आरोग्‍य यंत्रणेवर लक्ष केंद्रीत करा – मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्तांना सूचना

Date:

मुंबई दि. २४:  पुढील पंधरा दिवस गांभीर्याने वागण्याची गरज असून आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करा, व्यापक जनजागृती करा आणि आरोग्य व्यवस्था वाढवतांना मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यासारख्या शहरात ताकतीने काम करा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरंसिगच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,  महसुल मंत्री बाळासाहेब थोरात,  उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यसचिव अजोय मेहता,  पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल, मुंबई पोलीस आयुक्त परमवीरसिंग,   बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी, यांच्यासह शासनाच्या सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ट्रॅकिंग ॲण्ड ट्रेसिंगचे काम प्रभावीपणे करण्याच्या सुचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, विषाणुच्या चाचणीसाठी आवश्यक असणारे किटस, मास्क, व्हेंटिलेटर, रुग्णालयाची सुसज्जता  याकडे लक्ष द्यावे, मोठ्याप्रमाणात रुग्ण आल्यास तात्पुरत्या पण मोठ्याप्रमाणात सुसज्ज आरोग्य यंत्रणा निर्माण करावी. अशा रुग्णालयांच्या निर्मितीसाठी आवश्यकता असल्यास लष्कराचे मार्गदर्शन घेण्यात यावे.

गावपातळीवर काम करणारी आशा आणि अंगणवाडीसारखी यंत्रणाही सज्ज ठेवली जावी, त्यासाठी त्यांना आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यात यावे अशा सुचनाही त्यांनी दिल्या.

 मला काही होणार नाही या भ्रमात राहू नका

मला काही होणार नाही या भ्रमात राज्यातील जनतेने राहू नये, आपण  कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या अत्यंत संवेदनशील टप्प्यात पोहोचलो आहोत, त्यामुळे नागरिकांनी सरकार ज्या उपाययोजना सांगत आहे त्याला सक्ती न मानता जनहिताचे काम समजावे आणि  आवश्यकता नसेल तर घरी बसून शासनास सहकार्य करावे या आपल्या आवाहनाचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.

कामाची विभागणी करा

मंत्रालय, मुख्यालय स्तरावर प्रत्येक कामाची विभागणी करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच एक माणूस एक काम या पद्धतीने जिल्हास्तरावरही कामाची विभागणी  केली जावी, यंत्रणा सक्षमपणे कार्यरत राहावी यासाठी यंत्रणेत काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन ही त्यांनी केले.

अत्यावश्यक सेवा सुरु ठेवाव्यात

औषधे तयार करणाऱ्या आणि पुरवठा करणाऱ्या यंत्रणा चालू राहतील याची काळजी घेतली जावी. जीवनावश्यक वस्तुंची व्याख्या लोकांसाठी आणि यंत्रणेसाठी स्पष्ट करून दिली जावी

राज्यात जीवनावश्यक वस्तुंचा साठा आहे तो पोहोचवण्याची व्यवस्था उभी करावी  असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करा- अजित पवार

फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांना घराबाहेर पडण्यास मुभा असतांना आणि १४४ कलम लागू झालेले असतांना काही लोक विनाकारण बाहेर फिरतांना दिसत आहेत अशांवर पोलीसांनी तत्काळ कारवाई करावी आणि लोक विनाकारण घराबाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.  अन्ननागरी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकिय शिक्षण, पोलीस, अन्न औषध प्रशासन , नगरविकास विभागाकडून येणाऱ्या देयकांचे पेमेंट तातडीने करण्याच्या सुचना दिल्या असल्याची माहिती ही त्यांनी दिली.  खाजगी आस्थापनांमध्ये, कारखान्यात काम करणााऱ्या कामगारांचे वेतन विशेषत: रोजंदारी कामगारांचे वेतन बंद करू नये असे आवाहन ही त्यांनी केले.

जनजागृती वाढावी- बाळासाहेब थोरात

जनजागृती वाढल्यास या विषाणुविरुद्धचा लढा आपण यशस्वीपणे जिंकू शकू. त्यावर लक्ष देण्याची गरज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करावी, या विषाणुचा प्रसार झोपडपट्टयांमध्ये होणार नाही याची काळजी घेतली जावी असेही ते म्हणाले.

ब्लड कॅम्प आयोजित करण्याची गरज- राजेश टोपे

राज्यातील रुग्णालयात रक्तसाठा पुरेसा राहावा यासाठी लोक मर्यादित स्वरूपात एकत्र येतील अशा पद्धतीने आणि आवश्यक ती सर्व काळजी घेऊन ब्लड कॅम्पचे आयोजन करण्याची गरज असल्याकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लक्ष वेधले.

जीवनावश्यक वस्तु पुरवठा सुरळित राहावा- सुभाष देसाई

सगळ्या प्रकारचे इंधन, कच्चामाल, बेकरी आणि अत्यावश्यक सेवा सुरु राहाव्यात, ई कॉमर्स ला प्रोत्साहन देण्यात यावे असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यावेळी म्हणाले.

मंत्री आदित्य ठाकरे यांनी सीएसआरअंतर्गत शासनास यासंदर्भात मिळत असलेल्या सहकार्याची यावेळी माहिती दिली.

 

 

प्रभावी प्रशासनाची गरज- मुख्यसचिव

इफेक्टिव्ह पोलीसिंग आणि इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशनची गरज मुख्यसचिव अजोय मेहता यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, मंत्रालयात पॉलीसी कंट्रोल रुमची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येकाला काम वाटून देण्यात आले आहे. त्याप्रमाणे विभाग आणि जिल्हास्तरावरही कामाचे आणि जबाबदारीचे वाटप व्हावे. राज्यात १४४ कलम लागू झाले आहे. लॉकडाऊन आहे तरी लोक रस्त्यांवर फिरतांना दिसत आहेत. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी केली जावी असेही ते म्हणाले.

        कुठल्याही जाती-धर्माच्या प्रार्थनास्थळावर गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.  प्रत्येक जिल्ह्याने ट्रान्सपोर्ट प्लान तयार केला पाहिजे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणेतील कर्मचारी- अधिकारी यांना कामावर कसे  येता येईल याची माहिती त्यांना दिली पाहिजे अशा सुचनाही त्यांनी दिल्या.  ज्या खाजगी रुग्णालयात विलगीकरण वॉर्ड तयार करता येऊ शकतील त्यांना असे वॉर्ड तयार करण्याच्या सुचना देऊन त्यांची यादी मंत्रालयात पाठवली जावी असेही ते म्हणाले.

000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...