नवी दिल्लीः केंद्र आणि राज्य सरकारांकडून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ज्या ठिकाणी करोनाचे अधिक रुग्ण आढळत आहेत ते भाग सील करण्यात येत आहेत. पण तरीही आज एका दिवसात देशात ७२२ रुग्ण आढळून आलेत. एका दिवसात एवढे रुग्ण आढळून येण्याची ही देशातील सर्वात मोठी संख्या आहे. लॉकडाऊनच्या १४ व्या दिवशी देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या ही ४७८९ पर्यंत पोहोचली आहे. तर १२४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर ३५२ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांची संख्या ही १ हजारांवर गेली आहे. यापैकी ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८६८ जणांवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे तामिळनाडूतही ६२१ करोना जण करोना पॉझिडिव्ह आढळून आले आहेत. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रत्येकी १३ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चपासून देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. देशातील करोनाचे रुग्ण आणि सरकारचे निर्णय यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून रोज दुपारी ४ वाजता माहिती देण्यात येते आहे. करोनाविरोधी लढाईत सरकार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहे. क्वारंटाइन केलेल्या रुग्णांवर निरीक्षण ठेवण्यासाठी तसंच अम्ब्युलन्स वेळेत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत होत आहे, असं आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं.

