घुमान -इंग्रजी भाषेच्या दुराग्रहापोटी मराठी भाषेवर सातत्याने अन्याय झाल्याची भावना आज येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली ते म्हणाले ,इंग्रजी भाषेचा दुराग्रह धरणे हे कितपत संयुक्तिक आहे. मी जगभरात प्रवास केला आहे. जर्मनी, रशिया, इटाली, फ्रान्स, जापान, चीन, कोरीया अशा कितीतरी प्रगतीशील देशांमध्ये स्वदेशी भाषेचा पुरस्कार केला जातो. स्वभाषेचा वापर करून ते देश वैज्ञानिक प्रगतीत, उदयोग व संशोधनात मागे राहिले नाहीत. पण भारतीयांना भीती का वाटावी? .1960 साली मुंबईत 52 टक्के लोक मराठी भाषिक होते; आज तीच संख्या 22 टक्क्यांवर आली आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या भागातही मराठी भाषिकांचे प्रमाण खालावले आहे. मराठी शाळा शहरातून हद्दपार होत चालल्या आहेत. मराठी शाळेतून शिकणे हा नव्या पिढीला कमी पणा वाटतो. पालकांचाही दृष्टीकोन तसाच होत चालला आहे. मान्य आहे की, माहितीयुगात जग जवळ येत चालले आहे आणि स्वभाषेने इतका व्यापक संवाद साधता येत नाही. पण विमानप्रवास, कलाक्षेत्रे, शॉपिंग मॉल्स, कॉर्पोरेट ऑफिसेस वगैरे आधुनिक ठिकाणी दोन मराठी माणसेही परस्परांशी मराठीत बोलत नाहीत. दाक्षिणात्य राज्यांनी हेतूपूर्वक भाषिक संस्कृती जतन केली आहे. त्यांनी इंग्रजीही उत्तमरीत्या ज्ञात केली आहे आणि स्वभाषेचाही पुरस्कार केला आहे. महाराष्ट्रात मात्र मराठी माणूस असे संतुलन राखण्यात कमी पडतो. महाराष्ट्रात मराठी अस्मिता जपण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी शासनाकडून ठोस पाऊले उचलली गेली पाहिजेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने याबाबत तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.भाषावार प्रांतरचनेतील त्रुटींमुळे मराठी भाषिक वेगवेगळ्या राज्यात विभागला गेला. महाराष्ट्रातच मराठी भाषा मागे पडत चालली आहे तर इतर राज्यांमधील मराठीची अवस्था काय वर्णावी ? कर्नाटकातील बेळगाव, निपाणी, धारवाड या मराठी भाषिकांवर व मराठी भाषेवर सतत अन्याय होत आहे. माझे पक्षातील सहकारी व महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री कै. आर. आर. पाटील यांचा या व्यासपीठावरून आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. त्यांनी बेळगावात जाऊन मराठी भाषिकांवरील अन्यायाला वाचा फोडली. कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल केला. पण आबा ठाम राहिले.
घुमान येथील 88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शरद पवार यांनी केलेलं भाषण वाचा …
88 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष पंजाबचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री प्रकाशसिंह बादल, संमेलनाचे उद्घाटक माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, मावळते संमेलनाध्यक्ष फ. मु. शिंदे, स्वागताध्यक्ष श्री. भारत देसडला, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पंजाबी लेखक श्री गुरुदयालसिंग,, डॉ. माधवी वैद्य, श्री. साहित्य संमेलन महामंडळाचे सर्व पदाधिकारी, व्यासपीठावरील सर्व सन्मानयीय पाहुणे व संतश्रेष्ठ नामदेवांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या घुमान गावी प्रचंड संख्येने जमलेले मराठी व अमराठी सारस्वत आणि साहित्य रसिक… मी आपणां सर्वांचे मनापासून स्वागत करतो.यंदाचे साहित्य संमेलन माझ्या दृष्टीनेही महत्वाचे आहे. कारण यावर्षी मी हॅट्रिक पूर्ण करतोय ! 86 व्या चिपळूण, 87 व्या सासवड आणि 88 व्या घुमान अशा सलग तीन संमेलनांला मला हजेरी लावण्याची संधी मिळाली. मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महामंडळाचे याबद्दल आभार व्यक्त करतो.
आज घुमान येथे आल्याचा मला मनापासून आनंद होत आहे.
