पुणे – बंगालच्या उपसागरामध्ये गंगासागरच्या दर्शनासाठी गेलेली दीडशे जणांची बोट रविवारी बेपत्ता झाली होती. यामध्ये पुणे व नागपूरमधील दीडशे जणांचा समावेश होता. मात्र, पाच तासांच्या प्रतीक्षेनंतर बेपत्ता झालेली ही बोट सर्व दीडशे प्रवाशांसह लामखाना येथील किनाऱ्यावर सुखरूप पोचली.
कोलकता शहरापासून लामखाना समुद्रकिनारा तब्बल 150 किलोमीटरवर आहे. या किनाऱ्यापासून गंगासागर हे ठिकाण समुद्रात एक ते दीड तासाच्या अंतरावर आहे. पुण्यातील ओम टुरिझम ही पर्यटन कंपनी पुणे, नागपूरमधील दीडशे प्रवाशांना बोटीने घेऊन गंगासागरच्या दर्शनासाठी आज सकाळी अकरा वाजता बोटीने गेली. येताना साडेचार वाजता ते परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र, मार्ग चुकल्याने बोट भरकटली. त्यामुळे एक ते दीड तासाच्या प्रवासाला तब्बल सहा तास लागले. सर्व प्रवासी सुखरूप असून, रात्री पावणेबारा वाजता तीन बसमधून सर्वजण कोलकताच्या दिशेने निघाल्याचे या टुरिझम कंपनीचे प्रमुख राजेश आरगे यांनी सांगितले. आरगे स्वत: पर्यटकांबरोबर आहेत. उद्या भुवनेश्वरला जाणार असून, सहल संपल्यानंतर 16 जानेवारीला रात्री पुण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.