मुंबई-संतोष परब हल्ला प्रकरणात अडचणीत सापडलेले भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या अंतिम सुनावणी होणार आहे. आज सरकारी पक्षाचा युक्तीवाद पुर्ण झाला असून, उद्या दुपारी तीन वाजता अंतिम निकाल जिल्हा सत्र न्यायालय सुनावणार आहे. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तसेच 10 दिवसात न्यायालयासमोर शरण येण्यास सांगितले होते. त्यानुसार आज राणे शरण आल्यावर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. त्यात उद्या या प्रकरणात अंतिम निकाल दुपारी तीन वाजता न्यायालय सुनावणार आहे. त्यामुळे आता नितेश राणे यांना दिलासा मिळणार की अटक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी नितेश राणे अडचणीत सापडले आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकीलाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथेही निराशाच पाहायला मिळाली. त्यानंतर अखेर नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यांना दहा दिवसात शरण येण्यास सांगितले होते.
काय आहे प्रकरण?
18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे.

