“काय सांगू मॅडम…मुलं सकाळी सात वाजल्यापासून शाळेत येऊन बसली होती. ‘घरी जा’ सांगितलं तरी ऐकायला तयार नव्हती. शेवटी त्यांच्या पालकांना बोलावून सांगावं लागलं की मुलांना घरी न्या.” सुनीता मॅडम फोनवर सांगत होत्या. लॉकडाऊन असल्यामुळे अजून तरी शाळा सुरू झाल्या नाही, तरी नेहमीच्या सवयीप्रमाणे मुलं मात्र शाळेत १५ जूनला आपले मित्रमैत्रीण आणि शिक्षकांची आतुरतेने वाट बघत वर्गात येऊन बसली. वाड्यातील एका शाळेतील हा ह्रदय प्रसंग. बाई आणि मित्रमैत्रिणी भेटल्याचा आनंदच एवढा होता की लॉकडाऊनमुळे शाळा अजून सुरू होणार नाही हे ती मुलं स्वीकारायलाच तयार नव्हती. ज्या ठिकाणी मुलांना मनोरंजनाशिवाय दुसरे काहीच साधन उपलब्ध नाही, शाळा हीच त्यांची शिकण्याची आणि बागडण्याची जागा, ज्या मुलांना शाळेतच जास्त वेळ घालवायला आवडतं, त्यांना पटवून कसं द्यायचं की यावर्षी शाळेचा काही नेम नाही. त्या निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मॅडमच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं.
जून महिना सुरू झाला की कधी एकदाची शाळा सुरु होतेय आणि आपण मित्रमैत्रिणींना भेटतोय, सुट्टीतील गमतीजमतीही सांगतोय, असं मुलांना झालं असतं. शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भारलेला असतो. नवीन वह्या – पुस्तके, स्कूल बॅग, युनिफॉर्म, नवा वर्ग, वर्गशिक्षक सगळ्यांचेच खूप कुतूहल असते. यंदा लॉकडाऊनमुळे या सगळ्या आनंदावर विरजण पडलं.
दहिसरमधील एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘ड्रॉईंग’ विषय शिकविणाऱ्या टीचरने सांगितले की जूनमध्ये शाळा सुरू होणार नाहीत हे लक्षात आल्यावर मे पासूनच आम्ही शिक्षकांनी तयारी करायला सुरूवात केली. ऑनलाईन कसं शिकवायचं यासाठी आमचं ट्रेनिंग होतं. त्यानुसार ड्रॉईंग ह्या विषयाचं मी पीपीटी प्रेझेन्टेशन देते. मेमरी ड्रॉईंग असेल तर ते कसं काढायचं याचा व्हिडीओ बनवते, त्यांना ऑनलाईन करेक्शन सांगते. थोडं कठीण पडत आहे हे सगळं पण नुसतं घरी बसून राहण्यापेक्षा मुलं काहीतरी करताहेत तेवढंच समाधान. गूगल मीटवर आम्ही शिकवतो. क्लासमध्ये व्यक्तीशः फिरून आम्ही बघायचो मुलं कसं ड्रॉईंग काढताहेत…तो फरक ऑनलाईन शिकवताना नक्कीच जाणवतो. परिस्थितीशी जुळवून घेण्याचा आम्ही सगळेच प्रयत्न करत आहोत.
ड्रॉईंग, योगा, कार्यानुभव यांसारखे प्रात्यक्षिक विषय ऑनलाईन शिकविताना अडचणी येत आहेत. योगा आणि वर्क एक्सपिरिअन्स शिकविणाऱ्या अंधेरीतील एका इंटरनॅशनल स्कूलमधील टीचरने सांगितले की गुगल मीट ऍपवर आम्ही शिकवणार आहोत. मी अजून तरी या सगळ्यांशी तेवढी कम्फरटेबल नाही. मी मात्र मोबाईलवरच शिकवणार आहे, त्यासाठी आता ट्रायपॉड सुद्धा विकत घ्यावा लागला. योगाचे काही प्रकार सोडले तरी सगळेच प्रकार ऑनलाईन शिकवता नाही येणार.
