पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महाराष्ट्राने देशात कोरोना पसरवला’ असे विधान केले होते.त्यांच्या या विधानाचे पडसाद पुण्यात उमटले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले.
या वेळी बोलताना जगताप म्हणाले कि ज्यांनी आयुष्यभर केवळ द्वेषाचं राजकारण केलं ते आजही दोन जातींमध्ये, दोन धर्मांमध्ये, दोन राज्यांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात उभी फूट पडणारा पंतप्रधान या देशाने कधीच बघितला नव्हता जो आज आपण नरेंद्र मोदींच्या रुपात बघत आहोत. १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे, महाराष्ट्राचा अवमान करून नरेंद्र मोदींनी त्यांच्या बलिदानाचाही अवमान केला आहे. महाराष्ट्रातील भाजपचे नेतेही नरेंद्र मोदींच्या गुलामगिरीत गुंग असल्याने त्यांनाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी काहीही देणेघेणे नाही. महाराष्ट्रातील, देशातील जनता येत्या काळात भाजपला धडा नक्की शिकवणार अशी संतप्त भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.
यावेळी महानगपालिकेतील विरोधीपक्षनेत्या महानगरपालिकेतील सौ. दिपाली धुमाळ, प्रदेश प्रतिनिधी प्रदीप देशमुख,महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, माजी नगरसेविका शशिकला कुंभार, शहर समन्वयक महेश हांडे, कार्तिक शिंदे, पूनम पाटील , सुवर्णा सावर्डे, किरण कद्रे, श्वेता मिस्त्री, प्रीती धोत्रे, राखी श्रीराव, सानिया झुंजारराव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

