मुंबई, दि. २ :- मराठी साहित्यात ग्रामीण विनोदाच्या रंग-ढंगातून रंगत आणणारे आणि लेखन, कथाकथनातून अस्सल गावरान, मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेणारे साहित्यिक म्हणून द. मा. मिरासदार यांची ‘मिरासदारी’ अबाधित राहील. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वाने निखळ आणि अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, द. मा. म्हणजेच दादासाहेबांनी मराठी साहित्यात आपल्या नावाप्रमाणेच मिरासदारी निर्माण केली. मराठीत ग्रामीण जीवनातील पार, कट्ट्यावरचा आणि अशा अनेक इरसाल नमुन्यांचा विनोदी खजिन्याचा पेटाराच दादासाहेबांनी उघडला. विनोदी लेखन, कथाकथन यातून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मनमुराद हसवले. कथाकथनातून त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राचा मराठमोळा बाज सातासमुद्रापार नेला. तसेच ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातही गेले. दादासाहेब उभे राहायचे, खर्जातील आवाजात कथा रंगवून सांगू लागले की त्या गावातले नमुने आरसा दाखवल्याप्रमाणे खळखळून हसू लागायचे. विलक्षण निरीक्षण शक्ती आणि लेखन-सादरीकरणातील निर्भेळपणा यामुळे द. मा. मिरासदार यांनी आपली अशी ‘मिरासदारी’ निर्माण केली. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्याने अलौकिक प्रतिभावान असा साहित्यिक गमावला आहे. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना भावपूर्ण श्रध्दांजली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांना श्रध्दांजली
ज्येष्ठ साहित्यिक, प्रसिध्द कथाकथनकार द. मा. मिरासदार यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून अस्सल ग्रामीण ढंगाच्या कथाकथनाच्या माध्यमातून त्यांनी मराठी रसिकांना निखळ आनंद दिला, त्यांच्या निधनाने सिध्दहस्त लेखक, प्रतिभावंत साहित्यिक, कथाकथनकार हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी त्यांच्या लेखनाची सुरुवात पत्रकारितेच्या माध्यमातून केली. पत्रकारिता क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी प्रदीर्घकाळ अध्यापनाचे काम केले. विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी त्यांची ख्याती होती. सामान्य वाचकांबरोबरच जाणकार समिक्षकांनी सुध्दा त्यांच्या लेखनाला दाद दिली. अस्सल ग्रामीण ढंगाच्या माध्यमातून द. मा. मिरासदार यांनी कथाकथनाची आपली वेगळी शैली विकसित केली. मराठी कथाकथन प्रकाराला लोकप्रियता मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या निधानाने प्रतिभावान साहित्यिक, कथाकथनकार हरपला आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो.

