दाभोळ – जैतापूर प्रकल्पातून निर्माण होणारी वीज इतर राज्यांना विकली जाणार आहे. आपल्या राज्याच्या वाट्याला केवळ 2 टक्के वीज मिळणार आहे. असे असताना केवळ 2 टक्के विजेसाठी मी येथील जनतेच्या जिवाशी 100 टक्के कोणालाही खेळू देणार नाही. हा प्रकल्प जर एवढा चांगला असेल तर तो प्रकल्प इतरत्र न्यावा, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
दापोलीतील शिवसेनेचे उमेदवार आमदार सूर्यकांत दळवी यांच्या प्रचारार्थ शहरातील आझाद मैदानात ठाकरे यांची प्रचार सभा झाली. ते म्हणाले, “”हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला आहे. महाराष्ट्राची अस्मिता मोठी आहे; मात्र राज्याचा मुख्यमंत्री दिल्लीच्या नेतृत्वाचा जर सेवक म्हणून राहणार असेल, त्यांच्यापुढे गुडघे टेकून नतमस्तक होत आपली शेपूट हलविणार असेल, तर महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता हे कदापि सहन करणार नाही. राज्याला अतिउच्च शिखरावर नेण्यासाठी राज्याचा मुख्यमंत्री कोण हे दिल्ली ठरविणार नसून राज्यातील जनताच ठरवेल.‘‘
“”मी राज्यभर प्रचारसभांच्या माध्यमातून दौरा करतोय. पण राज्यातील जनता कॉंग्रेस सरकारच्या नावाने आक्रोश करतेय, न्याय मागतेय, गांजलेली, पीडित जनता आता शिवसेनेकडे मोठ्या आशेने पाहत आहे. या माझ्या राज्यातील आशावादी जनतेला न्याय देण्यासाठी माझ्या हातात ताकद द्या,‘‘ असे आवाहन त्यांनी केले.