आजी महासुखे सृष्टी भरली भाग्यवंती ।
जालीसे विकृती । पापतापा ।।
चालिले देखोनी वैष्णव जगजेठी।
उभविती वैकुंठी । गुढीया देव ।।
संत नामदेवांनी वरीलप्रमाणे जसे विठ्ठलभक्तांच्या वारीचे वर्णन केले आहे, अगदी तसाच आनंद आजचा सोहळा पाहताना वाटत आहे. महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण नुकताच साजरा झाला आहे. आजचा शानदार सोहळा पाहून वैकुंठातील देव देखील गुढ्या उभारत असतील असे म्हणावयास हरकत नाही. कारण या संमेलनाच्या निमित्ताने केवळ साहित्य प्रसाराची आणि भागवत धर्माची पताकाच पुन्हा फडकली जात नाही, तर महाराष्ट्र-पंजाब मैत्रीचे, धार्मिक मिलाफाचे, दोन विभिन्न संस्कृतींच्या संगमाचे नवे पर्व सुरू होत आहे. साहित्य संमेलनाच्या सभामंडपाचे श्री गुरू नानक देवजी असे साजेसे नामकरण केल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन !
मुझे इस बात की बहुत खुशी हैं की, यह संमेलन पंजाब में हो रहा हैं । इस संमेलन की कामयाबी में बादल साहब की नेतृत्ववाली पंजाब सरकार ने बहुत बडा योगदान दिया हैं। मुझे कहने में गर्व हैं की, हिंदुस्थान के आझादी संग्राम में पंजाब राज्य का और खास कर शीख समाज का महत्वपूर्ण योगदान हैं । आझादी मिलने के उपरांत भारत देश पर जब-जब हमलें हुए तब -तब हमारें बहादूर शीख भाईंयोंने देश की रक्षा के लिए बहुत बडी किमत दी है । भारतवर्ष में अनाज की जब भी कमी थी, तब पंजाब के मेहनती किसान भाई-बहनोंने देश की भूख मिटानें के लिए अपना पसीना बहाया हैं । और मुझें खुशी हैं की बादल साहब इनका नेतृत्व कर रहें हैं । अभी हाल ही में भारत सरकार ने उन्हें पद्मविभूषण सें सम्मानित कर कें उनकी देशवासींयों के प्रति सेवा का स्मरण रखा । मुझे कई सालों से उनकें साथ काम करने का मौका मिला । मुझे याद हैं की, बादल साहब, स्व. देवीलालजी और मैंने दिल्ली शहर में सबसे बडी रैली का आयोजन किया था । इससे किसांनो की समस्यांओ की ओर देश के समस्त देशवासीयों का और राज्यकर्ताओंका ध्यान गया । मुझे याद हैं की, जब बादल साहब, बरनाला साहब और लोंगोवालजी पंचमढी के जेल में पंजाब आंदोलन के कारण बंद थे, तब कोई रास्ता निकालने के लिए भारत सरकारने मेरे कंधो पर जिम्मेदारी दे दि थी । पिछले दस सालों सें कृषि मंत्रालय की मेरे उपर जिम्मेदारी थी । तब अनाज की उपज के नये कीर्तीमान स्थापित हुए और निर्यात में तो पूरी दुनिया में भारत का अहम स्थान रहा । इसमें पंजाब के किसानों का योगदान सराहनीय था । इन्ही किसानों के साथ बादल साहब का तब भी नेतृत्व था और आज भी हैं ।
इस मराठी साहित्य संमेलन में आये हुए पंजाब के साथीयों को आज मैं मराठी के बारें में कुछ बताना चाहता हु ।
