मुंबई, दि. 31 : कोरोना संक्रमणाच्या काळात मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजसेवा केली. कोरोनाबाधित रुग्ण व गरजूंची सेवा मोठे कार्य आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्यावतीने राजभवन येथे ५० कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार आशिष शेलार व समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहीबावकर यावेळी उपस्थित होते.
राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, आरोग्य सुविधांमध्ये अतिशय प्रगत असलेल्या अनेक देशांमध्ये तेथील लोकसंख्येच्या तुलनेत कोरोना बाधितांची तसेच कोरोनाबळींची संख्या जास्त होती. भारतात मात्र हे प्रमाण अतिशय कमी होते. डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, स्वयंसेवी संस्था यांसह गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ‘जनता जनार्दनाची सेवा, हीच ईश्वरसेवा’ या श्रेष्ठ भावनेने कार्य केल्यामुळेच हे शक्य झाले.
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीने ‘कोविड कृती दल‘ स्थापन करून गणेश मंडळांच्या ४५० कार्यकर्त्यांमार्फत रक्तदान शिबिरे, योगसाधना, जंतूनाशक फवारणी, मास्क वाटप, सॅनिटायझर्स वाटप, भोजनदान अन्नधान्य वाटप, पोलिसांसाठी चहा – नाश्त्याची सोय यांसारखे उपक्रम राबविल्याबद्दल राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी समितीचे कौतुक केले.
आमदार श्री.शेलार म्हणाले, समन्वय समितीच्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळांचे शेकडो कार्यकर्ते समाजकार्यात अग्रेसर होते.
समन्वय समितीने सर्व गणेशोत्सव मंडळांना एका छत्राखाली आणून कोरोनाचे सावट असताना गणेशोत्सवाचे निर्विघ्नपणे आयोजन केले तसेच कार्यकर्त्यांची फौज उभारून कोरोनारुग्णांना मदत करणे, गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करणे यांसारखे उपक्रम राबविले, असे दहिबावकर यांनी संगितले. समितीचे कार्यकर्ते शिवाजी खैरनार यांनी समितीच्या कोविड कृती दलाच्या कार्याची माहिती दिली.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी नरेश दहीबावकर, गिरीश वालावलकर, कुंदन आगासकर, मदन कडू, वसंत मुळीक, ओमकार सावंत, निखील गुढेकर, निखील मोरये, शिवाजी खैरनार, अरुणा हळदणकर, जयंत पटेल, प्रथमेश राणे, प्रतीक जाधव, बाळकृष्ण लाड, महादेव नारकर, भूषण मडाव, संतोष सावंत, सुधाकर जयवंत पडवळ, कल्पेश राणे, मुकुंद लेले, सीमा शशिकांत मोईली, पूर्णिमा भोसले, सुरज वालावलकर, रत्नदीप चिंदरकर, प्रदीप पांडे, विपुल जाधव, कुशल कोठारे, प्रथमेश तेंडूलकर, हेमंत कल्याणकर, रितेश सावंत, सिद्धेश खानविलकर, दिनेश देवाडिगा, हर्शल जोशी, मिथिल अंगणे, अनिल यादव, गणेश गुप्ता, भूषण पाटकर, भालचंद्र मांजरेकर, निलेश शिंदे, प्रभाकर परसे, चंद्रकांत पाटील, शशांक चौकीदार, बिपीन कोटारे, संजय शिर्के, अपूर्व निकम, आदित्य नाडकर्णी, अतुल आव्हाड, प्रणय अडव आदींचा सत्कार करण्यात आला.

