अहमदनगर-केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते आज अहमदनगर येथे 4075 कोटी रुपये खर्चाच्या 527 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ,राज्यसभा सदस्य शरद पवार, ग्रामविकास-कामगार मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सदाशिवराव लोखंडे, सुजय विखे पाटील, महापौर श्रीमती रोहिणी शेडगे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले पाटील, आमदार अरुणकाका जगताप, बबनराव पाचपुते, श्रीमती मोनिका राजळे, संग्राम जगताप, रोहित पवार, निलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे मुख्य प्रबंधक अंनशूमली श्रीवास्तव, राजीव सिंग, मधुकर वाठोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी.बी.भोसले, अधीक्षक अभियंता जे.डी.कुलकर्णी, एस.डी.पवार आदी अधिकारी उपस्थित होते.
केवळ उसापासून नव्हे तर तांदुळ, मका आणि इतर धान्यापासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे साखरेचे रुपांतर आता इथेनॉलमध्ये करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले. इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा चांगलं तसेच स्वस्त असं हरित इंधन आहे, आपल्या भागातील सर्व वाहने शंभर टक्के इथेनॉल वर चालली गेली पाहिजेत असे ते म्हणाले. ब्राझिलच्या धर्तीवर इलेक्ट्रीक व इथेनॉलवर वाहने चालविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
आपल्या देशात गेल्या वर्षी 465 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले आणि आपल्याला साडेसोळाशे कोटी लिटर इतकी इथेनॉलची गरज आहे, त्यामुळे जेवढे इथेनॉल तयार केले जाईल तेवढे भारत सरकार घेईल,असे त्यांनी स्पष्ट केले.
आपण आपल्या देशात 12 लाख कोटी रुपयांचे कच्चे तेल, पेट्रोल डिझेल, गॅस आयात करत आहोत. भारत सरकारने इथेनॉलच्या पंपांना परवानगी दिली आहे, त्यामुळे सगळ्या साखर कारखान्यांनी आपल्या क्षेत्रात इथेनॉल पंप सुरू केले पाहिजेत असे ते म्हणाले. येणाऱ्या काळात जर इथेनॉल इंधन उत्पादित केलं गेलं तर आयातही कमी होईल आणि बारा लाख कोटी रुपयांपैकी पाच लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळतील, उसाला चांगला भाव मिळेल आणि शेतकरीही गरीब राहणार नाहीत असे ते म्हणाले.
देशात साखरेची गरज 240 लाख टन इतकी आहे, तर गेल्या वर्षी आपल्या देशात 310 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, 70 लाख टन इतकी यातिरिक्त साखर उत्पादित झाली आहे, साखर तयार करण्याऐवजी इथेनॉलचे उत्पादनावर भर दिला पाहिजे असे ते म्हणाले. भारत सरकार पॉवर परचेस एग्रीमेंट प्रमाणे पाच वर्षांकरिता इथेनॉल पर्चेस एग्रीमेंट करायला तयार आहे असेही ते म्हणाले.
आपल्या देशाच्या विकासात पाणी, वीज, वाहतूक आणि दळणवळण महत्त्वाचे आहे, देशात उद्योग आले की भांडवली गुंतवणूक येते आणि त्यामुळे रोजगार निर्माण होतो. देशातील गरीबी, उपासमारी, बेरोजगारी दूर करायची असेल तसेच गाव, गरीब, मजूर, शेतकरी यांचं कल्याण करायचे असेल तर रोजगार निर्मिती केली पाहिजे आणि रोजगार निर्मितीसाठी पाणी, वीज, वाहतूक आणि दळणवळण क्षेत्र विकसित केले पाहिजे असे ते म्हणाले.
महाराष्ट्र सरकार ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जागा उपलब्ध करून देईल तिथे लॉजिस्टिक पार्क, इंडस्त्रियल क्लसटर्स, ट्रांसपोर्ट नगर उभारण्यास तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले. साखर कारखानदारी आणि दूध उत्पादन यामुळे पश्चिम महाराष्ट्रात विकास झाला आहे असेही त्यांनी नमूद केले.
अहमदनगर मधील केडगांव येथे आयोजित 25 महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण व महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून या प्रकल्पांचे कामकाज करण्यात येणार आहे. यावेळी अहमदनगर-फलटण, अहमदनगर-जामखेड, कोपरगांव-औरंगाबाद, नांदूर ते कोल्हार आणि झगडे फाटा- कोपरगांव या राष्ट्रीय महामार्गावरील 210 किलोमीटर पर्यंत रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160, 516/अ, 61 व 548/डी यांचे भारतमाला योजनेंतर्गत दुपदरीकरण व चौपदरीकरणांच्या कामांचे तसेच केंद्रीय राखीव निधी मधून अहमदनगर जिल्ह्यात 14 अंतर्गत रस्त्यांचे दुरूस्तीकरणांच्या कामांचे भूमिपूजन यावेळी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यात 4075 कोटी रूपयांच्या निधीतून 527 किलोमीटरच्या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत.
श्री.पवार म्हणाले, गडकरींच्या केंद्रीय मंत्रिपदापूर्वी ५ हजार किलोमीटर रस्ते कामे झाली होती. ते आल्यानंतर त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून १२ हजार किलोमीटर रस्त्यांची कामे झाली आहेत. लोकप्रतिनिधी कशाप्रकारे देशाच्या उभारणीसाठी काम करू शकतात त्याचे उत्तम उदाहरण गडकरी आहेत. अहमदनगर जिल्हा शेतीमध्ये संपन्न आहे. येथील शेतकऱ्यांनी नव तंत्रज्ञानचा वापर करत शेतीपूरक उद्योगाकडे वळले पाहिजे. साखर कारखानदारांनी इथेनॉलच्या निर्मितीवर भर देणे गरजेचे आहे.
श्री.मुश्रीफ म्हणाले, शहरातील ‘उड्डाणपूल टप्पा क्रमांक दोन’च्या कामात केंद्राने मदत करावी. पुणे-औरंगाबाद मार्गाची वाहतूक जलद गतीने व्हावी, शिर्डी बाह्यवळण रस्ता, सावळी विहीर- कोपरगांव या रस्त्यांच्या कामात श्री.गडकरी अहमदनगर जिल्ह्याला मदत करतील. अशी अपेक्षा ही मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली.
खासदार सदाशिव लोखंडे, सुजय विखे पाटील यांनी ही आपले विचार व्यक्त केले.

