मुंबई – काही वर्षांपूर्वी शिवसेना नेत्या आमदार नीलम गोह्रे यांनी विधानपरिषदेत विदर्भातील एका सवेंदनशिल समस्येवर प्रश्न उपस्थित केला होता, जो अद्यापही सुटलेला नाही, त्याची दाहकता लक्षात घेता, लेखक- दिग्दर्शक राजू मेश्राम यांनी, सौ. राधा बिडकर निर्मित झरी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून, नुकतेच झरी या चित्रपटाचे पोस्टर अनावरण महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसुल राज्यमंत्री संजय राठोड, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, आमदार नीलम गोह्रे, जोगेन्द्र कवाडे, राजेन्द्र गवई, आ.बळीराम सिरस्कर, आ.विनोद बंब, आ.रमेश शेंडगे, आ.नरसय्या अडाम, आ.लक्ष्मण तायडे, आ.सुभाष ठाकरे, माजी मुख्य सचिव जे.पी.डांगे व अभिनेते अनंत जोग. मिलिंद शिंदे, तुकाराम बिडकर, निशा परुळेकर, नम्रता गायकवाड आणि अनिकेत केळकर यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाले.
यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, खरोखरच झरी चित्रपट हा कौतुकास पात्र आहे कारण, गल्लाभरु व विनोदीपटांच्या लाटेत विदर्भातील सवेंदनशील विषयावर हा चित्रपट भाष्य करणारा आहे. महसुल राज्यमंत्री संजय राठोड यावेळी म्हणाले की, आज भारत स्वतंत्र होवुन इतकी वर्ष झाली तरी दुर्गम भागात मूलभूत सोयींचा अभाव आहे आणि या विषयावर असलेला झरी चित्रपट सर्वानाच प्रेरणा देणारा ठरेल यात शंका नाही. उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे म्हणाले की, झरी चित्रपटातील लोकेशन, व्हराडी भाषा आणि विदर्भातील जटिल समस्या यांचा योग्य मिलाफ साधत लेखक- दिग्दर्शकाने चित्रपट माध्यमाचा प्रभावी आणि सुयोग्य वापर करत एका वास्तववादी आणि विदारक अशा सत्याचा परिचय समाजाला करून दिला आहे.
लेखक- दिग्दर्शक राजू मेश्राम यावेळी म्हणाले की, आजही भारतात असे अनेक दुर्गम क्षेत्र आहेत, जिथल्या लोकांना आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो आहे, गरीबी, अज्ञान, सुख सोयींचा अभाव व व्यवस्थेच्या नाकरतेपणामुळे दुर्गम भागातील लोक मुख्य प्रवाहात येऊच शकले नाहीत, त्यांचे शारीरिक शोषण करणारा वर्ग अस्तित्वात आहे, त्यांच्या स्त्रीयांचा भोग घेउन त्यांना कुमारी माता म्हणुन लाजिरवाणे जीणे जगण्यास भाग पाडत आहेत, परंतु परिस्थिती परिवर्तनशील असते, जेव्हा गुलाम पेटून उठतो, तेव्हाच गुलामगिरी भस्म होते या वास्तवाची जाणीव त्यांना होते व झरी च्या प्रतिनिधिक रुपात… एका क्रांतीला सुरुवात होते.