सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह
पुणे : भारतीय संस्कृती अनेक कलाविष्कारांनी संपन्न आहे. शब्द, भाव, डोळे, बोलणे आणि वागणे अशा विविध माध्यमांद्वारे प्रत्येकजण व्यक्त होत असतो. याप्रमाणेच मनातील कल्पना कागदावर उतरविण्याचे मुख्य साधन म्हणजे चित्रकला. चित्रकलेची भाषा निराळी असून यातूनच संस्कृती विकसित होते. लहानांपासून मोठयांपर्यंत प्रत्येकामधील कलात्मकता वाढविणारी आणि कल्पनाशक्तीला दाद देणारी चित्रकला आहे. प्रत्येक कलेमागे अशाच प्रकारचे वेगवेगळे तत्त्वज्ञान दडलेले असून चित्रकलेचा उपयोग आपला बुद्धांक वाढविण्याकरीता प्रत्येकाने करायला हवा, असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी केले.
कॉंग्रेस अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचलित द.मि.कै.सि.धों.आबनावे कला महाविद्यालयातर्फे आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, माजी उपमहापौर आबा बागुल, डॉ.विकास आबनावे, प्रकाश आबनावे, पी.डी.आबनावे, शिरीष आबनावे, दिलीप आबनावे, प्रथमेश आबनावे, भक्ती आबनावे, कल्याणी साळुंखे, रुपाली राऊत, भागुजी शिखरे आदी उपस्थित होते.
अभिषेक आसोरे याने सर्व गटातून सर्वोकृष्ट पारितोषिक पटकाविले आहे. राज्यातील २७३ कला महाविद्यालये आणि पुण्यातील १६७ शाळांतील सुमारे १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध विषयांवरील कल्पक चित्रे रेखाटली होती. तब्बल ६० हजार रुपयांची रोख पारितोषिके विज्येत्यांना देण्यात आली असून सामान्य मुलांसोबत दिव्यांग मुले आणि पालकांनीही मोठया संख्येने स्पर्धेत सहभाग घेतला होता.
आबा बागुल म्हणाले, स्वत:च्या मनातील प्रश्नांना उत्तर देणारी कला म्हणजे चित्रकला. पुस्तकातील धडे वाचून परीक्षेत उत्तरे लिहिण्यापेक्षा ही वेगळी कला आहे. पुणे शहराचे प्रत्येकाच्या मनात असलेले चित्र नव्या पिढीने चित्रकलेच्या माध्यमातून रेखाटले आहे. त्यामुळे लहानमुलांमधील या सुप्त गुणांना पालकांनी वाव द्यायला हवा.
डॉ.विकास आबनावे म्हणाले, भाषा ही चित्रमय पद्धतीने मनपटलावर उमलते आणि पुढे मेंदूपर्यंत पोहोचून मनाला कळविते. त्यामुळे चित्रकलेच्या या भाषेचा उपयोग आजच्या पिढीतील बालचित्रकारांनी करावा, याकरीता पालकांनी त्यांच्यामधील कलागुण ओळखायला हवे, असेही त्यांनी सांगितले. राजा रवि वर्मा कलादालनात चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मोहन जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. रुची कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.


