मातृभाषेतुन शिक्षणाला, बोलण्याला प्राधान्य हवे

Date:

  • राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन; सुर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण.

पुणे : “नवीन शिक्षण धोरणात अनेक नाविन्यपूर्ण तरतुदी आहेत. मातृभाषेतून शिक्षण, सैद्धांतिक मूल्यांचा अंतर्भाव केला आहे. आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभर आत्मनिर्भरतेचे वातावरण आहे. या आत्मनिर्भरतेला जीवनमूल्यांची जोड देण्याची आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. जीवनमूल्यांच्या अनुकरणातूनच रामराज्य साकार होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

सुर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या २३ व्या स्थापना दिवसानिमित्ताने सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सुर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार’ व ‘सुर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ देऊन कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात आले. बावधन (पुणे) येथील सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमधील सुर्यभवन येथे झालेल्या या सोहळ्याला नालंदा विद्यापीठाचे कुलपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक अध्यक्ष आचार्य डॉ. लोकेश मुनिजी, भजनसम्राट अनूप जलोटा, ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद, सुर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, कार्यकारी विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया आदी उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

‘सुर्यदत्ता जीवनगौरव पुरस्कार’ स्वर्गीय डॉ. टी. बी. सोलाबक्कणवार (कला आणि संस्कृती), ज्येष्ठ चरित्र अभिनेते किरण कुमार (भारतीय सिनेमा), अभया श्रीश्रीमल जैन (जागतिक उद्योजकता), डॉ. मुकुंद गुर्जर (विज्ञान आणि तंत्रज्ञान), विक्रम राजदान (दिग्दर्शक आणि निर्माता), डॉ. आर. एम. अग्रवाल (वैद्यकीय समाजसेवा), कृष्ण प्रकाश (सार्वजनिक सेवा, आरोग्य आणि तंदुरुस्ती), ज्योत्स्ना चोपडा (पर्यावरण संवर्धन व नैसर्गिक फळभाज्या) यांना प्रदान करण्यात आला. ‘सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कार’ पंडित विजय घाटे (भारतीय शास्त्रीय संगीत), डॉ. अद्याशा दास (पर्यटन आणि भारतीय हेरिटेज), अजिंक्य देव (भारतीय सिनेमा), साजन शाह (प्रेरक वक्ता), लावण्या राजा (जागतिक उद्योजकता), रिया जैन (ललित कला- चित्रकला), राधिका ए जे (सर्जनशील कला) यांना प्रदान करण्यात आला.

भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “कोणत्याही कामात समर्पण, कठोर मेहनत हवी. उद्योजकतेची अनेक क्षेत्रे आज खुणावत आहेत. त्या संधींचा आपण उपयोग केला पाहिजे. आपल्या कामात प्रामाणिकता, पारदर्शकता हवी. केंद्र सरकारच्या कामातून आपण गेली सहा वर्षे पारदर्शकता पाहत आहोत. पद्म पुरस्कार हे त्याचे मूर्तिमंत उदहरण आहे. खेड्यातील मुले आयएएस, आयपीएस होताहेत. त्यामुळे मातृभाषेचा आग्रह धरावा.”
सूर्यदत्ता संस्थेने निवड केलेल्या पुरस्कारार्थींचे कार्य प्रेरणादायी ठरेल, असे सांगून कोश्यारी म्हणाले, “कला, क्रिडा, साहित्य, विज्ञान, माहिती तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रात समर्पक भावनेने काम करून या पुरस्कारार्थींनी आपल्यासमोर आदर्श ठेवला आहे. देशाचा सर्वांगीण विकास साधताना विविध क्षेत्रात काम होताना दिसत आहे. देशाला वेगळया उंचीवर घेवून जाण्यासाठी प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात समर्पक भावनेने काम करावे.”

डॉ. विजय भटकर म्हणाले, “मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण असायला हवे. आपल्या देशात अनेक भाषा असून, सर्व भाषा प्रगल्भ आणि त्यांना हजारो वर्षांची परंपरा आहे. अनेक देशात फिरल्यानंतरही आपण आपल्या खेडेगावांसाठी काय करू शकतो, हा प्रश्न पडत असे. आपली विद्यापीठे ज्ञानाची दालने असली पाहिजेत. सर्वांगीण आणि मूल्याधिष्ठित शिक्षण देणाऱ्या संस्थांची आज गरज आहे. सुर्यदत्तासारख्या हे काम अतिशय तळमळीने करताहेत, याचा आनंद वाटतो.”

रझा मुराद म्हणाले, “आज दोन लहान मुलींना पुरस्कार देताना मला आनंद होतोय. ज्या घरात मुली असतात, ते घर नेहमी प्रगती करते. त्यांच्या पालकांनी त्यांच्यातले कौशल्य ओळखून त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांचे अभिनंदन करतो. किरण कुमार आणि मला चित्रपट सृष्टीत यावर्षी ५० वर्ष पूर्ण झाली. खूप मेहनत आणि परिश्रम करून आम्ही इथे पोहचलो. आयुष्यात समर्पित वृत्तीने काम करावे लागते.”

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “कोरोनाने आपल्याला स्वतःबरोबरच सामाजिक भान जपत योगदान देणे आवश्यक आहे, हे शिकवले. मुलांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार व्हावेत, त्यांची बौद्धिक, मानसिक तसेच भावनिक वाढ व्हावी, त्यांची सर्वांगीण जडणघडण व्हावी, याकरिता त्यांना विविध क्षेत्रातील लोकांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख व्हायला हवी. त्याच उद्देशाने सुर्यदत्ता जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातून ही आदर्श व्यक्तिमत्त्व समोर आणत असतो.”

किरण कुमार म्हणाले, “ज्या शहरातून कामाला सुरवात केली; त्याच शहरात मला जीवनगौरव पुरस्कार मिळाला, हा योगायोग आहे. इथेच न थांबता अजून खूप गोष्टी साध्य करायच्या आहेत. चित्रपटसृष्टीने दिलेल्या प्रेमाचा हा सन्मान आहे. सूर्यदत्ता इन्स्टिटयूटचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.”
अभया श्रीश्रीमल जैन म्हणाले, “पूर्वी आपल्या देशाला ‘सोने कि चिडियाँ’ म्हणत. आता आपल्या देशाची होत असलेली प्रगती पाहता २०३० पर्यंत पुन्हा आपण त्या स्तरावर येऊ शकू. यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन द्यायला हवे. वाईट कार्य करूनच आपण यशस्वी होऊ शकतो, ही लोकांची विचारसरणी बदलायला हवी.”
अजिंक्य देव म्हणाले, “मला हा सन्मान दिल्याबद्दल सूर्यदत्ता ग्रुपचा आभारी आहे, एवढ्या दिग्गज लोकांसमोर हा पुरस्कार मिळाल्याने स्वतःला भाग्यवान समजतो. या क्षेत्रात अजून बरेच काम करायचे आहे. देव कुटुंबियांना चित्रपट सृष्टीने खूप दिले आहे. रसिकांचे प्रेम आणि यासारखे पुरस्कार यामुळे जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते.” 
आचार्य लोकेश मुनीजी यांनीही मार्गदर्शन केले. तरुण कुमार चौधरी, अभयकुमार जैन, रिया जैन यांनीही मनोगत व्यक्त केले. शिल्पा भेंडे आणि सिद्धांत चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. समूह संचालक डॉ. शैलेश कासंडे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...