पुणे, दि.३१ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा समताधिष्ठीत समाज घडविण्यासाठी राज्याचा सामाजिक न्याय विभाग कायमच प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज केले.
मोशी ता. हवेली येथील 250 विद्यार्थीनी क्षमतेचे मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीचे उद्घाटनसामाजिक न्यायमंत्री श्री. बडोले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष दिलीप गिरणकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त एल.व्ही. महाजन,सहाय्यक उपायुक्त एस.आर.दाणी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन.व्ही. तेलंग उपस्थित होते.
श्री. बडोले म्हणाले, डॉ. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती निमित्त राज्यात नवीन ५० शासकीय वसतिगृह उभारण्यात आली आहेत. या वसतिगृहाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील मागासवर्गीयविद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होत आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचे पाईक होवूनच राज्याचा सामाजिक न्याय विभाग वाटचाल करत आहे. राज्यातील मागसवर्गीय मुले स्पर्धा परिक्षेव्दारे प्रशासकीयसेवेत येण्यासाठी तसेच त्यांना उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग विविध योजना राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री श्री. कांबळे म्हणाले, डॉ. बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती निमित्त राज्यातील १२५मागासवर्गीय मुलांना परदेशी शिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. या मुलांचा सर्व खर्च राज्यशासन करत आहे.बाबासाहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र उभा करण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एल. व्हृी. महाजन यांनी केले. तर आभार सहाय्यक आयुक्त एस. आर. दाणी यांनी मानले.