मुंबई- मुस्लीम समाजाने प्रार्थना करायची असेल तर ती घरी करावी. माझा प्रार्थनेला विरोध नाही पण मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागेल. जिथे भोंगे लागतील तिथे आम्हाला लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावावा लागेल असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज दिला.
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा सुरू आहे. त्यावेळी ठाकरे बोलत होते.राज ठाकरे म्हणाले,विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला. अडीच वर्षे ठरली हे जनतेला कधीच सांगितले नाही. निकाल लागल्यानंतर ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची टोम काढली अन् राष्ट्रवादी- काँग्रेससोबत बस्तान मांडले. मुख्यमंत्रीपदाची बाब चार भिंतीत का ठेवली महाराष्ट्राला सांगणे गरजेचे होते असा जोरदार टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लगावला.
”महाराष्ट्राच्या जनतेचे दर्शन घेताना अभिमान वाटतो. अख्खे जग कोरोनामुळे सामसुम होते, एक माणूसही रस्त्यावर दिसत नव्हता. कोरोनाची भीती अन् दुसरीकडे पोलिसांचा दांडा होता. संपुर्ण काळात पोलिसांचे काम वाखण्याजोगे होते. रात्र जागले खाण्यापिण्याची पर्वा केली नाही. चोवीस तास ते रस्त्यावर होते. दोन वर्षांनंतर बोलताना मोरी एवढी तुंबली की बोळा घालावा कुठुन कळतच नाही. शक्य होईल तेवढे साफ करू. जसा लॉकडाऊन विस्मरणात गेला तशा अनेक गोष्टी जनतेच्या विस्मरणात गेल्या. ही सभा म्हणजे थोडासा मागोवा आहे.
दोन वर्षांपुर्वीच्या घटनाही आपण विसरलो. 2019 ला झालेली विधानसभेची निवडणूक विसरत आहात ते तुम्ही विसरता ते यांच्या फायद्याचे ठरते. विधानसभेची निवडणूक आठवा विरूद्ध कोण राष्ट्रवादी आणि काँग्रेस होते.
निकालानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला. अडीच वर्षे ठरली हे आम्हाला उद्धव ठाकरेंनी कधी सांगितले नाही. पंतप्रधान म्हणाले होते की, आमचा मुख्यमंत्री बनेल, अमीत शाहही म्हणाले, तेव्हाही तुम्ही गप्प बसलात. निकाल लागल्यानंतर तुम्ही टोम काढली अन् राष्ट्रवादी- काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंनी बस्तान मांडले. मुख्यमंत्री पदाची बाब चार भिंतीत का ठेवली महाराष्ट्राला सांगणे गरजेचे होते असा सवालही त्यांनी विचारला.
महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच १९९९ ला राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रातील जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचंही म्हटलं. यावेळी राज ठाकरे यांनी आम्ही जातीपातून बाहेर पडत नाहीत, मग हिंदू कधी होणार असा सवालही केला.
राज ठाकरे म्हणाले, “आपण जातीपातीत अडकून पडणार असू तर कसलं हिंदुत्व घेऊन बसलो आहोत आपण? एक पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो हिंदू हा केवळ हिंदू-मुस्लीम दंगलीत हिंदू असतो. तो २६ जानेवारी, १५ ऑगस्टला भारतीय होतो. चीनने आक्रमण केलं की त्याला कळतच नाही आपण कोण आहोत? तो जेव्हा ना हिंदू असतो, ना भारतीय असतो त्यावेळी तो होतो मराठी, गुजराती, तमीळ, बंगाली, पंजाबी. तो जेव्हा मराठी होतो त्यावेळी तो होतो मराठा, त्यावेळी तो होतो ब्राह्मण, त्यावेळी तो होतो माळी, त्यावेळी तो होतो आणखी आगरी.”
सकाळच्या शपथविधी सोहळ्यावर टिका
सकाळी उठलो तेव्हा पाहतो तर काय जोडा वेगळाच. पळून कोणाबरोबर गेले अन् लग्न कोणाबरोबर झालेहे समजलेच नाही. मतदान कोणाला केले हे जनतेलाही कळत नसल्याची तेव्हाची स्थिती होती असेही ठाकरेंनी फडणवीसांच्या शपथविधीवर टोला लगावला. तीन नंबरचा पक्ष इतर पक्षांना फिरवतो. नंतर तेच एकमेकांच्या मांडीवरही बसतात कारण काय सांगता की अडीच वर्षे बोलले होते हे तुमचे झगाड त्याचा जनतेशी काय संबंध असेही उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंना टोला लगावला.
हे इतकं सहज कसे काय घडू शकतं?
रोज धडाधड नवीन बातम्या पडतात. मुळ विषय बाजूला ठेऊन बाकी सारी बडबडच सुरू आहे. वाझेनं गाडीच जिलेटीन ठेवली, अंबानीच्या घराबाहेर जिलेटीन ठेवण्याची हिम्मत कोणी केली? हे इतकं सहज घडू शकते का? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.
भुजबळ काही स्वातंत्र्यसैनिक नव्हते!
