उद्धव ठाकरेंनी मांडलेले तीन महत्त्वाचे मुद्दे…
- अमित शहांनी मला दिलेला अडीच वर्षांचा शब्द पाळला असता तर हे सर्व सन्मानाने झालं असतं.
- आरेचा निर्णय बदलणे चुकीचे, कांजूरमार्गचेच कारशेड राहु द्या. माझ्या पाठीत सुरा खुपसला, तो मुंबईकरांच्या पाठीत खुपसू नका.
- लोकप्रतिनिधींना बोलवण्याचा अधिकार असला पाहिजे. लोकशाही मूल्ये जपली गेली पाहिजेत. मतदारांना आपलं मत कुठे फिरतंय हेच कळत नाहीये.
हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही…
उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं, त्यांच्या लेखी तथाकथित शिवसेनेचा मुख्यमंत्री केला. मग हेच तर मी अडीच वर्षापूर्वी सांगत होतो की, शिवसेनेचा अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री व्हावा. आज अडीच वर्ष झालेले आहेत. सन्मानाने अडीच वर्षे पूर्ण केले असते. शिवसेनेचा आधी किंवा भाजपचा आधी. त्यावेळी नकार देऊन आता होकार का दिला? जे भाजपसोबत गेले त्यांनी सुद्धा स्वतःला प्रश्न विचारा, शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणतात पण हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेनेशिवाय शिवसेनेचा मुख्यमंत्री असू शकत नाही.
राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकार येताच मेट्रो 3 कारशेड आरेमध्येच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत ‘आरे वाचवा’ या चळवळीतील सदस्यांनी, पर्यावरणप्रेमींनी आणि आरेवासीयांनी नाराजी व्यक्त केली. सरकारने कितीही प्रयत्न करू दे, पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका आरेमधील नागरिकांनी घेतली आहे. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेत आरे कारशेडबाबत भाष्य केले.
ते म्हणाले की, आरे हा कुणाचा खासगी प्लॉट नसून, जंगलासाठी जमीन आहे. एका रात्रीत झाडाची कत्तल झाली. मी मुख्यमंत्री होताच त्याला ‘स्टे’ दिला. तो निर्णय मुंबईच्या विकासामध्ये अडसर नव्हता. मी पर्यावरणासोबत आहे. तरीही संभ्रम होत असेल तर विषय सोडलेला बरा. माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा विषय रेटू नका. आता काही दिवसांपूर्वी बिबट्या दिसला होता. झाडे गेली तरी वन्यजीव आहेत. त्यामुळे आसपासचे वन्यजीव धोक्यात येईल. 800 एकरचे जंगल उखडून टाकण्यात आले. आरेची जमीन नागरिकांची, महाराष्ट्राची आहे त्यामुळे मुंबईच्या महाराष्ट्राच्या हितासाठी वापरा. आरे प्रस्ताव बदलणे अहंकार नव्हता, पर्यावरण रक्षणासाठी घेतलेला हा निर्णय आहे. कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा प्रस्ताव बदलू नका, अशी विनंती राज्य सरकारला उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
कारशेड रद्द
मेट्रो 3 कारशेड आरेमध्ये उभारण्यास शिवसेनेने सुरुवातीपासून विरोध दर्शवला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर आरेतील कारशेड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच कारशेड आरेतून कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता. मात्र, आरेमध्येच कारशेड उभारण्यात यावे, अशी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती.
राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी सर्व प्रथम आरेमध्ये कारशेड उभारण्याबाबतचा निर्णय घेऊन उद्धव ठाकरे यांना पहिला धक्का दिला आहे. नव्या सरकारच्या या निर्णयावर पर्यावरणप्रेमी, आरेवासीयांसह सामान्य नागरिकांनीही नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. रस्त्यावर उतरून अथवा न्यायालयीन लढाईसाठी देखील आपण तयार आहोत. त्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पर्यावरणप्रेमी, आरेवासीयांनी नव्या सरकारला दिला आहे.

