारांचा आकडा 200 च्यावर पोहोचला आहे. म्हणजे इम्रान यांनी बहुमत गमावले हे स्पष्ट आहे
जनता रस्त्यावर उतरली
इम्रान यांनी शनिवारी सायंकाळी अचानक जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. विशेष म्हणजे यावेळी आलेल्या 11 पैकी 8 फोन कॉल्स परदेशांत स्थायिक झालेल्या पाकिस्तान्यांचे होते. प्रत्येक इम्रान व त्यांच्या सरकारची प्रशंसा केली. यावेळी इम्रान यांनी तटस्थतेच्या मुद्यावरुन लष्कराची खिल्ली उडवली. ते नमाजाचा दाखला देत म्हणाले, तुम्ही चांगल्या सोबत असता किंवा वाईटासोबत. कुणीही तटस्थ असत नाही. अविश्वास प्रस्ताव विरोधक व अमेरिकेचा कट आहे. रविवारी संपूर्ण देशाने रस्त्यावर उतरुन या कट कारस्थानाविरोधात निदर्शने करावी.
हिंसाचाराची भीती
अविश्वास प्रस्तावावर मतदानापूर्वी राजधानी इस्लामाबादेत सुरक्षा यंत्रणांना अॅलर्टवर ठेवण्यात आले आहे. जवळपास 3 हजार पोलिस कर्मचारी संसद परिसरात तैनात करण्यात आलेत. याशिवाय रेंजर्सलाही स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे. एकीकडे इम्रान खान समर्थक राजधानीत गोळा होत आहेत. तर दुसरीकडे, विरोधकांनीही आपल्या पाठिराख्यांसह कंबर कसली आहे. गुप्तहेर यंत्रणांच्या मते राजधानी इस्लामाबादेत हिंसाचार होण्याची शक्यता आहे.

