पुणे- उन्हाचा पारा वाढतोय आणि चारा -पाण्याच्या शोधात हजारो पक्षी कासावीस होताहेत. दरवर्षी उन्हाच्या तीव्र झळा आणि पाणी न मिळाल्याने हजारो पक्षी तडफडून प्राण सोडतात मात्र गेल्या सहा वर्षांपासून पक्ष्यांसाठी ‘पाणी ठेवण्याचा उपक्रम राबविला जात आहे आणि पाणीदानाची ही चळवळ व्यापक होत आहे. विशेष म्हणजे पक्ष्यांना वाचविण्यासाठी फक्त एक एसएमएस करा आणि घरपोच मोफत भांडे मिळवा ही संकल्पनाच पक्ष्यांसाठी आधारवड ठरली आहे.
माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल हे हा अभिनव उपक्रम गेल्या सहा वर्षांपासून राबवित आहेत.
सद्यस्थितीत उन्हाची तीव्रता वाढली आहे,साहजिकच सर्वांच्या जीवाची घालमेल होत आहे. माणसांची ही स्थिती मग मुक्या जीवांचे काय हाल होत असतील नेमका हा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन अमित बागुल आणि सहकाऱ्यानी उन्हाळ्यात पाणी न मिळाल्याने तडफडून प्राण सोडणाऱ्या हजारो पक्ष्यांना वाचविण्यासाठी पक्षांच्या हक्काचे पाणी ही चळवळ उभी करण्याचा निर्णय सहा वर्षांपूर्वी घेतला आणि पक्ष्यांसाठी कुंभाराकडून खास मातीचे भांडे बनवून घेण्यात येते . जनजागृतीसाठी पत्रकांचे वाटप करून घरालगत , टेरेसवर पक्ष्यांना पाणी ठेवण्याचे आवाहन केले. मात्र जे खरच पक्ष्यांसाठी भांडे ठेवतील अशाच लोकांना भांडे देण्यासाठी एक एसएमएस करा आणि मातीचे भांडे मोफत घरपोच देण्याची संकल्पना राबविली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि आता सहाव्या वर्षात या उपक्रमाने पदार्पण केले आहे आजमितीस या उपक्रमांतर्गत सुमारे आठ हजार मातीचे भांडे घरपोच स्वतः अमित बागुल , सागर आरोळे , श्री गीता सोसायटी चे चेअर मन शाह, कामत , डॉ अविनाश भूतकर इमत्याज तांबोळी आणि इतर सभासद यांच्यासह आदी सहकार्यांनी पोहचविले आहेत.केवळ सहकारीच नव्हे तर नागरिकही या पक्षांच्या हक्काचे पाणी चळवळीमध्ये सक्रिय सदस्य म्हणून सहभागी झाले आहेत.

