पुणे-खराडी येथील व्हर्टीलास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीतील 100 हून अधिक सदनिकाधारकांनी बुधवारी आपल्या हक्काच्या घरासाठी धरणे आंदोलन केले. 95 टक्के रक्कम भरूनही गेल्या दोन वर्षांपासून घरांचा ताबा मिळत नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप आहे. या प्रकल्पात तब्बल 200 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे की, जर दहा दिवसांत घराचा ताबा मिळाला नाही, तर आत्मदहन किंवा इमारतीवरून उडी मारण्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागेल.

सदनिकाधारकांच्या म्हणण्यानुसार, बिल्डरने घराचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यानुसार 95 टक्के रक्कम जबरदस्तीने वसूल केली. मात्र, मुदत उलटून दोन वर्षे झाली तरी प्रकल्प अपूर्णच आहे. सुमारे 130 रहिवाशांनी प्रत्येकी 1.40 कोटी रुपये याप्रमाणे 200 कोटींपेक्षा अधिक रक्कम भरली असूनही प्रकल्पात कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही.
या प्रकरणी महारेरा आणि पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. उलट पोलिसांकडून दडपशाही होत असल्याचा दावाही करण्यात आला. हा केवळ निष्काळजीपणा नसून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