देश के क्लासीक लँगवेजेस में मराठी एक अनोखी भाषा हैं । सारी दुनिया में जितनी भी भाषाएँ बडी संख्या में लोग बोलते हैं , उन सबमें संख्या के क्रम में मराठी भाषा दसवें नंबर पर हैं । इतनें बडे पैमाने पर बोली जाने वाली इस भाषा के इतिहास में आज का दिन इस लिए महत्वपूर्ण हें की, महाराष्ट्र सें दूर आप के हार्दिक सहयोग से संत बाबा नामदेव जी की कर्मभूमी में यह संमेलन संपन्न हो रहा हैं । इस संमेलन में शरीक होने के लिए महाराष्ट्र से आये मराठी भाषा प्रेमींयों का पंजाब सरकारने दिल खोल के स्वागत किया हैं। संमेलन की सारी व्यवस्थाओं का बडे उत्साहोंके साथ जिम्मा उठाया हैं। संयोजकों की ओर से मैंने आपके सहयोग के लिए छोटी सी बिनती की थी, उसे आप सबने और खास तौर पर पंजाब सरकारने, हमारे उमीद से जादा सर-आँखो पर बिठाया । जिस हर्ष के साथ हम महाराष्ट्रवासीयोंके लिए आपने इतना कुछ किया, उसे हम कभी भुल नही सकते। इस लिए व्यक्तिगत रूप से मैं आपका तहे दिलसे शुक्रिया अदा करता हूँ । साथ ही हम सब की ओर सें यह कहना चाहता हूँ की, आने वाले अनेक सालों तक आपका यह स्वागत महाराष्ट्र की मराठी जनता याद करेगी । इस देश की राष्ट्रीय एकात्मता के इतिहास में पंजाब और महाराष्ट्र का यह ऐतिहासिक मीलन है। जिसे मिसाल की तौर पर याद किया जाएगा । यह संमेलन मराठी भाषा का उत्सव हैं। कई वर्षों से इसे बडी धूमधाम से मनाया जाता है । आपकी अनुमती से मेरें विचार मैं मराठी भाषा में पुनः रखना चाहता हूँ ।
माझं गाव कवी मोरोपंतांची बारामती वारकरी मार्गावरच असल्याने अगदी लहानपणापासून मी पंढरीची वारी पाहत आलो आहे. पंढरीचा विठ्ठल ‘जे का रंजल्या-गांजल्यांचा’ देव, दीन-दुबळयांचा, पददलितांचा, कष्टकऱ्यांचा, सामान्यांचा देव ! आषाढी – कार्तिकीला विठ्ठलाच्या दर्शनाला हे सारे वारकरी कष्टी जीवनातून वेळ काढून, दैनंदिन दुःख विसरून, ऊन वारा-पावसाची तमा न बाळगता ‘ग्यानबा-तुकारामाचा’, ‘विठ्ठलनामाचा’ गजर करीत शेकडो मैल प्रवास करतात, हे मी पाहत आलो आहे. वारकऱ्यांच्या या ‘न थकण्यामागे’ एक रहस्य आहे. विठ्ठल मंदिरात प्रवेश केल्यावर नामदेव पायरीला स्पर्श करताच त्यांच्या अंगी नवी ऊर्जा येते. संत नामदेवांनी आयुष्यभर इतकी प्रचंड भ्रमंती केली त्याचं स्मरण होताच थकवा राहणार तो कसा ?
आज घुमानमध्ये अगदी तसाच ओसंडून वाहणारा उत्साह मला तुम्हा साहित्यप्रेमींमध्ये दिसत आहे. ज्ञानेश्वर महाराजांपासून अनेक संत महात्म्यांनी भागवत धर्माचा, मानवतेचा प्रसार केला. संत नामदेवांनी तर विठ्ठल भक्तीची व वारकरी संप्रदायाची पताका उत्तर भारतात फडकविली. “नामा तयाचा किंकर, तेणे केला हा विस्तार” अशी संत नामदेवांच्या योगदानाची महती आपण अभिमानानं सांगतो. आज त्यांनी केलेल्या अमोल कार्याची प्रचीती येत आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दोन विभिन्न प्रांतांतील जनतेत सुसंवाद घडून येत आहे. शीख संप्रदायाचे दहावे गुरू गोविंदसिंह यांच्या हौतात्म्यानं पवित्र झालेल्या हुजूर साहिब नांदेड या धर्मस्थळामुळे महाराष्ट्र ज्याप्रमाणे पंजाब राज्याशी जोडला गेला त्याच प्रमाणे संतश्रेष्ठ नामदेवांच्या घुमान येथील वास्तव्यामुळे दोन्ही राज्ये, दोन संप्रदाय एकमेकांशी जोडले गेले आहेत.
