‘ग्रामीण भागाच्या सर्वांगीण परिवर्तनाकडे लक्ष देण्याची गरज’ ‘स्टार्स फोरम’च्या 6 व्या वार्षिक राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
पुणे :
‘रोजगार निर्मिती, कौशल्य विकसनातून ग्रामीण भागातील सर्वांगीण परिवर्तनाकडे लक्ष देण्याची आणि नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील गुणवत्ता कमी आहे असे मानायचे कारण नाही’ असा सूर आज ‘स्टार्स फोरम’ या परिषदेत उमटला.
ग्रामीण भागातील युवकांना रोजगार निर्मितीसाठी उपयुक्त व्यावसायिक कौशल्ये वाढीस लागावीत या उद्देशाने ‘स्टार्स फोरम’ (स्किल्स ट्रेनिंग फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ रुरल सोसायटीज फोरम’) च्या वतीने आयोजित देशातील स्वयंसेवी संस्थांसाठी सहाव्या वार्षिक राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शनिवारी मॅगसेसे विजेत्या समाजसेविका नीलिमा मिश्रा, डॉ.सुधीर प्रभू (अमेरिका), शेखर पोतनीस, प्रकाश आपटे (सिग्नेटा इंडियाचे संस्थापक (Non Executive)), क्षमा म्हेत्रे यांच्या हस्ते झाले. डॉ. योगेश कुलकर्णी (अध्यक्ष, स्टार्स फोरम) यांनी प्रास्ताविक केले.
ही दोन दिवसीय परिषद जे. पी. नाईक एज्युकेशन कॅम्पस, एकलव्य पॉलिटेक्निकमागे कोथरूड येथे सुरू असून, यात देशभरातून 150 स्वयंसेवी, सामाजिक संस्था, कंपन्या, शासकीय अधिकारी सहभागी झाले आहेत.
उद्घाटनाच्या सत्रात बोलताना नीलिमा मिश्रा म्हणाल्या, ‘बदल या शब्दाची भीती सुद्धा वाटते. ग्रामीण भाग बदलायचा म्हणजे काय करायचे, हे ठरवले पाहिजे. ग्रामीण भागातील चांगल्या गोष्टी त्यात नष्ट होता कामा नये. ग्रामीण भागाचा विकास करताना त्यांच्या गरजा, आवडी समजून घेऊन त्यांच्यातील कौशल्यांवर आधारित रोजगार तेथेच देण्याची गरज आहे.
ग्रामीण भागातील जनता अशिक्षित मानली जाते पण काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत, म्हणून हा समज निर्माण झाला आहे. गावातील लोकांना तथाकथित व्यवसाय, स्पर्धा, फसवणूक या मार्गावर न नेता शाश्वत समाधानाकडे नेले पाहिजे,’ असेही त्या म्हणाल्या.
प्रकाश आपटे म्हणाले, ‘ग्रामीण भागात उद्योजकता, रोजगार वाढविण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. तसेच कंपन्यांच्या सी.एस.आर फंडामुळे 20 हजार कोटी स्वयंसेवी कार्यासाठी उपलब्ध झाले आहेत, त्याचा चांगला उपयोग केला पाहिजे.’
डॉ. सुधीर प्रभू यांनी स्टार्स फोरम च्या माध्यमातून ग्रामीण भागातील जीवनोन्नतीसाठी संघटन, प्रशिक्षण, अॅडव्होकसी असे प्रयत्न ‘स्टार्स फोरम’च्या माध्यमातून करणार असल्याचे सांगितले.
परिषदेच्या दिनांक 6 डिसेंबर रोजी दुसर्या दिवशीच्या सत्रामध्ये ‘डिजीटल इंडिया’ आणि ‘लाईव्हलीहूड’, नवीन पिढीसाठी सामाजिक उपक्रम आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे. यामध्ये कुलभूषण बिर्नााले, रवी घाटे, रणजीत शानबाग, सरीता चौहान, रिता सेनगुप्ता, ओंकार सैनी, विजय तांबोलकर, महेश वाडकर, विश्वास तेंडूलकर आदी मान्यवर मार्गदर्शन करतील.
या राष्ट्रीय परिषदेत ‘विज्ञान आश्रम’ ही संस्था यजमान संस्था म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. गेली 26 वर्षे ही संस्था या क्षेत्रात आणि विषयात काम करत आहे. व्यावसायिक कौशल्ये प्रशिक्षण व रोजगार निर्मिती हा बदलत्या काळात अतिशय महत्वाचा विषय आहे. या क्षेत्रातील प्रकल्पांना चांगली गुणवत्ता, नाविन्य लागते.
स्वयंसेवी संस्था एकत्र येवून अशा एकमेकांच्या चांगल्या नाविन्यपूर्ण गोष्टींची आदानप्रदान करू लागल्या तर त्यांचा या गोष्टी शोधण्याचा वेळ आणि श्रम वाचू शकतील. त्यातून विकासाची गती वाढू शकेल. अशा आदान प्रदानासाठी सामुहिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.