पुणे – पीएमपीएमएल कडून आज पासून मार्ग क्रमांक २९६ कात्रज ते विंझर या बसमार्गाचा विस्तार वेल्हे-किल्ले तोरणा पर्यंत करण्यात आला. तसेच मार्ग क्रमांक २०९ ब कात्रज ते सासवड (मार्गे गराडे) हा नवीन बसमार्ग सुरू करण्यात आला. महापौर. मुरलीधर मोहोळ व खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते कात्रज सर्पोद्यान स्थानक येथे या दोन्ही बससेवांचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी नगरसेविका राणी भोसले, नगरसेविका वर्षा तापकीर, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर,नगरसेवक,प्रकाश कदम, नगरसेविका अमृता बाबर, नगरसेविका स्मिता कोंढरे, नगरसेवक प्रसन्न जगताप, पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, जि. प. सदस्य अमोल नलावडे भाजपचे पुरंदर तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे, उपाध्यक्ष हनुमंत साळुंके, गराडे गावचे सरपंच. नवनाथ गायकवाड, उपसरपंच समीर तरवडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष योगेश जगदाळे, थापेवाडीचे सरपंच निलेश जगदाळे, कात्रज आगार व्यवस्थापक विजय रांजणे, सहाय्यक आगार व्यवस्थापक शैलेंद्र जगताप,आगार अभियंता सचिन वाबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कात्रज ते वेल्हे या बससेवेसाठी नगरसेविका राणी भोसले यांनी तर कात्रज ते सासवड या बससेवेसाठी पुरंदर तालुक्यातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
मार्ग क्रमांक २९६ – कात्रज ते वेल्हे-किल्ले तोरणा या बससेवेचा मार्ग कात्रज, खेड शिवापूर, नसरापूर, आंबवणे, विंझर, वेल्हे-किल्ले तोरणा असा असणार आहे. सध्या या मार्गावर ५ बसेसद्वारे साधारणपणे दर एका तासाने दिवसभरात एकूण ३२ फेऱ्या होणार आहेत. कात्रज ते वेल्हे पहिली बस सकाळी ५.५० वा. तर शेवटची बस रात्री ८.४५ वा. आहे. तसेच वेल्हे ते कात्रज पहिली बस सकाळी ६.०० वा. तर शेवटची बस रात्री ९.०० वा. आहे.
मार्ग क्रमांक २०९ ब – कात्रज ते सासवड या बससेवेचा मार्ग कात्रज, येवलेवाडी, बोपदेव घाट, भिवरी, गराडे, कोडीत, सासवड असा असणार आहे. सध्या या मार्गावर १ बसद्वारे साधारणपणे अडीच तासाने दिवसभरात एकूण १२ फेऱ्या होणार आहेत. कात्रज ते सासवड पहिली बस सकाळी ६.०५ वा. तर शेवटची बस रात्री ८.२० वा. आहे. तसेच सासवड ते कात्रज पहिली बस सकाळी ७.२५ वा. तर शेवटची बस रात्री ९.३५ वा. आहे.
याप्रसंगी बोलताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, गेल्या एक ते सव्वा वर्षात पुणे शहराला लागून असलेल्या तालुक्यांमधील विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार यांच्या सोयीसाठी पीएमपीएमएलच्या माध्यमातून ३५ नवीन बसमार्ग सुरू करण्यात आले. यामुळे नवीन बसमार्गांवरील ३५० ते ४०० गावे पुणे शहराला जोडली गेली आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनी पीएमपीएमएलच्या बससेवेचा जास्तीत जास्त वापर करावा. मार्च महिन्यात पीएमपीएमएलच्या ताफ्यात नवीन १०० ई-बसेस दाखल होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई-बसेसचे लोकार्पण होणार आहे.
आमदार भिमराव तापकीर म्हणाले, वेल्हे पर्यंत बससेवा सुरू झाल्याने पर्यटनाला चालना मिळेल. पीएमपीएमएलची बससेवा किफायतशीर व सुखकर आहे. या सेवेचा प्राधान्याने वापर करणे गरजेचे आहे. पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे म्हणाले, काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीपर्यंत पीएमपीएमएलची बससेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गडावर स्वराज्याची शपथ घेतली त्या किल्ले तोरणा पर्यंत कात्रज ते वेल्हे या बससेवेच्या माध्यमातून बससेवा सुरू झाली आहे. याप्रसंगी नगरसेविका राणीताई भोसले, नगरसेविका वर्षाताई तापकीर, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर,नगरसेवक प्रकाश कदम, जि. प. सदस्य अमोल नलावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. पीएमपीएमएल च्या ग्रामीण भागातील बससेवेमुळे ग्रामीण भागाचा विकास होण्यास व पर्यटनाला चालना मिळून रोजगारनिर्मितीस मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुणे शहरात ये जा करणे देखील सोयीचे झाल्याचे मत मान्यवरांनी आपल्या मनोगतामधून व्यक्त केले.