इ.स. 1326 च्या सुमारास नामदेव गुजरात, राजस्थान व तेथून पंजाब भागात गेले आणि घुमान गावी काही वर्षे वास्तव्य केले. नामदेव कालीन ‘घुमान’ जंगलराईचा भाग होता. वायव्येकडून सतत आक्रमणांचा ओघ चालू असतानाही नामदेवांनी तेथे 18 वर्षे वास्तव्य केले, महंमद तुघलकाचाही त्रास सहन केला. परंतु वारकरी धर्माची पताका अखंड फडकावित ठेवली. घुमान येथील वास्तव्यकालात नामदेवांनी हिंदी भाषेत पद्यरचना करून संतसाहित्यात मोलाची भर घातली. या पद्यांपैकी 61 पद्यांचा समावेश ग्रंथसाहेब या पवित्र ग्रंथात आहे. घुमान येथे नामदेवांचे अनेक शिष्य झाले. त्यांचे अनेक शिष्य भागवत धर्माच्या परंपरेनुसार जाती पंथांच्या पलिकडले होते. बहोरदास हे पंजाबी शिंपी, भटीवालचे जाल्लो सुतार, घुमान जवळील सखोवाल गावचे लध्धा खत्री हे किराणा मालाचे व्यापारी अशा काही नावांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. शीख धर्माचा उदय नामदेवांच्या नंतर सुमारे 100 वर्षांनी झाला त्यामुळे संत नामदेवांच्या आचार व विचाराने मानवतावादी शीख धर्माच्या उदयासाठी अनुकूल पार्श्वभूमी तयार होण्यास मदत झाली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
माझ्या माहितीप्रमाणे बहोरदासाचे वंशज आजही घुमानच्या नामदेवांच्या मंदिराची – साधनास्थळाची व्यवस्था पाहतात. घुमानवासीयांनी बाबा नामदेवांच्या भक्तांनी या संगमरवरी साधनास्थळाची उत्तम व्यवस्था ठेवली आहे याबद्दल पंजाब सरकारचे व घुमानवासीयांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. घुमान येथील नामदेव मंदिरात दरवर्षी माघ महिन्यात आजही यात्रा भरते. माझ्या माहितीप्रमाणे पंजाबातील बहुसंख्य शिंपी समाज नामदेव संप्रदायी आहे, त्यांना ‘चिम्बा’ म्हणतात व आश्चर्याची बाब म्हणजे ते वारकऱ्यांप्रमाणे गळ्यात तुळशीच्या माळा वापरतात. पंजाब प्रांतातील शिंपी समाजासाठी घुमान उत्तरेकडील पंढरपूरच आहे.
संयोजकांनी साहित्यसंमेलनासाठी एका संतस्थळाची केलेली निवड सार्थ आहे. कारण मराठी साहित्याची सुरुवातच संतसाहित्यापासून झाली. महानुभाव चक्रधरस्वामी, ज्ञानेश्वर यांचे विचार व शिकवण संतसाहित्यात प्रतिबिंबित झाल्याने मराठी साहित्याचा उगम व विकास झाला. मुकुंदराजांच्या विवेकसिंधू पासून उगम पावून ज्ञानेश्वरीचा अमृतानुभव घेत मराठी साहित्य आज संत, पंत, तंत या साहित्य परंपरांच्या पुढे जाऊन तळागळापर्यंत पोहोचले आहे. नामदेवांनी मराठी साहित्यात अनमोल योगदान दिले आहे. आत्मचरित्रपर अभंग, कृष्णचरित्रपर अभंग, तीर्थावळी, बाळक्रीडा व संतचरित्रे यांचा समावेश नामदेवांच्या साहित्यात होतो. नामदेवांना श्रीकृष्णाच्या बाललीला वेड लावत.
दुडदुड पळती, मुखी घाली माती, शेणात लोळती, दोघेजण ।
नंदाच्या पुढील ओढीताती ताटा, मिटक्या मटमटा, वाजविती ।।
कृष्ण आणि बलराम यांच्या बाललीलेचं इतकं मूर्तिमंत वर्णन त्याची साक्ष देतात.
श्रीकृष्ण वनात जाताना गोपींच्या देहभान हरवलेल्या अवस्थेचे वर्णन देखील नामदेवांनी खूप सुंदर रीतीने केले आहे.
विंचरिता वेणी, तेथे राहे फणी, करिता भोजनी, ग्रास मुखी ।
उदकाचे कुंभ गोपिकाचे शिरी, यमुनेच्या तिरी, वेडावल्या ।।
नामदेवांच्या पद्यरचनांतून भक्तिरस, वात्सल्य, कारुण्य शब्दागणिक पाझरते. त्यांच्या वाणीत गोडवा आहे. मला वाटतं याची अनुभूती तुम्हाला या काव्यपंक्ती ऐकून आली असेल.
