कोल्हापूर- शेवटपर्यंत चुरशीच्या झालेल्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी बाजी मारत भाजपच्या सत्यजित कदम यांचा १८८३८ मतांनी पराभव केला. सत्यजित कदम ७३१७४ यांना मते मिळाली, तर जयश्री कदम यांना ९२०१२ मते मिळाली.
गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीची मतमोजणी आज झाली. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर ही निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली.
महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाइन सभेसह अनेक दिग्गजांनी सभा घेतल्या होत्या.तर भाजपाकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर कोल्हापुरात तळ ठोकून होते. त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागून होते.
एकूण २६ फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. दुसऱ्या फेरीअखेर जयश्री जाधव ३००० मतांनी आघाडीवर गेल्या. जाधव यांना ५५१५ तर सत्यजित कदम यांना २५१३ मते मिळाली. पाचव्या फेरीत जयश्री जाधव यांना 3673 मते, सत्यजीत कदम यांना 4198 मते मिळाली. पाचव्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव ६७५८ मतांनी आघाडीवर होत्या. सहाव्या फेरीत सत्यजित कदम यांना २९७२ मते मिळाली तर जयश्री जाधव यांना ४६८९ मते मिळाली.
सातव्या फेरीत जयश्री जाधव यांना १२०१ मतांची आघाडी मिळाली. सातव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना ३६३२ मते तर भाजपच्या सत्यजीत कदम यांना २४३१ मते मिळाली. आठव्या फेरीत जाधव यांना २९८१ मते तर कदम यांना ३५०५ मतं मिळाली आठव्या फेरीत भाजपचे सत्यजित कदम यांना ५२४ मतांची लिड मिळाली. नवव्या फेरीत जयश्री जाधव यांना २७४४ मते तर सत्यजीत कदम यांना २९३७ मते मिळाली. नवव्या फेरीत भाजपला १९३ मतांची लिड मिळाली.
१० फेऱ्यांमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांची आघाडी कायम राहिली. दहाव्या फेरीअखेर आतापर्यंत जयश्री जाधव यांना ३९ हजार ६०५ मते मिळाली, तर भाजपच्या सत्यजीत कदम यांना ३१ हजार ५३२ मते मिळाली. या ठिकाणीच जयश्री जाधव यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली. अकराव्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना ८१३७ मतांची आघाडी मिळाली आणि तिथेच जयश्री जाधव यांचा विजय निश्चित झाल्याचे समजताच कोल्हापुरात त्यांच्या विजयाचे बॅनर लागण्यास सुरुवात झाली.
बाराव्या फेरीमध्ये जयश्री जाधव यांना ३९४६ मते तर सत्यजित कदमांना २९०८ मते मिळाली. बाराव्या फेरीमध्ये जयश्री जाधवांना १०३८ मतांची आघाडी मिळाली. चौदाव्या फेरीअखेरीस जयश्री जाधवांनी १२,२६६ मतांची आघाडी मिळाली. पुढे ही आघाडी वाढत जाऊन अखेर अखेरच्या २४ व्या फेरीनंतर जयश्री जाधव यांचा १८८३८ मतांनी विजय झाला.
जयश्री जाधव यांच्या विजयानंतर कोल्हापुरात जल्लोष करण्यात आला.