पुणे, – समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गांतील आणि खासकरून झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या
विद्यार्थ्यांना मोफत दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने राजीव गांधी अॅकेडमी ऑफ ई-लर्निंग स्कूल आणि
ज्यूनियर सायन्स कॉलेजची स्थापना करण्यात आली आहे. येथील विद्यार्थ्यांनी जेईई मेन (जेईई मुख्य – 2015)
परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवून हा उद्देश साध्य केला आहे. ही केवळ सुरूवात असून हाच प्रयोग पुणे
महापालिकेच्या अन्य शाळांमध्ये राबविण्याची योजना आहे, अशी माहिती पुण्याचे उपमहापौर उल्हास उर्फ आबा
बागुल यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना श्री. बागुल म्हणाले, की पुणे महापालिकेने 1 ऑगस्ट 2013 पासून
शिवदर्शन, सहकार नगर येथे राजीव गांधी अॅकेडमी ऑफ ई-लर्निंग स्कूल आणि ज्यूनियर सायन्स कॉलेज सुरू
केले. सरकारी आणि खासगी भागीदारीचे हा प्रकल्प एक उत्तम उदाहरण असून पेस एज्युकेशनल ट्रस्ट, मुंबई या
संस्थेद्वारे हे ज्यू. कॉलेज चालविले जाते.
या महाविद्यालयात पहिल्या वर्षी 176 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता. त्यातील 40 जण पुणे पालिकेच्या
शाळांमधून होते आणि 16 विद्यार्थी पुणे पालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातून आले होते.
यातील सुमारे 168 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली. या 168 विद्यार्थ्यांपैकी 156 विद्यार्थ्यांनी जेईई मेन,
बीआयटी-सॅट, व्हीआयटी सॅट आदी यांसारख्या विविध अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा दिल्या आहेत. 156
विद्यार्थ्यांपैकी 151 विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षा दिली तर 12 विद्यार्थ्यांनी एआयपीएमटी व एनएचटी-सीईटी
यांसारख्या वैद्यकीय परीक्षांची तयारी केली आहे.
ते म्हणाले, “इंजिनियर किंवा डॉक्टर होण्याचे या विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचे
सशक्तीकरणही करण्याचे प्रयत्न शाळेच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. केवळ परीक्षा देऊन न थांबता परीक्षा
दिलेल्या या महाविद्यालयातील 151 विद्यार्थ्यांपैकी 69 विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्डसाठी (म्हणजेच 21
आयआयटीच्या प्रवेशासाठी) पात्र ठरले आहेत. उत्तीर्णांचे हे प्रमाण 46 टक्के असून या पात्र ठरलेल्या 69
विद्यार्थ्यांपैकी 57 विद्यार्थी सामान्य वर्गातून आणि 12 विद्यार्थी मागासवर्गातून पुढील फेरीसाठी निवडले गेले
आहेत. पुणे महापालिकेसाठी खरोखर हा अभिमानाचा क्षण आहे.”
या संस्थांव्यतिरिक्त बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (3000 जागा असलेले 4 बिट्स) व वेल्लोर
इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, एसआरएम, मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इ. अन्य आघाडीच्या
संस्थांमध्ये प्रवेशासाठीही विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. वैद्यकीय प्रवेश परीक्षांची प्रक्रिया चालू आहे आणि त्यांचे
निकाल जून 2015 मध्ये जाहीर होतील. आमच्या 12 विद्यार्थ्यांनी या परीक्षांसाठी तयारी केली आहे आणि
त्यांच्या निकालांची प्रतीक्षा आहे, असेही श्री. बागुल यांनी सांगितले.
पुणे पालिकेने पुरविलेल्या पायाभूत सोईसुविधा आणि पेस एज्युकेशनल ट्रस्टचे संचालक श्री. प्रवीण
त्यागी यांनी पुरविलेल्या उत्तम शिक्षकांमुळे हे यश मिळाले आहे, असे ते म्हणाले.
भविष्यातील योजनांबाबत बोलताना श्री. बागुल म्हणाले, “पालिकेच्या राजीव गांधी अॅकेडमीने पुण्यातील
कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालयाच्या दृष्टीने आतापर्यंतचे सर्वात लक्षणीय निकाल दिले आहेत. एकदा हा
प्रयोग यशस्वी झाला म्हणजे ही सुविधा पुणे पालिकेच्या आणखी 3-4 शाळांमध्ये देण्याची आमची योजना आहे.
राजीव गांधी अॅकेडमीतील आणखी विद्यार्थ्यांपर्यत सुद्धा ही सुविधा पुरविण्याची आमची योजना आहे. सध्या
आम्ही 240 जागांवर प्रवेश देण्याची मंजुरी दिली आहे आणि या शैक्षणिक वर्षापासून आणखी 240
विद्यार्थ्यांपर्यंत ही प्रक्रिया पोचविण्याची प्रक्रिया सुरू आहे.”
पालिका शाळांमधील व समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गांतून निवडलेल्या विद्यार्थ्यांसाठी येथे
पायाभरणी कार्यक्रम (फाऊंडेशन बिल्डर प्रोग्राम) चालवण्यात येतो. आयपीएम, एमटीएसई, आरएमओ,
एनएसओ, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा, होमी भाभा बाल वैज्ञानिक, ज्यूनियर सायन्स
ऑलिम्पियाड यांसारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते किंवा
तयारी करून घेण्यात येते.
सर्वांना, खासकरून वंचित गटांना, दर्जेदार शिक्षण देण्याचे हे ध्येय साध्य करण्याकरिता संपूर्ण
पुण्यातील 50 प्रतिभावंत विद्यार्थिनींना राजीव गांधी अॅकेडमीत मोफत निवास व भोजन व्यवस्थेसह
महिला व बाल कल्याण विभाग, महाराष्ट्र सरकार यांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याची आमची योजना
आहे, अशी माहिती त्यांनी दिली.