ज्याप्रमाणे साहित्यसंमेलनाची स्थळ निवड सार्थ आहे, त्याचप्रमाणे संमेलनाध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे यांची झालेली निवड देखील औचित्यपूर्ण आहे. संत तुकारामांचे वंशज असलेले सदानंद मोरे हे स्वतः संत साहित्याचे, इतिहास व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक आहेत. संत-महात्म्यांनी दिलेली मानवतेची शिकवण, ज्ञानेश्वरांनी पसायदानातून दिलेला विश्वात्मक शांतीचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ते अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना हाती घेतील याचा मला विश्वास आहे.
संतवाङ्मयात सर्व संतांनी सांगितलेली मूल्यशिक्षण व्यवस्था आणि विश्वात्मक शांतीचा संदेश जो ज्ञानदेवांनी पसायदानातून दिला त्याची आज जगाला नितांत गरज आहे. आजही जगात शांततेचे नोबेल पारितोषिक स्वतंत्रपणे दिले जाते. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी शांतीचा संदेश जगाला दिला. शांती म्हणजे केवळ ‘पीस ऑफ माइंड’ नव्हे ! शांती म्हणजे समाधानाला सखोल जाणीव देणे! इतरांना तृप्त करीत स्वतः तृप्त होणे… याला शांती म्हणतात! ‘मार्गाधारे वर्तावे आणि विश्व हे मोहरे लावावे’ ही शांतता संतांनी विश्वाला शिकविली. चर्चमध्ये दरवर्षी नाताळला तीच प्रार्थना करतात. शाही इमाम दरवर्षी रोजेचे उपवास सोडताना सुद्धा अल्लापाशी शांतताच मागतात. कारण शांती हा वैचारिक अधिष्ठानाचा पाया आहे. कुठलाही विचार क्रांतीतून, युद्धातून रुजत नाही. पण विचाराची बैठक व फलश्रुती जर शांतीत होत असेल तर तो विचार चिरंजीव ठरतो. म्हणूनच गांधीजींच्या पुतळ्याची गरज ब्रिटनला वाटते आणि अमेरिकेलाही वाटते. युनोतही बैठक संपल्यानंतर शांतीचीच प्रार्थना होते. संत वाङ्मय टिकण्याचे सगळयात मोठे तत्त्व मनःशांती आहे. गाडी ओढणाऱ्या हमालालाही पसायदान ऐकल्यानंतर शांत झोप लागते आणि मुंबईच्या पेडर रोडवर राहणाऱ्या धनिकालाही पसायदानाने शांती मिळते. हे जे सुख आहे या आत्मसुखाला संतांनी विश्वात्मक देव मानले आणि माणसा-माणसांतला देव पाहिला. म्हणून संतांनी जातीला कधीही स्थान दिले नाही. मानवतेला स्थान दिले. अशा प्रकारच्या साहित्याची गरज आजही साहित्य संस्थांकडून व्यक्त केली जाते. त्याचे भान साहित्यिक म्हणविणाऱ्या सर्वांनी ठेवावे अशी अपेक्षा कुणी केली तर ते चुकीची ठरू नये.
