पुणे – गदिमांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले आणि बाबुजींनी स्वरसाज चढवलेले गीतरामायण हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. या गीतरामायणात पहिल्यापासून माझा सहभाग होता. सुरूवातीला गीतरामायणात बाबुजींचा सहाय्यक आणि नंतर कार्यक्रमातील साथीदार म्हणून गीतरामायणाला मी त्याला चिकटूनच बसलो होतो. त्यामुळेच माझ्यातील संगीतकारावर गदिमा आणि बाबुजींच्या गीतरामायणाचे संस्कार आहेत अशी दिलखुलास प्रतिपादन ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांनी येथे केले. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.
गीतरामायणाच्या हिरक महोत्सवीवर्षानिमित्त यंदाचा मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानचा स्वरप्रतिभाचा दिवाळी अंक गीतरामायणावर काढण्यात आलेला आहे. या दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ट गायक श्रीधऱ फडके, गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीधर माडगूळकर यांच्या हस्ते झाले. लोकमान्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून जोग बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर आबा बागूल उपस्थित होते. यावेळी प्रभाकर जोग, श्रीधर फडके आणि श्रीधर माडगूळकर यांचा स्वरप्रतिभा दिवाळी अंकातर्फे पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर अंकाचे संपादक प्रवीण वाळिंबे, सहसंपादक राजा महाजन आणि अमृता संभूस उपस्थित होते.
प्रभाकर जोग म्हणाले, गीतरामायणाच्या प्रतिभेला तोड नाही. गदिमांनी साध्या सरळ शब्दात मांडलेले भावविश्व आणि तितक्याच सुरेल पद्धतीने बाबुजींनी त्याला दिलेली चाल यामुळे गीतरामायणाची गोडी अधिकच वाढली अन रसिकांच्या जिभेवरून मनात उतरली. आकाशवाणीवर गीतरामायणाच्या सुरूवातीपासून मी बाबूजींचा सहाय्यक म्हणून काम करत होतो. त्यानंतर सुमारे गीतरामायणाच्या ५०० कार्यक्रमांमध्ये बाबूजींना मी व्हायोलिनची साथ केलेली आहे. यावेळी त्यांनी चला राघवा बघाया जनकाची मिथिला….या गाण्याच्या वेळी घडलेल्या प्रसंगाला उजाळा दिला. ज्येष्ट तुझा पुत्र मला देई दशरथा…या गाण्याच्या निमित्ताने आपल्यातील संगीतकाराला कशी संधी बाबुजींनी दिली हे उलगडून सांगितले. या सगळ्याचा आपल्या संगीतजीवनावरही परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले.
संगीतकार श्रीधर फडके म्हणाले, ३१ मार्च १९५५ या दिवशी गीतरामायणाचा प्रारंभ झाला. याच निमित्ताने गदिमा आणि बाबुजी एकत्र आले. त्यावेळी गाण्याची हस्तलिखिते आणण्यावरून थोडा वाद झाला होता. आणि असे वाद पुढेही होत राहिले पण त्यात गीतरामायणाबद्दलचे प्रेमच होते. पहिलं गाणं रेकॉर्ड होणार होते त्या दिवशी मला ताप आल्याने नायडू रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाबूजी गाण रेकॉर्ड करून रात्री अडीचवाजता मला बघायला रूग्णालयात आले होते. गदिमा आणि बाबुजींकडे मोठी प्रतिभा होते. त्यामुळे जेवढे सोपे शब्द गदिमांनी लिहिले त्याला पूर्णत: महत्व देत बाबुजींनी चाली बांधल्या. गीतरामायणातील सर्वच्यासर्व म्हणजे ५६ गाणी ही वेगवेगळ्या रागांवर आधारित आहे. एकही राग पुन्हा वापरलेला नाही.
स्व. यशवंतराव चव्हाण हे नेहमी भेटले की सांगायचे त्यांच्यावर जेव्हा दडपण येत असे किंवा एकटेपणा जाणवत असे किंवा मानसिक ताण येई तेव्हा ते “पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा” हे गाणं कायम ऐकायचे आणि गाणं ऐकल्यावर मन प्रसन्न होत असे, अशी आठवणही फडके यांनी सांगितली. दुसरी स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण सांगताना ते म्हणाले, सावरकरांच्या समोर शिवाजी मंदीरात गीतरामायणाचा कार्यक्रम नलावडे यांच्या सत्काराच्या निमित्ताने झाला. त्यावेळी पराधीन आहे जगती या गाण्याचे सातवे कडवे झाल्यावर समोर बसलेल्या सारवकरांच्या डोळ्यात पाणी आलेले बाबूजींनी बघितले आणि काय झाले अशी विचारणा केली. त्यावर सावरकरांनी सांगितले की कुणाचे मी कौतुक करू तुझे की गदिमांचे ! याच गाण्याला बाबूजींनी चाल लावली त्यावेळी ते भारत गायन समाजात रहात होते. चाल लावून ते रिक्षाने निघाले आणि त्यांनी रिक्षेत नविन चाल सुचली. नवी चाल शोधण्याचे कारण त्यांनी असे दिले की गदिमांनी जीवनाचे जे वर्णन केले आहे त्याल सुयोग्य अशीच स्वररचना झाली पाहीजे आणि अवघ्या पंधरा मिनिटात त्यांनी गाण्याला नवी चाल बांधली असे श्रीधर फडके यांनी सांगितले.
