पुणे: लोकसभेसाठी मित्रपक्षाने पुण्याच्या जागेवर कितीही हक्क सांगण्याचा प्रयत्न केला तरी ही काँग्रेसची परंपरागत जागा आहे. त्यामुळे ती सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट पुण्याची जागा यावेळी प्रचंड मताधिक्याने जिंकून आणण्याची शपथ आम्ही एकजुटीने घेतली असल्याचे, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.
केंद्रातील मोदी सरकारच्या ४ वर्षांच्या कारकिर्दीच्या निषेधार्थ पक्षाच्या वतीने येत्या सोमवारी (दि. २८) काढण्यात येणाऱ्या मूक मोर्चाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकारांच्या बैठकीत सर्वच नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघावर केलेल्या दाव्याची खिल्ली उडवली. या बैठकीला शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, अॅड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, नगरसेवक अविनाश बागवे, लता राजगुरू, संगिता तिवारी, नीता रजपूत, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, कामगार संघटनेचे सुनिल शिंदे, रमेश अय्यर, सुनिल पंडित आदी उपस्थित होते.
बागवे म्हणाले, आघाडी होवो अथवा न होवो पुण्याची जागा काँग्रेसच लढवणार आहे. मोदी सरकारने गेली ४ वर्षे देशातील जनतेची फसवणूक चालवली आहे. वर्षाला २ कोटी युवकांना रोजगार यासारखी आश्वासने देत मोदी सत्तेवर आले मात्र त्यांचा प्रत्येक निर्णय देशासाठी घातक ठरला आहे. नोटाबंदीमुळे उद्योग बुडाले, त्यातून नोकºया गेल्या, शिष्यवृती बंद केल्यामुळे विद्यार्थी दिशाहीन झाले. दुष्काळ संपला तरीही पेट्रोलवर लावलेला कर अजून सुरूच आहे. सर्वच बाबतीत जनतेला आश्वासित करण्यात मोदी सरकारला अपयश आहे. त्यांच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम भारतीय जनतेला सहन करावा लागतो आहे.
शिवरकर म्हणाले, लोकसभेचा पुणे मतदार संघ हा काँग्रेसचा परंपरागत मतदार संघ आहे. तो आम्ही घटक पक्षाला देऊ शकत नाही. आमच्याकडे सक्षम उमेदवारांची वाणवा नाही. पक्ष देईल तो उमेदवार मान्य करू. गटबाजीचा काय त्रास होतो त्याचा अनुभव पक्षाला आता आला आहे. त्यामुळेच गटबाजी विसरून हा मतदारसंघ परत काबीज करायचाच अशी शपथच नेते मंडळींनी एकत्रितपणे घेतली आहे. मूक मोर्चा सोमवारी सकाळी साडेदहा वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरू होईल व स्वारगेट येथील केशवराव जेधे पुतळ्याजवर विसर्जीत होईल अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
आघाडी होवो अथवा न होवो पुण्याची जागा काँग्रेसच लढवणार-बागवे
Date:

