२२ मार्चपासून ‘फक्त मराठी वाहिनी’वर ‘सप्तपदी मी रोज चालते’

Date:

आजवर विविध आशयघन चित्रपट – कार्यक्रमांद्वारे रसिकांचं मनोरंजन करणारी ‘फक्त मराठी वाहिनी’ आता दैनंदिन मालिकांच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या दिशेनं मागच्या आठवड्यात सुरू झालेल्या ‘साईबाबा श्रद्धा आणि सबूरी’ या अनोख्या आध्यात्मिक मालिकेला काही दिवसांतच प्रेक्षकांनी आपल्या पसंतीचा कौल दिला आहे. ‘फक्त मराठी वाहिनी’ने नवनव्या कथा कल्पना असलेल्या कलाकृतींच्या निर्मितीचा ध्यास घेतला असून त्यांनी प्रेक्षकांच्या पसंतीनुसार विविध कार्यक्रमांच्या निर्मितीला सुरुवात करीत ‘सप्तपदी मी रोज चालते’ असं शीर्षक असलेली दुसरी दैनंदिन नवी कोरी मालिका येत्या सोमवार, २२ मार्चपासून रात्रौ ८ :३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीसाठी आपल्या ‘फक्त मराठी वाहिनी’वर आणली आहे. मालिका आणि चित्रपट क्षेत्रात विशेष लौकिक असलेल्या प्रसिद्ध दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी या ‘फक्त मराठी वाहिनी’च्या प्रोजेक्ट हेड म्हणून कार्यभार पाहत आहेत.

‘साईबाबा श्रद्धा आणि सबूरी’ या आध्यात्मिक मालिकेनंतर ‘सप्तपदी मी रोज चालते’ ही कौटुंबिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याबाबत ‘फक्त मराठी वाहिनी’चे बिझनेस हेड श्याम मळेकर म्हणाले की, ‘फक्त मराठी वाहिनी’ने आजवर नेहमीच निखळ मनोरंजन देण्याचं काम केलं आहे. हिच परंपरा जोपासत आम्ही दैनंदिन मालिकांच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन करण्याची योजना आखली आहे. ‘सप्तपदी मी रोज चालते’ ही पुढील मालिका प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी नावीन्यपूर्ण देण्यात यशस्वी होईल. दैनंदिन मालिका तसेच विविध लोकप्रिय चित्रपटांच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे ह्या आमच्या या मालिकेच्या प्रोजेक्ट हेड म्हणून कार्यरत असल्याने मालिकेला त्यांच्या अनुभवाचा निश्चित फायदा होईल. मागील पाच वर्षांच्या काळामध्ये ‘फक्त मराठी वाहिनी’ने आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला असून विविध कथा विषय असलेल्या दैनंदिन मालिकांच्या निर्मितीद्वारे वाहिनीचा विस्तार होणार असल्याचा विश्वासही श्याम मळेकर यांनी व्यक्त केला आहे.

‘सप्तपदी मी रोज चालते’ या मालिकेत अमृता आणि संजू यांची कहाणी पहायला मिळणार आहे. या दोघांच्या माध्यमातून पवार आणि थोरात या दोन कुटुंबाची कथाही यात आहे. अमृताला आपल्या आईप्रमाणे कर्तबगार आणि वडीलांप्रमाणे समजूतदार पती हवा आहे. कालांतराने तिच्या आयुष्यात संजूची एंट्री होते, पण त्याला काहीही न करता फक्त ऐशोआरामात जीवन जगायचं आहे. अशी ही जोडी भविष्यात ‘सप्तपदी’ कशी चालणार या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना मालिकेच्या प्रत्येक भागागणिक मिळणार आहे. या मालिकेतील प्रत्येक करॅक्टर वास्तविक जीवनातील खरे खुरे रंग दाखवणारं असल्यानं प्रत्येकाला ही मालिका आपल्याच घरातील कथा सांगणारी असल्यासारखं वाटेल. आज इतर वाहिन्यांवर सुरू असलेल्या कौटुंबिक मालिकांच्या तुलनेत ‘सप्तपदी’मध्ये काहीसं वेगळं कथानक पहायला मिळणार असून, त्यातही अनेक कंगोरे असल्यानं मालिकेत येणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी पुरेसे ठरणारे आहेत. टेलिव्हिजन क्षेत्रातील आघाडीच्या ‘टेल अ टेल मीडिया प्रा. लि.’ या संस्थेच्या जितेंद्र गुप्ता आणि महेश तागडे यांनी ‘फक्त मराठी वाहिनी’साठी या मालिकेची निर्मिती केली आहे.

ऋणानुबंध, मानो या ना मानो, कॅप्टन हाऊस, कलश, कुटुंब, कहानी घर घर की, तीन बहुरानिया, देवयानी, संस्कार धरोहर अपनोंकी अश्या ट्रेंड सेटर लोकप्रिय मालिकांसोबतच धमाधम्म, मितवा, फुगे, लाल इष्क, सविता दामोदर परांजपे, तुला कळणार नाही, माधुरी इत्यादी ग्लॅमरस सुपरहिट मराठी सिनेमांचं यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या स्वप्ना वाघमारे जोशी ‘सप्तपदी मी रोज चालते’ या मालिकेसाठी प्रोजेक्ट हेड म्हणून काम पहात आहेत. या मालिकेबाबत स्वप्ना वाघमारे जोशी म्हणाल्या की, “‘सप्तपदी मी रोज चालते’च्या माध्यमातून एक आशयघन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजच्या कुटूंब पध्दतीवर भाष्य करणाऱ्या या मालिकेत एक गुलाबी लोभासवाणी प्रेमकथाही पहायला मिळणार आहे. एक नवी कोरी जोडी या मालिकेचं मुख्य आकर्षण ठरणार आहे. ‘फक्त मराठी वाहिनी’चा मनोरंजनाचा वारसा जपणारी ‘सप्तपदी मी रोज चालते’ प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करेल यात शंका नाही”.

रिमोटपासून दूर ठेवणारं कथानक, कलाकारांचा सहजसुंदर अभिनय आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या आधारे ‘सप्तपदी मी रोज चालते’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी होईल असं मत ‘सप्तपदी मी रोज चालते’चे दिग्दर्शक प्रवीण परब यांनी व्यक्त केलं आहे. या मालिकेत तृप्ती देवरे, बिपीन सुर्वे, विजय मिश्रा, स्नेहा रायकर, अखिल लाले, संजना काळे, प्राप्ती बने, वंदना वाकनीस, विपुल साळुंखे, आरती शिंदे, अमित कल्याणकर, रुपाली गायके, रणजित रणदिवे, चेतन चावडा, श्रुती पारकर, हर्षदा कर्वे, पूजा यादव आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. सोमवार ते शुक्रवार दररोज रात्रौ ८:३० वाजता ‘सप्तपदी मी रोज चालते’ ही मालिका आपल्या आवडत्या ‘फक्त मराठी वाहिनी’वर प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.