मुंबई-मुंबईत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा २९ वा वर्धापन दिन समारंभ संपन्न होणार असल्याचे राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले .
त्या म्हणाल्या ,’येत्या २५ जानेवारीला राज्य महिला आयोगाच्या स्थापनेला २९ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने मुंबईतील मध्ये यशवंतराव चव्हाण केंद्रातील ‘रंगस्वर सभागृहात’ २९ व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम होणार आहे. २५ जानेवारी १९९३ रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना झाली होती.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे नेते ,खासदार शरद पवार उपस्थित राहणार आहेत. यासोबत महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, विधानसभा उपसभापती निलम गोऱ्हे, महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष ज्योती ठाकरे, पोलीस महासंचालक संजय पांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यासोबत श्रीमती प्रियांका सावंत, श्रीमती निर्मला सावंत-प्रभावळकर, श्रीमती विजया रहाटकर,श्रीमती सुशिबेन शाह या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. तसेच चंद्रा अय्यंगार, अ.ना. त्रिपाठी, आस्था लूथरा, श्रद्धा जोशी, या महिला आयोगाच्या माजी सदस्य सचिव देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
महत्वाची बाब म्हणजे कार्यक्रमात राज्यभरातील महिलांसाठी टोल फ्री क्रमांकाचे अनावरण करण्यात येणार आहे. सोबतच महिला आयोगाने तयार केलेल्या कॅलेंडर व डायरीचे देखील अनावरण या दिवशी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम सोहळा कोरोनाचे सर्व निर्बंध लक्षात घेऊन ४५ लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

