पुणे -‘ईडी’ने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर त्यांना अटकही करण्यात आली. ईडीने केलेल्या या कारवाई विरोधात आज पुण्यात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीने बालगंधर्व चौकात निषेध आंदोलन केले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले कि, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला विनयशील राजकारणाचा संमृद्ध वारसा दिला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व नेत्यांनी तो वारसा जपला आणि वाढवला. भारतीय जनता पार्टीने मात्र या परंपरेला हरताळ फासत सुडाचे राजकारण सुरु केले. भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर पडू लागताच भाजपच्या वतीने केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग सुरु झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाविकास आघाडी सरकारला खाली खेचण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी याचा तीर्व आंदोलन करत भारतीय जनता पार्टीचा निषेध केला. आमदार चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा मागितला यावर प्रतिक्रिया देताना “नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील ६३% मंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, म्हणून राजीनामा मागायचा असेल तर आधी नरेंद्र मोदींचा राजीनामा मागावा” असे आवाहन प्रशांत जगताप यांनी केले. या आंदोलनात शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ,प्रदीप देशमुख, मृणालिनीताई वाणी,रुपाली ठोंबरे पाटील,किशोर कांबळे,सुषमा सातपुते, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

