मुंबई- सत्तांतरानंतर आज झालेल्या पहिल्याच विधानसभा अध्विश्नात अध्यक्षांची निवड झाली , भाजपाचे उमेदवार नार्वेकर विजयी झाले त्यांच्या अभिनंदानार्थ भाषण करताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी टोलेबाजी केली.अजित पवार म्हणाले, “कुणी काहीही म्हटलं तरी सगळ्यांच्या मनात धाकधूक धाकधूक आहे. भाजपाचे १०५ आमदारांनी आपल्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून विचारा की जे घडलंय त्याने आपलं समाधान झालं आहे का? चंद्रकांत पाटील यांनी यावर बाकडं वाजवू नये. तुमचं मंत्रीपदच येईल की नाही सांगता येत नाही. कुठं बाकडं वाजवताय? शिवसेनेतून तिकडे गेलेल्या ३९ लोकांपैकी किती लोकांना मंत्रिपद मिळणार आहे? सगळ्यांना वाटतंय मिळेन. काय होईल काही सांगता येत नाही.”
“एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम केलं आहे. कशामुळे घडलं, काय घडलं माहिती नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांनी माझ्या कानात सांगितलं असतं की अजित उद्धव ठाकरेंना सांग, अडीच वर्षे झालेत, आता अडीच वर्षे मला मुख्यमंत्रीपद द्या. तर मीच उद्धव ठाकरेंना सांगून आम्हीच तुम्हाला मुख्यमंत्रीपदावर बसवलं असतं. काहीच अडचण आली नसती,” असं अजित पवार यांनी सांगितलं. तसेच आदित्य काही अडचण आली नसती ना? असं म्हणत आदित्य ठाकरेंनाही कोपरखळी लगावली.
अजित पवार पुढे म्हणाले, “अनेक कट्टर काम करणारे मान्यवर थोडेसे नाराज आहेत. देवेंद्र फडणवीस टीव्हीवर बोलत होते आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे घेतील सांगितलं तेव्हा ‘पिन ड्रॉप सायलन्स’ झाला. कितीतरी भाजपाचे नेते तर ढसाढसा रडायलाच लागले. कुणाला काही कळेनाच. सगळ्या महाराष्ट्रासाठीच तो धक्का होता.”“गिरीश महाजन यांचं तर अजूनही रडणं बंद होईना. त्यांना फेटा बांधायला दिला तर त्यांनी फेटा सोडून डोळ्याला आलेलं पाणी पुसण्यासाठी फेट्याचा वापर करत आहेत. त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री न झाल्याचं फारच वाईट वाटलं,” असं म्हणत अजित पवारांनी गिरीश महाजन यांनाही कोपरखळी लगावली.
भाजपाच्या नेत्यांवर बोलताना अजित पवार म्हणाले, “मी जेव्हा सभागृहात समोरच्या बाजूला पाहतो तेव्हा मूळचे भाजपाचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेलेच जास्त मान्यवर पाहायला मिळतात. आमच्या मान्यवरांना पदावर बसलेलं पाहून मला मूळ भाजपाच्या मान्यवरांविषयी वाईट वाटतं. ते मूळ मान्यवरांना बाजूला सारून तिथं पदावर बसलेत. पहिली रांग पाहिली तरी ते लक्षात येईल.”

