मुंबई-लॉकडाउनची सक्तीनं अमलबजावणी केली जात असताना ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान यांच्यासह २३ जण सुटी घालवण्यासाठी महाबळेश्वरला गेल्याचं प्रकरण समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी दिल्याचं उघड झालं आहे. यावरून विरोधी पक्षानं सरकारला धारेवर धरताच सरकारनं अमिताभ गुप्ता यांना तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.
लॉकडाऊनदरम्यान वाधवान कुटुंबीयांना प्रवासाची परवानगी देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्धची चौकशी संपेपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
अनिल देशमुख यांनी रात्री दोन वाजत या संदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली. लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबातील 23 जण सात गाड्यांमधून मुंबईहून महाबळेश्वरला गेल्याचे उघड झाले.
विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचे पत्र मिळाले. त्यामुळे सामान्यांना एक नाही आणि श्रीमंत धेंडांना, त्यातही घोटाळ्याच्या आरोपींना संचारबंदीत फिरण्याची मुभा कशी काय मिळाली यांसह अनेक प्रश्न उपस्थित झाले होते
लॉकडाउन असलेल्या परिस्थितीत ‘डीएचएफएल’चे कपिल वाधवान हे कुटुंब आणि इतरांसह सुटीसाठी महाबळेश्वरला गेल्याचं समोर आलं. पाचगणी पोलिसांनी कपिल वाधवान यांच्या २३ जणांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना प्रवास करु द्यावा, अशा आशयाचं गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या स्वाक्षरीचं पत्रही समोर आलं. हे प्रकरण माध्यमात आल्यानंतर विरोधकांनी प्रश्न उपस्थित करत सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुखांचे ट्विट-
हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करणारं पहिलं ट्विट केलं. त्यात ‘वाधवान यांच्यासह २३ जण महाबळेश्वरला कसे पोहोचले याची चौकशी केली जाईल,’ असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर चार तासांनी गृहमंत्री देशमुख यांनी दुसरं ट्विट केलं. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेप्रमाणे गृहविभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना तातडीनं सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांच्याविरोधात चौकशी केली जाणार असून, चौकशी होईपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील,’ असं देशमुख यांनी म्हटलं आहे.