नवी पिढी संतांची शिकवणच नाही तर मराठी भाषाच विसरत चालली आहे. वाढत्या शहरीकरणाचा व आधुनिकीकरणाचा हा परिणाम आहे. मुंबईचे उदाहरण घेता 1960 साली मुंबईत 52 टक्के लोक मराठी भाषिक होते; आज तीच संख्या 22 टक्क्यांवर आली आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या भागातही मराठी भाषिकांचे प्रमाण खालावले आहे. मराठी शाळा शहरातून हद्दपार होत चालल्या आहेत. मराठी शाळेतून शिकणे हा नव्या पिढीला कमी पणा वाटतो. पालकांचाही दृष्टीकोन तसाच होत चालला आहे. मान्य आहे की, माहितीयुगात जग जवळ येत चालले आहे आणि स्वभाषेने इतका व्यापक संवाद साधता येत नाही. पण विमानप्रवास, कलाक्षेत्रे, शॉपिंग मॉल्स, कॉर्पोरेट ऑफिसेस वगैरे आधुनिक ठिकाणी दोन मराठी माणसेही परस्परांशी मराठीत बोलत नाहीत. दाक्षिणात्य राज्यांनी हेतूपूर्वक भाषिक संस्कृती जतन केली आहे. त्यांनी इंग्रजीही उत्तमरीत्या ज्ञात केली आहे आणि स्वभाषेचाही पुरस्कार केला आहे. महाराष्ट्रात मात्र मराठी माणूस असे संतुलन राखण्यात कमी पडतो. महाराष्ट्रात मराठी अस्मिता जपण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी शासनाकडून ठोस पाऊले उचलली गेली पाहिजेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने याबाबत तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
भाषावार प्रांतरचनेतील त्रुटींमुळे मराठी भाषिक वेगवेगळ्या राज्यात विभागला गेला. महाराष्ट्रातच मराठी भाषा मागे पडत चालली आहे तर इतर राज्यांमधील मराठीची अवस्था काय वर्णावी ? कर्नाटकातील बेळगाव, निपाणी, धारवाड या मराठी भाषिकांवर व मराठी भाषेवर सतत अन्याय होत आहे. माझे पक्षातील सहकारी व महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री कै. आर. आर. पाटील यांचा या व्यासपीठावरून आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. त्यांनी बेळगावात जाऊन मराठी भाषिकांवरील अन्यायाला वाचा फोडली. कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल केला. पण आबा ठाम राहिले.
मराठी सत्तेच्या विस्ताराने मराठी भाषाही विस्तारली. इंदौर, ग्वाल्हेर, उज्जैन भागात आजही मराठी मोठया प्रमाणावर बोलली जाते, याचे समाधान वाटते. हरियाणा, ओरीसा, गुजरात, आंध्र, तामिळनाडू आदी भागातही मराठी माणूस आहे परंतु तिथे मराठी भाषेचे संवर्धन होणे आवश्यक आहे. हरियाणातील मराठी माणसांना रोड मराठा म्हणतात. पानिपत युद्धानंतर काही मराठा मंडळी हरियाणातच स्थायिक झाली. दिल्लीत असताना ही मंडळी मला अभिमानानं भेटायला येतात. ते मराठी आहेत, पण आता मराठी भाषेची जागा हरियाणवीने घेतली आहे. इतर भागात असे होऊ नये म्हणून कंबर कसावयास हवी. घुमान येथे साहित्य संमेलन घेणं त्यादृष्टीने महत्वाचं ठरतं.
मराठी भाषेपासून नविन पिढी दूर जाण्याचं, मराठी शिकण्यात निरुत्साह असण्याचं कारण मराठी भाषा आधुनिकतेची कास धरत नाही असं काही मंडळी म्हणतात. मराठी भाषा केवळ ज्ञानभाषा न राहता ती विज्ञान भाषा होणे यासाठी गरजेचे आहे. मराठी भाषेत त्या दिशेने प्रयत्न स्वातंत्र्यपूर्व काळापासून झाले आहेत. श्रीधर केतकरांनी मराठी ज्ञानकोषाचे संपादन केले, तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशींनी मराठी विश्वकोषाचे अविस्मरणीय असे काम केले. त्यांनी मराठी भाषेला विज्ञान, तंत्रज्ञानातील अनेक चांगले व समर्पक शब्द मराठीला दिले. पण ऐतिहासिक कार्य करणाऱ्यांच्या कष्टाचं चीज होत नाही. डॉ. केतकरांचा मृत्यू वयाच्या 53 व्या वर्षी पुण्याच्या ससून रुग्णालयात हालाखीत झाला.
