पुणे- स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाबाबत राणे यांनी केलेलं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.या प्रकरणी नाशकात गुन्हा दाखल झाल्याने पोलीस आयुक्तांनी राणेंना अटक करण्यासाठी आपले पोलीस पथक चिपळूण ला धाडले आहे. केंद्रीय मंत्री असलेल्या राणे यांना ते अटक करू शकतील काय ? हा प्रश्न असताना हे पथक धाडल्या ने फार तर हे पथक समन्स देऊन माघारी येईल असेही सांगितले जातेय .
महाड, नाशिक नंतर पुण्यातही नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राणे सध्या चिपळूणमध्ये आहेत. तिथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. सामाजिक तेढ निर्माण होऊन कायदा व शांतता बाधित होईल असे चिथावणी देणारे वक्तव्य दिले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिक पोलीस आयुक्त यांनी नारायण राणे यांना अटक करावी असे आदेश काढले. नारायण राणेंविरोधात कलम 500, 502, 505, 153 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. नाशिक पोलिसांची टीम कोकणच्या दिशेने रवाना झाली आहे. सोमवारी राणे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले. शिवसेना नेते, कार्यकर्त्यांनी यांनी हे वक्तव्य गांभीर्याने घेत कारवाई करण्याची मागणी केली.
अशा वक्तव्याप्रकरणी कारवाई करता येते का याबाबत कायदेशीर चाचपणी केल्यानंतर शिवसेना नेत्याने सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल केला आहे.नारायण राणे यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून, असं वक्तव्य करणाऱ्यांचे हात छाटण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे हे त्यांनी विसरु नये, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.
केंद्रीय मंत्रीपदी असलेले राणे सध्या जनआशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागांना भेट देत आहेत. यात्रेदरम्यान राणे यांनी शिवसेनेवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर टीका केली होती.
दरम्यान युवा सेनेच्या सदस्यांना आमच्या जुहू येथील घराबाहेर जमण्याचे आदेश दिल्याचं समजतं. मुंबई पोलिसांनी त्यांना थांबवावं अन्यथा काही घडलं तर आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. सिंहाच्या गुहेत शिरण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही वाट बघत आहोत असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
राणे यांच्या वक्तव्यानंतर कोंबडी चोर अशी पोस्टर्स दादर भागात लावण्यात आली होती. त्यावर नारायण राणेंचा फोटो होता. पोलिसांनी पोस्टर्स हटवली आहेत.
‘सीएम-बीएम गेला उडत, आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका’
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चिपळूण दौऱ्यादरम्यान कुणीही अधिकारी उपस्थित नसल्यानं, राणेंनी संताप व्यक्त केला होता.तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का?” असं राणे म्हणाले होते.
काय म्हणाले होते राणे?
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयातील ध्वजारोहण पार पडल्यानंतर त्यांनी उपस्थितांसमोर भाषण केले.त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर भाषणाच्या दरम्यान मात्र त्यांचा गोंधळ उडाला. हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरकमहोत्सव? यावरून मुख्यमंत्री गोंधळलेले दिसले असं ते म्हणाले.बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असतं”, असं वादग्रस्त वक्तव्य केलं नारायण राणे यांनी केलं आहे.”देशाच्या स्वातंत्र्य दिनाविषयी तुम्हाला माहिती नसावी? मला सांगा किती चिड येणारी गोष्ट आहे, असंही राणे म्हणाले. सरकार कोण चालवतंय ते कळत नाही, सरकारला ड्रायव्हरच नाही”, अशी टीका देखील त्यांनी केलीय. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर देखील निशाणा साधला आहे.

