पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्टार्ट अप, स्टॅन्ड अप इंडियासाठी तरुणाईला संशोधन संधी मिळाव्यात यासाठी इनोव्हेशन हब तयार करावे. यासाठी योग्य ती सर्व प्रकारची मदत राज्य शासनाकडून केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सर्वश्री विजय काळे, लक्ष्मण जगताप, जयदेव गायकवाड, महेश लांडगे, श्रीमती माधुरी मिसाळ, महापौर दत्तात्रय धनकवडे, कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे, कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, मालोजी राजे, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, पुणे विद्यापीठाचे नाव देशात आणि जगातही आदराने घेतले जाते आहे. आज भारतांमध्ये 60 ते 70 कोटी तरुणाई आहे. त्यांना असिमीत संधी आहेत. समाजाच्या प्रत्येक समस्येवर संशोधन करण्याची, समाजाच्या अडचणी दूर करण्याचा ही तरुण पिढी विचार करीत आहे. अमेरिकेतील सिलीकॉन व्हॅलीतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मुख्य बुद्धी भारतीयांची आहे. सिंगापूरमध्येही मुख्य बुद्धी भारतीयांचीच आहे. आज समाजापुढील आव्हाने सोडविण्यासाठी, तरुणाईला संशोधनासाठी संधी मिळावी यासाठी विद्यापीठात इनोव्हेशन हब तयार करावे. यासाठी शासन मदत करण्यास तयार आहे.
राज्यातील महापालिकाच्या विकास आराखड्यामध्ये वसतीगृहांसाठी आरक्षण ठेवावे, असे आदेशच देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे पुणे महानगरपालिकेने या विद्यापीठाच्या वसतीगृहांना जादा एफएसआय द्यावा. मुला-मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी, म्हणून वसतीगृहाच्या बांधकामास राज्य शासन आर्थिक मदत करेल, असा प्रस्ताव विद्यापीठाने द्यावा, असेही ते म्हणाले.
छत्रपती शाहू महाराजांसारखे द्रष्टे नेते महाराष्ट्राला लाभले. त्यात शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले आणि समाजाच्या भल्याचे अनेक निर्णय घेतले त्यानंतर शाहू महाराजांनी अनेक निर्णय घेतले. त्यामुळेच आपले राज्य अनेक क्षेत्रात आघाडीवर आहे. आपल्या जनतेला न्याय दिला. शाहू महाराजांनी विविध कामे करून एक द्रष्टा राजा कसा असू शकतो, याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. त्यांनी समाज सुधारणेचे अद्वितीय काम केले आहे. मोफत व सक्तीच्या शिक्षणाची गरज त्यांनी शंभर वर्षापूर्वी ओळखली होती, म्हणूनच सुदृढ समाज निर्मितीसाठी प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे हे आता सगळ्यांना कळाले आहे. जाती व्यवस्था व भेदाभेदाने विखुरलेल्या या समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी विविध ठिकाणी शाळा, वस्तीगृहे सुरु केली. शिष्यवृती देण्यासाठी संस्थांनाचा खजिना उघडा केला. आधुनिक समाज घडविण्याचे काम त्यांनी केले. आरक्षण धोरणाचा दूरदर्शी आणि धाडसी निर्णय घेऊन कमजोर घटकांसाठी 50 टक्के आरक्षण ठेवून खऱ्या अर्थाने समानतेची बिजे त्यांनी रोवली, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबडेकरांना मदत करुन वंचितासाठी मंच तयार करण्याची प्रेरणा दिली. डॉ. आंबेडकरांनी समतेचे बीजरोपण संविधानात केले पण या विचारांचे बीजरोपण छत्रपती शाहू महाराजांनी केले, असेही ते म्हणाले.
आंतरजातीय विवाह आपल्या स्वत:च्या घरात सुरु करुन जातीभेदाला मूठमाती देण्याचा आदर्श शाहू महाराजांनी घालून दिला. स्त्रियांना समान अधिकार, स्त्री पुरुष भेदभावरहित समाजच पुढे जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. पुढारलेल्या देशात स्त्री पुरुष मनुष्यबळाचा ज्या देशांनी उपयोग केला तीच राष्ट्रे पुढे गेली, त्यामुळे आपल्या राज्यात स्त्री-पुरुष भेदभाव खपवून घेतला जाणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
छत्रपती शाहू महाराजांचे विचार आपण समजून घेतले पाहिजेत. विकासाची सर्वांगीण दूरदृष्टी बाळगणाऱ्या या महामानवाचा पुतळा विद्यापीठामध्ये उभा राहिला आहे. तो केवळ जयंती व पुण्यतिथीच्या निमित्ताने फुले वाहण्यासाठी नसून त्यांच्यापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन तसे काम केले पाहिजे. यासाठी महाराजांच्या कार्याची माहिती एका दृष्टिक्षेपात विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून विद्यापीठाने एक हॅन्डबुक तयार करुन विद्यार्थांना त्याचे वाटप करावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
पालकमंत्री श्री. बापट म्हणाले, विद्यापीठात छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यामुळे आम्हाला महाराजांचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळेल. विद्यापीठात अनेक भागातून विद्यार्थी येतात. त्यांच्यासाठी वसतीगृहातील जागा कमी पडते. महानगरपालिकेने वसतीगृहासाठी जादा एफएसआय मंजूर केला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या विद्यापीठातून शिक्षण द्यावे. त्यांना शैक्षणिक व वसतीगृहाची सुविधा मिळावी यासाठी आपण प्रयत्न करु.
श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, महाराजांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व औद्योगिक अशा विविध प्रकारचे कार्य उल्लेखनीय असून ते कदापि विसरता येणार नाही. शिक्षणाची गरज आजही मोठी आहे. तथापि त्यात गुणात्मक बदल होणे गरजेचे असून त्यामुळेच आर्थिक प्रगती होईल. पुणे विद्यापीठास सावित्रीबाई फुलेंचे नाव दिले ही चांगली गोष्ट असून स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त अधिकार असले पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर समारंभाची सुरुवात विद्यापीठगीताने झाली. यावेळी ई-कंटेन्ट डेव्हलपमेंट ॲण्ड लर्निंग वेबपोर्टलचे उद्घाटन, तसेच छत्रपती शाहू महाराजाच्या पुतळ्याचे मूर्तीकार एस. व्ही. परदेशी यांचा सत्कारही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला


