पुणे- मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका बसला भीषण आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. बसमधील ३० वर सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली असून सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
बाह्यवळण मार्गावरून सोमवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास प्रवासी बस जात होती. नऱ्हे परिसरातील श्री स्वामी नारायण मंदिराजवळ धावत्या बसमधून अचानक मोठ्या प्रमाणात धूर येण्यास सुुरुवात झाली. बसचालकाच्या निदर्शनास हा प्रकार वेळीच आला. बसमधील वाहकाने त्वरित गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना जागे केले. बसमधील प्रवासी त्वरित गडबडीत बसमधून बाहेर पडल्याने गोंधळ उडाला. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्राचे प्रमुख प्रभाकर उमराटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करून आग थोड्याच वेळात आटोक्यात आणली. आगीत बस पूर्णपणे जळाली, तसेच घटनास्थळी मोठा धूर झाला होता. बसमधील प्रवासी त्वरित बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कुणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रभाकर उमराटकर यांनी दिली. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. बसमधील तांत्रिक बिघाड किंवा शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