पुढे राज ठाकरे यांनी छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला, ते म्हणाले की, छगन भुजबळ अडीच वर्ष जेलमध्ये होते, त्यानंतर त्यांना सत्तेत स्थान देण्यात आले. ते काही स्वातंत्र्यसैनिक नव्हते. असा ह्ल्लाबोल राज ठाकरे यांनी केला आहे.
जेलमध्ये असलेले मंत्री
गृहमंत्री जेलमध्ये जातो, दाऊदशी संबंध असलेला मंत्री जेलमध्ये जातो, शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नाही, हे आपल्या महाराष्ट्रात चालू आहे. हे असे माणसे आता महाराष्ट्राला नको आहे. महाराष्ट्रात सगळी बोंबाबोंब सुरू आहे. एसटी कर्माचारी हैराण आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत. असे म्हणत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
लवकरच अयोध्याला जाणार
उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आल्याचा आपल्याला आनंद आहे, आपण लवकरच अयोध्याला जाणार, तारीख नंतर स्पष्ट करतो. असे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र जातीभेदात खितपत पडला
बाबासाहेब पुरंदरेंनी लिहीला ते ब्राम्हण मग त्यांनी चुकीचे लिहले असणार आम्ही इतिहास वाचत नाही शिवाजी महाराजांना जाती-पातीची संकल्पना मान्य नव्हती. महाराष्ट्राची परंपरा वैभवशाली पण तो महाराष्ट्र जातीभेदात खितपत पडला. अजून किती वाईट अवस्था महाराष्ट्राची करायची. जेम्स लेन हा भिकारडा त्याने जिजाऊंबद्दल काय लिहिले माहीतच आहे आ्म्हीच आमची अब्रू काढतो त्यावरून इथे राजकारण जाणून बजून तापवले जाते आपणही त्याच्यावर चर्चा करीत बसतो याची लाज वाटते. आम्हाला कसलेही भान नाही. निवडणूकीत जनतेला पैसे वाटून वेडेपीसे करायचे असा प्रघात सुरू आहे. जातीपातीतून आपण बाहेर येत नाही. हिंदु म्हणून आपण कधी एक होणार आहोत असा सवालही त्यांनी केला.
आपलेच लोक आपल्याला ओरबडतात
विविध संस्कृती इथे नांदतात. स्वातंत्र्याआधी हा देश एक भुमी होती कुणीही यायचे व सत्ता चालवायची सुमारे आठशे वर्षे देश पारतंत्र्यात होता पण मोगल आपली भाषा, संस्कृती काहीही हिसकाऊन नेऊ शकले नाहीत पण आपण आपल्याच लोकांना ओरबाडत आहोत.
ज्यांनी काम केले त्यांना बाजूला सारलं, ज्यांनी काम नाही केले त्यांना सत्ता दिली. काम केल्याची पावती आम्हाला काय मिळाली मग कोण तुमच्यासाठी काम करणार, लफंगेगिरी करणाऱ्यांसोबत तुम्ही असाल तर चांगुलपणाची अपेक्षा तरी कशाला करता असे सुनावत त्यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली.
मेट्रो आणली पण झोपडपट्ट्या वाढत आहेत. मुंबई भागातील झोपडपट्टीतील नागरीकांना फुकट घर संकल्पना चांगली पण याच घरांसाठी लोकांचे इकडे लोंढे आले नको ती माणसे घर घेऊन जात आहेत. मुळ झोपडपट्टी धारकांना घरे मिळत नाही.
आमदारांना कसली घरे वाटता त्यांना घरे देत असाल तर त्यांचे फार्महाऊस आपल्या ताब्यात घ्या. आमदारांना पेन्शन दिले जाते तेही घेतात साले…जनतेची कामे करतात म्हणजे आमदार उपकार करीत नाही त्यांना जनतेची कामे करावीच लागतील. आमदारांना घरे देण्यात मुख्यमंत्र्यांचा कट आहे का असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज केला.
इडीची नोटीस मलाही आली पण मी गेलो, यांना नोटीस आल्यानंतरही हे गेले नाहीत. आता मुख्यमंत्री मला अटक करा म्हणतात असा टोला लगावत राजकारणाला बळी पडू नका असा सल्लाही जनतेला त्यांनी दिला.
बाळासाहेबांचा फोटो दाखवून जनतेचे हजारो कोटी रुपये लुटत आहेत असा टोलाही महाविकास आघाडी सरकारला त्यांनी लगावला. बाळासाहेबांचे स्मारक बांधायचे तर मोठे बांधा. तुम्हाला बंगला आवडला म्हणून घेऊ नका. बिल्डरांच्या घशात मुंबई घातली बाळासाहेबांचे स्मारक बांधायला प्लॉट मिळत नाही याचा काय म्हणायचे.
एक दिवसासाठी मतदानाला बाहेर पडणे म्हणजे समाज नाही म्हणता येत. महाराष्ट्राला संत, महंत, महापुरूषांची परंपरा आहे. तु्म्ही स्वाभीमान गहाण टाकू नका. शिवजंयती साजरी केली तशी 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंतीही त्याच उत्साहाने करावी. महाराष्ट्राच्या ज्या महापूरूषांनी देशाला मोठे केले त्यांच्या जयंत्या उत्साहात साजऱ्या करा आणि देशाला कळु द्या की महाराष्ट्र जीवंत आहे असा संदेश त्यांनी जनतेला भाषणाच्या अखेरीस दिला.