श्रीधर माडगूळकर यांनी गदिमा हे घरच्या परिस्थितीमुळे धारवाडहून पुण्याला आले आणि उपाशी पोटीच हिंडत होते. मोरोपंतांचे वंशज असलेले पंत पराडकर यांनी त्यांना मंडई परिसरात बघितले आणि त्यांच्या रहाण्याची जेवण्याची व्यवस्था केली. त्यानंतर आकाशवाणी केंद्राचे संचालक सीताराम लाड यांनी रसिकांना काही तरी वेगळे वर्षभर चालेल असा कार्यक्रम देण्याचे ठरविले आणि त्यासाठी गदिमांनी लिहिलेल्या गीतरामायणाची निवड केली. या गीतांना चाली बाबूजीच बांधणार असेही त्यांनी त्याचवेळी जाहीर केले आणि गदिमा – बाबूजी एकत्र आले. पुढे टिळकवाड्यात दत्तो वामन पोतदार यांनी गदिमांचा अधुनिक वाल्मिकी असा गौरव केला. गदिमांचे पुण्यात स्मारक व्हावे आणि त्यात गीतरामायणाचे खास दालन असावे अशी मागणी स्वरप्रतिभाचे संपादक प्रवीण वाळिंबे यांनी केली त्याचा संदर्भ देऊन या मागणीचा पाठपुरावा व्हावा असे त्यांनी सांगितले.
उपमहापौर आबा बागूल यांनी गदिमांच्या स्मारकाचे भूमीपूजन आपल्याच उपमहापौर पदाच्या कारकिर्दीत होईल आणि स्मारक नक्की उभे राहील अशी ग्वाही दिली. ते म्हणाले की इतक्या वर्षात पुण्यात हे स्मारक का नाही झाले याची मला खंत आहे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून याचा पाठपुरावा करून माझ्या उपमहापौरपदाच्या कारकिर्दीतच या प्रकल्पाचे भूमीपूजन व्हावे यासाठी मी कटिबद्ध राहीन. सध्या वाचणारे बघणारे झाले आहेत त्यामुळे वाचणारे कमी झाले आहेत. मात्र असे दिवळी अंक विकत घेऊनच वाचा असे आवाहन त्यांनी केले.
गीतरामायणाचे ऍप तयार करणा-या सुमित्र माडगूळकर या गदिमांच्या नातवाचा खास सत्कार करण्यात आला.
अंकाचे संपादक प्रवीण वाळिंबे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या अंकाच्या निर्मितीवेळी सातारा जिल्ह्यातील औंध येथील श्रींमंत भवानराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी सुमारे शंभऱ वर्षांपूर्वी सन १९११ मध्ये चितारलेल्या चित्र रामायणातील निवडक पेंटिग्ज स्वरप्रतिभाच्या या दिवाळी अंकांत वापरण्यात महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तू संग्रहायल विभागाने केलेल्या सहकार्याबद्दल विशेष आभार मानले. तसेच पुण्यात गदिमांचे स्मारक व्हायलाच पाहिजे त्यासाठी पुढाकार किमान या ६० व्या वर्षी तरी घेतला जावा असे आवाहन केले. अंकाच्या सहसंपादिका अमृता संभूस यांनी अंकाविषयी महिती दिली. या अंकातील पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेला लेख म्हणजे गीतरामायणाची उत्तम समीक्षा आहे. तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गीतरामायणाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमातील भाषणाचाही समावेश अंकात आहे. गदिमांची गीतरामायणाची हस्तलिखितेही आहेत. कार्यक्रमाची सुरूवात प्रख्यात गायिका पदमजा लामरूड यांनी म्हटलेल्या ईशस्ववनाने आणि सादर केलेल्या राम जन्मला ग सखी राम जन्मला या गाण्याने झाली. आभार मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानचे सरचिटणीस व स्वरप्रतिभा अंकाचे संदीप वाळींबे यांनी मानले. या प्रसंगी पुणे फेस्टीव्हलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, माजी आमदार मोहन जोशी, डॉ. सतीश देसाई, प्रकाश पायगुडे, मोहन टिल्लू, रवींद्र दुर्वे आदींसह संस्कृतिक साहित्य व समाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.