मुंबई-
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात लेटर वॉर सुरू झाले होते. या पार्श्वभूमीवर माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. या भेटीन मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या कामाचे कौतुक केले, सोबतच समन्वयातून काम करण्याच्या सूचनाही दिल्या.
शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात विभागीय बैठकीवरून थेट मानापमान नाट्य रंगले आहे. माधुरी मिसाळ यांनी नुकतीच सामाजिक न्याय विभागाशी संबंधित विभागीय बैठक घेतली होती. या बैठकीवर नाराजी व्यक्त करत मंत्री संजय शिरसाट यांनी मिसाळ यांना पत्र लिहित, तुम्ही माझ्याकडील विषयावर बैठक घेतलीत, पुढे अशा बैठका माझ्या अध्यक्षतेखाली घेतल्या जाव्यात, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यानंतर माधुरी मिसाळ यांनीही मी बैठक घेण्यासाठी अधिकृतपणे पात्र आहे, असे प्रत्युत्तर संजय शिरसाटांच्या पत्राला पत्रानेच दिले.
या सर्व घडोमोडींनंतर सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सामाजिक न्याय विभागाच्या कामाचे कौतुक केले. तसेच समन्ववायातून उत्तम करावे, अशा सूचनाही देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. या भेटीमुळे संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ वादावा अखेर पडदा पडल्याची चर्चा आहे.
शिरसाट-मिसाळ यांच्या वादाचे मूळ 11 मार्च 2025 च्या शासन निर्णयात आहे. यानुसार सामाजिक न्याय विभागातील विषयांचे वाटप मंत्री शिरसाट आणि राज्यमंत्री मिसाळ यांच्यात विभागण्यात आले आहे. याच आदेशाचा आधार घेत शिरसाट यांनी बैठकीच्या अधिकारावर प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, मिसाळ यांनी केवळ शिरसाट यांच्या पत्राला उत्तर दिले नाही, तर त्यांनी तो वादग्रस्त मुद्दा थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला आहे. आपल्या अधिकारांचा वापर करताना काही चुकीचे होत असेल, तर मुख्यमंत्री कार्यालय निर्णय देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मिसाळ यांच्या पत्रावर शिरसाटांची प्रतिक्रिया
माधुरी मिसाळ यांच्या पत्रानंतर संजय शिरसाट म्हणाले की, माधुरी मिसाळ यांना पत्र लिहण्याचा माझा स्पष्ट उद्देश होता की काही विषय असतात की ज्यामध्ये राज्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही. पुढे ते म्हणाले, मिसाळ चांगले काम करत आहेत. त्या काही मला आव्हान देत नाहीत. माधुरी मिसळ यांना मी जे पत्र लिहले ते केवळ सहकारी म्हणून त्यांना सूचना देण्यासाठी मी पत्र लिहले आहे. महायुतीमध्ये काही वाद आहे असा त्यांचा अर्थ नाही.

