पुणे : माळीण गावातील प्रत्येक कुटुंबियाला दिवाळीत ४५० चौरस फुटाचे घर मिळालेच पाहिजे अशा नियोजानानुसारच शासन काम करीत आहे अशी माहिती येथे राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय यांनी येथे दिली
दोन वर्षापूर्वी माळीण गावात झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत बाधीत झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाचे काम शासनाच्या सर्व विभागांनी योग्य समन्वय राखत तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय यांनी आज येथे दिल्या.
भूसख्खलनात दुर्घटनाग्रस्त झालेल्या पुणे जिल्ह्यातील माळीण (ता. आंबेगाव) गावच्या नवीन पुनर्वसन कामाची पहाणी मुख्य सचिव श्री. क्षत्रीय यांनी केली. यावेळी त्यांनी तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना पुनर्वसनाचे काम तातडीने पुर्ण करण्या विषयी सूचना केल्या.
यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता व्ही.बी.माळोदे, प्रांताधिकारी कल्याण पांढरे, तहसिलदार बी. जे. गोरे, माळीणचे सरपंच दिगंबर भालचीम, सीओईपी महाविद्यालयाचे प्राध्यापक बिराजदार यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. क्षत्रीय म्हणाले, दोन वर्षापूर्वी माळीण गावात झालेल्या दुर्घटनेत अनेक ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागला. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही. मात्र या गावातील बाधित कुटंबांचे योग्य प्रकारे पुनर्वसन होणे आवश्यक आहे. शासन यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या नवीन गावठाणात बाधीतांसाठी देण्यात येणारी घरे ही अॅल्युफोर या नव्या तंत्रज्ञानाने बांधण्यात आली आहेत. ही घरे पारंपारिक बांधकाम केलेल्या घरांपेक्षा चारपट अधिक मजबूत आहेत. या नवीन गावठाणाची योग्य प्रकारे रचना करण्यात आली आहे. यामध्ये प्राथमिक शाळा, पिण्याच्या पाण्याची टाकी, सार्वजनिक गोठा, ग्रामपंचायतीची इमारत, दवाखाना, मोठे अतंर्गत रस्ते, सांडपाण्याची सोय अशा सुविधा देण्यात येणार आहेत. प्रत्येक कुटुंबाला 450 स्क्वेअर फुट इतक्या आकाराची एकसारखी घरे देण्यात येणार आहेत. येत्या दिवाळी पर्यंत या गावातील बाधितांना स्वत:ची घरे मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त करुन सुरु असलेल्या कामाच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले.


