पुणे-एकीकडे बाबा बोडके,पप्पू घोलप,शाम शिंदे यांच्यासह काहींना पक्षात प्रवेश देवूनही मुख्यमंत्र्यांनी त्यांना दूरच ठेवलेले असताना आज भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी मात्र भाजपमध्ये वाल्याचा वाल्मिकी करण्याची क्षमता असल्याचे वक्तव्य करीत सर्व प्रसारमाध्यमे आणि विरोधकांचा समाचार घेत खुद्द मुख्यमंत्र्यांनाही घरचा आहेर दिला आहे .
महापालिका निवडणुकीच्या वेळी भाजपने गुंडांना प्रवेश दिला अशी टीका भाजपवर होत होती. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आल्यावरही विरोधकांनी ही टीका सुरुच ठेवली. त्या टीकेला उत्तर देताना भाजपमध्ये आल्यावर वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो असे भाजप नेते नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. त्याच बरोबर भाजपने आयात उमेदवारांना तिकीटे देऊन सत्ता आणली अशी ओरड होऊ लागली होती. विरोधकांना पक्षात घेतल्या शिवाय पक्षच वाढणार नाही असे मत गडकरी यांनी भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मांडले. मतदात्यांची संख्या तर स्थिर आहे. त्यामुळे भाजपला जी मते पडणार आहेत ती विरोधकांचीच असतील. तेव्हा विरोधी पक्षातील उमेदवारास तिकीट दिल्यास कुठे बिघडते असे त्यांनी म्हटले.
यशामुळे हुरळून जाऊ नका असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला. यशामुळे जबाबदारी वाढते याची जाणीव ठेवा असे गडकरी यांनी म्हटले. कुणाची पार्श्वभूमीवर काय आहे यावर सर्वकाही अवलंबून नाही तर आमच्यासोबत आल्यानंतर तुम्ही कसे वागता हे महत्त्वाचे आहे. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो हे लक्षात ठेवा असे गडकरी यांनी म्हटले. दिल्लीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाबदद्ल त्यांनी आनंद व्यक्त केला.