पुणे:- पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस वाढत जाणारी आहे. विकास कामे आणि अर्थव्यवस्थेच्या विकासासाठीही पाणी हा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे पाण्याच्या स्त्रोतांचे, समन्यायी योग्य व्यवस्थापन होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी आज येथे केले.
येथील खडकवासला येथे असलेल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस) चा शतकमहोत्सवी कार्यक्रम आज उपराष्ट्रपती मो. हमीद अन्सारी यांच्या उपस्थितीत पार पडला, त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. केंद्रीय जलस्रोत, नदी विकास आणि गंगा नदी पुनरुज्जीवन मंत्री उमा भारती, केंद्रीय जलस्रोत, नदी विकास आणि गंगा नदी पुनरुज्जीवन राज्यमंत्री डॉ.संजीव कुमार बलियान, पालकमंत्री गिरीश बापट, जलस्रोत, नदी विकास आणि गंगा नदी पुनरुज्जीवन विभागाचे ओएसडी डॉ.अमरजीत सिंग, मुख्य पोस्ट मास्टर जनरल एस.सी.अग्रवाल, सीडब्ल्यूपीआरएसचे संचालक डॉ. मुकेश कुमार सिन्हा या प्रसंगी उपस्थित होते.
मानव आणि प्राणी जीवनांसाठी पाणी हा महत्वाचा घटक आहे. देशाची वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध असलेले पाणी याची तुलना केली असता पाण्याचे प्रमाण कमी असल्याचे सांगून उपराष्ट्रपती म्हणाले की, देशातील नद्यामधील पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. औद्योगिक वसाहतीमध्ये सांडपाणी निर्गमीकरण आणि त्यावर प्रक्रिया न केल्यामुळे नदीतील पाणी प्रदूषित होते. यामध्ये गुंतवणूक कमी असून ती वाढली पाहिजे, असेही ते म्हणाले.
बाराव्या पंचवार्षिक योजनेंतर्गत २०१२-१७ वर्षी पाणी या विषयाला अतिशय महत्व देण्यात आले आहे. पाणलोट विकास, जलस्त्रोताचे निश्चितीकरण, जलसंधारण अशा विविध कामांबरोबरच सिव्हील सोसायटी, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग अशा अनेक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. घटनेतील तरतुदीनुसार पाणी हा विषय राज्य शासनाच्या अखत्यारित येतो. त्यामुळे राज्य शासनाने याबाबत महत्वाची भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादनही उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी केले.
सीडब्ल्यूपीआरएस या संस्थेने आतापर्यंत केलेले कार्य अतिशय महत्वाचे व अभिनंदनीय आहे. भविष्यातही या संस्थेने जलव्यवस्थापन आणि हवामान बदलाचे होणारे परिणाम याबाबत नवनवीन संशोधन करावे. यापुढे धोरण ठरवितांना या संशोधनाचा निश्चित उपयोग होईल असे प्रतिपादनही उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केले.
उमा भारती म्हणाल्या की, पाणी आणि विजेच्या क्षेत्रात आपल्या समोर अनेक आव्हाने आहेत. पिण्याचे, सिंचनाचे आणि उद्योग तसेच अन्य उपयोगांसाठी पाण्याचे वाटप करताना सर्वांगिण विचार केला पाहिजे. पर्यावरणास अनुकूल विकासाची संकल्पना राबविण्यावर भर दिला पाहिजे. आपल्या देशातील नदयांची स्थिती अत्यंत गंभीर झाल्याची बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने नदयांच्या पुनरुज्जीवनासाठी व्यापक प्रकल्प हाती घेतले आहेत. गंगा नदीची सफाई हा असाच महत्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प आहे.गंगा नदी सफाई, नदी जोड प्रकल्प आदी प्रकल्पांना चालना देण्यात येत आहे. देशात अनेक प्रकल्प वर्षानुवर्षे अपूर्ण राहिल्याने त्यावरील खर्च शेकडो पटीने वाढला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यात येणार असून असे अपूर्ण असलेले 99 मोठे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
श्रीमती भारती पुढे म्हणाल्या की, धरणप्रकल्प,पूरनियंत्रण संकल्पचित्रण, जलविद्युत, बंदरे अशा क्षेत्रामध्ये सीडब्ल्यूपीआरएसचे कार्य अत्यंत महत्वपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशासाठी गौरवशाली आहे. येथील वैज्ञानिक, तंत्रज्ञांनी नदयांवर धरणे बांधताना नदयांचे आस्तित्व नष्ट होणार नाही अशा पध्दतीचे संकल्पचित्रे तयार करावीत. पर्यावरणाला सोबत घेऊन आदर्श असे मॉडेल तयार करुन जगापुढे आदर्श ठेवावा. संस्थेला आवश्यक ती सर्व प्रकारची मदत देण्यात येईल, असेही श्रीमती भारती यावेळी म्हणाल्या.
सीडब्ल्यूपीआरएस संस्थेचे भविष्य काळात लवकरच विद्यापीठामध्ये रुपांतर झाल्याचे पहायला मिळेल असे डॉ.बलियान म्हणाले. यावेळी डॉ. अमरदीप सिंग यांनी प्रास्ताविक केले. आभार सीडब्ल्यूपीआरएसचे संचालक डॉ.मुकेश कुमार सिन्हा यांनी मानले.
कार्यक्रमात उपराष्ट्रपतींच्या हस्ते संस्थेच्या शतक महोत्सवाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या पोष्ट तिकिटाचे अनावरण करण्यात आले. तसेच ‘सीडब्ल्यूपीआरएस 100 इयर्स ॲण्ड बियाँड..’ या कॉफी टेबल पुस्तकाचे तसेच ‘सीडब्ल्यूपीआरएस स्टडीज ऑन सरदार सरोवर(नर्मदा ) प्रजोक्ट’ या पुस्तिकेचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने जल हवामान शास्त्र साधनासाठी उभारण्यात येणाऱ्या शतक महोत्सवी इमारतीच्या भूमीपूजनाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.संस्थेविषयीचा माहितीपटही कार्यक्रमादरम्यान दाखविण्यात आला.



