मुंबई-स्वा. सावरकरांवर आक्षेपार्ह विधान होत असल्यामुळेही आम्ही ‘मविआ’ची सत्ता सोडण्याचा निर्णय घेतला. मविआ सरकारमध्ये सर्वांची गळचेपी होत होती, असे सडेतोड वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले. मुख्यमंत्र्यांनी आज स्वा. सावरकरांच्या राष्ट्रीय स्मारकावर जात त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आमच्या मागे जनतेची ताकद
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कालच आम्ही बहुमत सिद्ध केले. आम्हाला ‘मविआ’पेक्षा खूप जास्त मते मिळाली. त्यात आम्हाला 164 तर मविआला कवेळ 99 मतदान झाले. यामुळे शिवसेना – भाजप युतीच्या सरकारच्या मागे मोठा जनाधार असल्याचे दिसले आहे. हे सरकार स्थापन करताना आमचा हिंदुत्ववादी अजेंडा होता. यात स्वा. सवारकरांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व जपण्यासाठी आम्ही हे सरकार स्थापन केले आहे.
कोणत्याही धर्माला विरोध नाही
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ज्या सरकारमध्ये सर्वांची गळचेपी होत होती. सावरकरांवर आक्षेपार्ह विधान होत असताना त्याच्याविरोधात खुल्या मनाने परखड पणाने आपली मते व्यक्त करता येत नव्हती. त्यामुळेच मविआ सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हिंदुत्वांचा मुद्दा घेत आम्ही कामाला लागलो आहोत. यामुळे इतर कोणत्या धर्माला आमचा विरोध नाही, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार
शिंदे पुढे म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचाराचे सरकार महाराष्ट्रात आले पाहिजे, यासाठी आम्ही हे सर्व केले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आता आक्रमक भूमिका घेणार असलो, तरी दुसऱ्या समाजाचा तिरस्कार करणार नाही. हे सर्व सामान्य लोकांचे सरकार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार कटिबद्ध असून त्यासाठी कोणतीही तडजोड करणार नाही.

