“दुकानाची किल्ली सरकार दरबारी”
व्यापारी महासंघातर्फे अभिनव आंदोलन
पुणे- पुण्याचे पोलीस आमचे दुश्मन नाहीत , त्यांच्या सुरक्षेनेच आमचा व्यवसाय सुरळीत चालतो , पण आता लॉकडाऊन गळ्याशी आलाय ..पोलिसांशी आम्हाला वाद तर घालायचाच नाही , पण एक तर सर्व दुकानांच्या चाव्याच तुम्ही ताब्यात घ्या .. आणि तुम्ही त्या घेत नाहीत तर सोमवार पासून मात्र आम्ही सकाळी १० ते ७ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवणार साहेब ..पुन्हा म्हणाल सांगितले नाही .. अशा आशयात ,शब्दात पुण्याच्या व्यापारी महासंघाच्या शिष्ठमंडळाने आज दि. ०७ ऑगस्ट २१ रोजी अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे यांची भेट घेतली परंतु संजय शिंदे यांनी विनम्रपणे चाव्या स्वीकारण्यास नकार दिला.
पुण्यातील दुकानाची वेळ सकाळी १० ते रात्री ७ वाजेपर्यंत वाढवून द्यावी अशी पुणे व्यापारी महासंघातर्फ जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये तसेच पुणे शहरातील कोरोना पॉझीटीव्हिटी दर व मृत्यू दर कमी झाला असतानाही पुण्यातील निर्बध कायम ठेवल्यामुळे छोटे, मोठे व्यापारी त्रासले आहेत. त्यामुळे आता कारवाईची तमा न बाळगता त्यांनी शांततेने आंदोलन करण्यास सुरवात केली आहे. पोलिसांशी आम्ही वाद घालणार नाही पण व्यवसायासाठी दुकानेही बंद करणार नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दुकाने ४ वाजल्यानंतरही ७ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास सुरवात केली आहे. व्यापाऱ्यांनचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून कमी वेळेत, कमी व्यवसायात सर्व Tax, GST, Income Tax, Poperty Tax, Light Bill, कर्ज, बॅकेचे हप्ते, दुकान व घरभाडे, कर्मचारी पगार, घरखर्च इ. भरून प्रशासनाने सद्य स्थितीत व्यवसाय चालवून दाखवावा असे आवाहन करत शहरातील दहा हजार पेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांच्या चाव्या प्रशासनाकडे सुपूर्त करण्यासाठी व्यापारी महासंघाच्या स्वाधीन केल्या.या सर्व चाव्या प्रशासनाकडे सुपूर्त करण्यासाठी हे शिष्टमंडळ पोलीस दरबारी दाखल झाले होते.
प्रशासकीयदृष्ट्या पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व उर्वरित जिल्हा हे तीनही वेगवेगळे घटक आहेत. पुणे शहरातील करोना रुग्णांची संख्या सतत कमी होत असून निर्बंध मात्र कायम आहेत. मुंबईचा विचार करताना राज्य सरकारने मुंबई महापालिका हद्द असा विचार केला आहे परंतु पुण्याचा मात्र शहर म्हणून विचार न करता पुणे जिल्हा म्हणून विचार होत असल्याने, लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करूनही निर्बंध अजूनही शिथिल झाले नाहीत.
पालकमंत्रांच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होईल अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा असून दुर्दैवाने तसा निर्णय न झाल्यास नाईलाजास्तव सोमवारपासूनही दुकाने रात्री ७ वाजेपर्यंत चालू ठेवण्यात येतील.ह्या प्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया, मनोज सारडा, नितीन काकडे, भरत शहा, सुरेश जेठवानी, अभय व्होरा, रवींद्र जोशी, प्रमोद शहा, मिलिंद शालघर ई. उपस्थित होते.

