विश्व हिंदू परिषद पूर्व व पश्चिम विभाग पुणे तर्फे महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव
पुणे : अयोध्येमध्ये श्रीरामांचे मंदिर उभारले जात आहे. त्याचवेळी प्रत्येकाच्या हृदयात समरसता निर्माण व्हायला हवी. आपल्या मनातील उच्च – नीच हा भाव दूर झाला पाहिजे. देशातील कोणताही एक समाज जरी आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य याबाबत मागे राहिला तरी समता येणार नाही, असे मत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष ॲड. आलोककुमार यांनी व्यक्त केले.
विश्व हिंदू परिषदेच्या पूर्व आणि पश्चिम पुणे विभागातर्फे सामाजिक समरसता अभियान अंतर्गत महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, कविराज संघेलिया, ईश्वर बुवा दादा महाराज, बापू भोळे, विजय कांबळे, निखील कुलकर्णी उपस्थित होते.
ॲड. आलोककुमार म्हणाले, समरसता म्हणजे काय तर सर्व मनुष्यामध्ये भगवंत निवास करतो, अशी भावना ठेवणे. संपूर्ण समाजामध्ये ब्रह्म पाहण्याचा अभ्यास म्हणजे समरसता. हिंदू समाजाला आणि देशाला बलशाली बनविण्यासाठी सामाजिक समरसता हे अभियान राबविण्यात येत आहे. येत्या काळात भारत देश विकसनशील नव्हे तर विकसित देश म्हणून ओळखला जाईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
समरसतेचा आवाज देशाच्या प्रगतीसाठी असेल. हिंदू समाजातील तरुणांनी रोजगार निर्माण करणारे व्हा, असेही त्यांनी सांगितले. कविराज संघेलीया, ईश्वर बुवा दादा महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. नाना क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. संतोष अनगोळकर यांनी आभार मानले.