आज विज्ञानासंबंधी सुबोधपणे लिहिणारे डॉ. जयंत नारळीकर, डॉ. बाळ फोंडके, डॉ. निरंजन घाटे ही मंडळी खूप महत्वाचे कार्य करीत आहेत. मला येथे उल्लेख करण्यास आनंद वाटतो की, यावर्षी साहित्य अकादमीचा पुरस्कार डॉ. नारळीकरांच्या ‘चार नगरातले माझे विश्व’ या ग्रंथाला मिळाला. एका वैज्ञानिकाच्या साहित्यप्रतिभेचा गौरव होणं हे मराठी माणसासाठी भूषणावह आहे तसेच मराठी भाषेच्या संवर्धनाचा शुभसंकेत आहे. ‘कोसला’कार डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीला यंदाचा भारतीय साहित्यातील प्रतिष्ठीत असा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. डॉ भालचंद्र नेमाडे यांनी वयाच्या पंचविशीतच कोसलाच्या रूपाने मराठी कादंबरीचे परिमाण बदलले होते. नेमाडेंचे साहित्य मराठी भाषेसाठी एक समृद्ध खजिना आहे. पाश्चिमात्य भाषेतील लेखकांना त्यांची का अडगळ व्हावी हे मला मात्र उमजत नाही. डॉ भालचंद्र नेमाडेंचा ‘देशीवाद’ सिद्धांत हा खळबळजनक, कांतिकारी स्वरूपाचा आहे. स्वतः इंग्रजी भाषेतून पदवीधर असलेले, इंग्रजी भाषा विद्यापीठातून शिकवणारे डॉ. नेमाडें त्यांना मराठी भाषेची 21व्या शतकातील अवस्था जाणवल्याखेरीज इंग्रजी भाषेला शिक्षणातून हद्दपार करावयास सांगणारे धाडसी मत मांडणार नाहीत. संत एकनाथांनी जसे मराठीचे पुनरुत्थान केले तसे पुनरुत्थान करण्यासाठी नेमाडेंसारखी अभ्यासू व धाडसी मंडळी नवसाहित्यिकांना प्रेरक ठरतील यात शंका नाही. डॉ. भालचंद्र नेमाडे यांचं व डॉ. जयंत नारळीकरांचं या व्यासपीठावरून मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.
इंग्रजी भाषेचा दुराग्रह धरणे हे कितपत संयुक्तिक आहे. मी जगभरात प्रवास केला आहे. जर्मनी, रशिया, इटाली, फ्रान्स, जापान, चीन, कोरीया अशा कितीतरी प्रगतीशील देशांमध्ये स्वदेशी भाषेचा पुरस्कार केला जातो. स्वभाषेचा वापर करून ते देश वैज्ञानिक प्रगतीत, उदयोग व संशोधनात मागे राहिले नाहीत. पण भारतीयांना भीती का वाटावी? असो, अमृताच्याही पैजा जिंकणारी मराठी इतक्या लवकर पराभूत होणे नाही.
आज या व्यासपीठावरून मी पंजाबचे आदरणीय मुख्यमंत्री श्री. प्रकाशसिंग बादल यांच्याविषयी पुन्हा एकदा कृतज्ञता प्रकट करतो. माझ्या हाकेला त्यांनी साद दिली नाही असे कधीही घडले नाही. त्यांच्याबरोबरच त्यांचे सुपुत्र व पंजाबचे उपमुख्यमंत्री श्री. सुखबीरसिंग बादल व केंद्रीय अन्न प्रक्रीया उद्योग मंत्री श्रीमती हरसिमरत कौर बादल यांचेही मनापासून आभार मानतो. संयोजक मंडळी केव्हाही त्यांना भेटोत, त्यांनी नेहमीच सकारात्मक व सर्वोतोपरी मदत केली. हे साहित्य संमेलन पंजाब सरकारने शासकीय कार्यक्रम म्हणून जाहीर केला आहे. याबद्दल आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.घुमान स्थळास राष्ट्रीय तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न चालू आहेत. पंजाबचे माननीय मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना माझी विनंती की याबाबत त्यांनी पाठपुरावा करावा.साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्यक्षेत्रातील मंडळी घुमान या पवित्र ठिकाणी एकत्र आलीत. एका वेगळया बंधनात सारे बांधले गेलेत. पण संमेलनाच्या सांगतेनंतर पुन्हा आपापल्या मार्गी लागतात. नामदेवांच्या उक्तीने सांगावयाचे झाले तर
बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट ।
वोघ बारा वाट । मुरडताती ।।
बांधल्या पेंढीचा सुटलासे आळा ।
तृण रानोमाळा । पांगलेसे ।।
पण माझी विनंती आहे की, पंजाब-महाराष्ट्र नव्या मैत्रीचं हे पर्व सुरू झालेले आहे. नामदेवांनी विस्तार केलेल्या या मानवधर्माची पताका सतत फडकावित ठेवणं हे आपणा सर्वांचं कर्तव्य आहे.
मला निमंत्रित केल्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो व घुमान येथील या ऐतिहासिक साहित्यसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद!
जय हिंद, जय पंजाब, जय महाराष्ट्र, जय मराठी!!!