पहा कशी झाली अटक आणि तातडीने कसे झाले ट्विटर वॉर सुरु
रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागला रवाना झाले आहेत.
यावरुन आता विरोधी पक्ष असणाऱ्या भाजापाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी यावरुन राज्यातील महाविकास आघाडीवर टीका केली आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसने या अटकेनंतर महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी अन्वय नाईकला न्याय मिळून देण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अर्णब यांना अटक झाल्यानंतर धन्यवाद महाविकास आघाडी सरकार असं म्हटलं आहे. त्याचबरोबरच त्यांनी #JusticeForAnvayNaik हा हॅशटॅगही वापरला आहे. “अन्वय नाईकला न्याय मिळवून दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारला धन्यवाद,” असं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
फडणवीसांची ट्वीटर अस्त्रे धडाडली
गोस्वामी यांच्या अटकेवरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम असल्याचं ते म्हणाले आहेत.देवेंद्र फडणवीस यांनी अटकेच्या कारवाईचा विरोध करत ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे”.
अर्णब गोस्वामी यांना अटक कशासाठी ?
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.
मुंबईतील ५२ वर्षीय इंटिरियर डिझायनर (अंतर्गत वास्तुरचनाकार) अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबागजवळील कावीर येथे आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी ‘रिपब्लिक टीव्ही’चे अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरुद्ध अलिबाग पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला. अर्णब व अन्य दोघांनी नाईक यांचे पैसे थकवल्याने ते निराश झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे याचवेळी नाईक यांच्या ७३ वर्षांच्या आई कुमुद यांचाही मृतदेह घरात सापडला होता.मुळचे कावीर येथे राहणारे अन्वय नाईक हे मुंबईत व्यवसायानिमित्त राहत होते. अन्वय हे मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाने अंतर्गत वास्तूरचना आणि सजावटीचा व्यवसाय करायचे. आत्महत्येच्या एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी ४ मे रोजी अन्वय कावीर येथील आपल्या घरी आले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी तेथील नोकरांना त्यांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. तर त्यांच्या आईचाही मृतदेह तिथेच होता. पोलिसांना त्याठिकाणी आत्महत्येपूर्वी लिहिलेली जी चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीमध्ये अर्णब गोस्वामीसह, आयकास्ट स्लॉशस्काय मिडियाचे फिरोज शेख, मगरपट्टा येथील ‘स्मार्ट वर्क्स ’चे नितेश सारडा या तिघांनी केलेल्या कामाचे पैसे थकवल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे.या आत्महत्येनंतर नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा या तिघांची नावे लिहिली होती. तसेच नाईक यांच्या पत्नीनेही दिलेल्या तक्रारीवरून या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तत्कालीन पोलीस अधीक्षक अनिल परस्कार यांनी दिली होती.

