मुंबई- शहर आणि उपगनर तसेच ठाण्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईत संततधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी तुंबण्यास सुरुवात झाली आहे. अंधेरी सबवेत पाणी भरल्याने हा सबवे वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. भांडुपमध्ये एलबीएस मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्याने पाणी भरले आहे.
हिंदमाता, माटुंगा किंग्ज सर्कल या भागातही पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने मुंबई पालिका आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
मुंबईत विविध भागांत पाणी भरल्याने रस्तेवाहतूक मंदावली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू असून मध्य आणि हार्बर मार्गावर रखडपट्टी सुरू आहे. मध्य रेल्वेच्या गाड्या १५ मिनिटं उशिराने धावत असून हार्बर मार्गावरही तशीच स्थिती आहे.
मुंबईत रात्रभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी नागरिकांसाठी विशेष आवाहन केले आहे. ज्या भागात पाणी भरले आहे तिकडे जाणे टाळा तसेच समुद्रापासूनही दूर राहा. स्वत:ची काळजी घ्या. काही समस्या उद्भवल्यास १०० नंबरवर कॉल करा किंवा ट्विट करा, असे पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.
दक्षिण मुंबईतील सी. पी. टँक भागात म्हाडाच्या ७ मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील भिंतीचा भाग कोसळल्याची माहिती देण्यात आली असून खबरदारी म्हणून ही पूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हांमध्ये काही भागांत मुसळधार तर पालघर जिल्ह्याच्या काही भागांत अतिवृष्टी होऊ शकते, असे हवामान विभागाकडून पुढे नमूद करण्यात आले आहे. मुंबई आणि उपनगरांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करून प्रशासनाला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
संततधार पावसामुळे विमानतळाजवळील क्रांतीनगर वस्तीत पाणी शिरले आहे. सध्या तिथे गुडघाभर पाणी आहे. पाऊस न थांबल्यास मिठी नदीचे पाणी आणखी वाढण्याची भीती असून नदीकाठच्या वस्तीतील अनेक कुटुंबानी घरे रिकामी करून शाळेत आसरा घेतला आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणारं मोडकसागर धरणही भरून वाहू लागलं आहे. हे धरण आज सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी वाहू लागलं, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली. गेल्यावर्षी हे धरण १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी भरून वाहू लागलं होतं.
मोडकसागर धरण ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात वैतरणा नदीवर असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी हे एक मुख्य धरण आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणक्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून काल आधी तानसा आणि आज मोडक सागर धरणही वाहू लागलं आहे. मुंबईकरांसाठी ही सुखद बातमी आहे.
मुंबईला अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, भातसा, विहार आणि तुलसी या सात धरणांमधून पाणीपुरवठा होतो. यापैकी मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत असलेलं तुलसी हे धरण सर्वात आधी भरून वाहू लागलं होतं. १२ जुलै रोजी हे धरण भरलं. त्यानंतर काल दुपारी २.५० वाजता तानसा धरण भरून वाहू लागलं होतं. त्याचवेळी पालिका अधिकाऱ्यांनी मोडकसागरही लवकरच भरेल, अशी शक्यता व्यक्त केली होती. काल मोडकसागर ८४.०३ टक्के भरलं होतं. संततधार पावसामुळे यात वाढ होऊन हे धरण आज पूर्ण भरलं.
बदलापूर स्टेशनमध्ये रूळ पाण्याखाली गेले आहेत. पावसाची संततधार सुरू असल्याने पाणी वाढत चालले असून स्वीमिंग पूलसारखी स्थिती बदलापूर स्टेशनात दिसत आहे.
कल्याण-कर्जत मार्गावरील रेल्वेवाहतूक ठप्प झाली आहे. अनेक गाड्या कल्याणजवळ अडकून पडल्या असून मुंबईतून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची कोंडी झाली आहे. कल्याण स्टेशनवर सध्या प्रवाशांची मोठी गर्दी आहे.

