पुणे-सरकारने शेतकऱ्यांना दिलेली दोन लाखांची कर्जमाफी स्वागतार्ह आहे. मात्र ही शुद्ध फसवणूक आहे अशी टीका भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. “सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेली दोन लाखाची कर्जमाफी ही फसवणूक आहे. उद्धव ठाकरे यांनी जो शब्द दिला होता तो पाळला नाही. त्यांनी दिलेल्या शब्दावरुन यु-टर्न मारला आहे,” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
“उद्धव ठाकरे यांनी यु-टर्न मारला आहे. यु-टर्नला आता उद्धवजी टर्न म्हटलं आहे. प्रत्येक गोष्टीत ते यु-टर्न मारतात. सत्तेत आल्यानंतर मर्यादा असतील असं मान्य आहे. मात्र त्यांनी सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. सरकारने दोन लाखाची कर्जमाफी केली आहे. पण २००१ ते २०१६ या कालावधीतील दोन लाखापर्यंतचं कर्ज असलेला शेतकरीच कर्जमाफी देण्यासाठी राहिलेला नाही. आता फक्त दोन लाखावरचे शेतकरी राहिले आहेत आणि यांना कर्जमाफी दिली जाणार नाही आहे. त्यामुळे ही कर्जमाफी म्हणजे फसवणुक आहे,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.“पंकजा मुंडे व एकनाथ खडसे यांची नाराजी पक्षाची नाही. ती एखाद्या व्यक्ती, घटना यांच्याबद्दल आहे. ही नाराजी एकत्र बसून मांडायची असते. आमच्या नेत्यांची काळजी आमचा पक्ष घेईल, त्यांना कोणी ऑफर देत असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षातील लोकांची काळजी करावी,” असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.