मालाडच्या आईसीएसइ स्कूलमधील एका शिक्षिकेने सांगितले की त्यांचे तर ऑनलाईन जुनिअर ते 10वी पर्यंत सगळे क्लासेस चालू आहेत. ‘मायक्रोसॉफ्ट टीम’ हे सॉफ्टवेअर शाळेने खासकरून घेतले आहे. त्याचा इमेल आयडी, पासवर्ड तसेच टाइमटेबल मुलांना दिले गेले आहे. मोठ्यांसाठी अडीच तास तर लहान मुलांसाठी दीड तास अशी रोज ऑनलाईन शाळा भरते. आमच्या शाळेतील मुलं तर ऑनलाईन स्कूल खूप एन्जॉय करताहेत. ३ महिने लॉकडाऊनमुळे मुलं घरी बसून कंटाळली आहेत. किमान ऑनलाईन ते त्यांच्या मित्रांना बघू शकतात, त्यांच्याशी बोलू शकतात. पालकांशीही बोलतो आम्ही, त्यांच्याकडून अडचणी जाणून घेतो. ऑनलाईन स्कूलचे काही नियम आहेत ते हळूहळू आम्हाला आणि मुलांनाही अंगळवणी पडू लागले आहेत. समोरासमोर मुलांशी बोलून त्यांना शिकवता येत नाही ही खंत आहेच. ऑनलाईन स्कूल हा पर्याय सध्या तरी स्वीकारला आहे. मुलं दिवसभर घरी बसून टीव्ही बघणार किंवा मोबाईलवर गेम खेळत बसणार…मग रोज अडीच तास ऑनलाईन स्कूल असेल तर बिघडलं कुठे. अगदीच काही नाही त्यापेक्षा एवढं तरी शिकता येतंय.
ठाण्यातील एका खाजगी शाळेत शिकविणाऱ्या शिक्षिका सौ. कणिकदळे यांनी सांगितले, ‘आमची शाळा नर्सरी ते दहावीपर्यंत चालू झाली आहे. पण ठराविक अशी वेळ नाही. आम्ही व्हिडीओ करून त्याची लिंक पाठवतो पालकांना. त्यात होमवर्क आणि वर्कशीट्स आहेत. मुलं ती दिवसभरात कधीही बघू शकतात आणि त्याप्रमाणे अभ्यास करतात.’
ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांनी ऑनलाईन शिक्षणासाठी शेजारच्यांचे मोबाईल घेतले आहेत. काही ठिकाणी एकाच मोबाईलवर आलटून पालटून चारपाच जणं अभ्यास करताना दिसून येताहेत.
दादरला राहणाऱ्या सौ. कुडसकर म्हणाल्या की आधी थोडं कठीण गेलं ऑनलाईन शाळा, पण आता हळूहळू जमतंय. मुलं आवडीने करताहेत. पण सगळ्यांच्याच घरी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर नाही. मोबाईल असला तरी तो स्मार्ट फोन पालकांकडे असेलच असे नाही. नेटचा प्रॉब्लेम ही होतोच. आर्थिक परिस्थिती सगळ्यांची चांगली असेलच असे नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. दुसरं म्हणजे मुलं जरी ऑनलाईन शिकत असली तरी ते सोडून भलतंच काही ऑनलाईन बघताहेत का ह्यावर पालकांनी बारकाईने लक्ष ठेवणे अपेक्षित आहे. अर्थात मुलांच्या नजरेतून पाहिले तर तेही या आगंतुक परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
सतत मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप समोर बसून राहणे याचे मुलांवर दुष्परिणाम होणार आहेत. लॉकडाऊनमध्ये या सगळ्या बाबींचा विचार करायला हवाय. मुलांना येणाऱ्या अडचणी तर आहेतच, त्यांची मानसिकता जाणून घ्यायची तर या विषयावर एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल.
सांगली जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या आश्रमशाळेत मुख्याध्यापक असणारे बाळासाहेब लिंबिकाई सर सांगत होते की, आश्रमशाळेतील मुलं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणची असतात. सद्यस्थितीत निवासी शाळा सुरू होणं कठीण दिसतंय. काही मुलांचा संपर्क होणेही कठीण आहे. त्यांच्यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा विचारही करू शकत नाही. अशा मुलांना औपचारिक शिक्षण व पोषणासाठी शाळांवर अवलंबून रहावे लागते. ‘ऑनलाइन शिक्षण शैक्षणिक विषमतेला एकप्रकारे खतपाणी तर घालत नाही ना?’ असाही विचार मनात डोकावतो. काही पालकांचं काम बंद आहे. शिक्षणापेक्षा पोषणाचाच प्रश्न बिकट झालाय.
शिक्षणाचा विचार व्यापक दृष्टिकोनातून केला तर घरातील, परंपरागत व्यवसायातील, शेतातील वेगवेगळ्या कामांत केलेल्या मदतीतूनही शिक्षण घडतच असतं. त्यास अध्ययननिष्पत्तीमध्ये स्थान मिळायला हवं. उदा. घरकामात आईला भाजी चिरून देणे.
शैक्षणिक वर्ष हा एक व्यवस्थेचा भाग असतो. ते वाया गेलं म्हणून पालकांनी चिंता करण्याचं काहीच कारण नाही. घरी मुलांसाठी वेळ देणे, मुलांना गोष्टीची पुस्तके वाचून दाखवणे, मनमोकळ्या गप्पा मारणे, एकत्रित चित्रं काढणे, स्वयंपाक करणे, घर आवरणे अशा कितीतरी गोष्टी लहान मुलांसोबत करू शकतो. यामुळे बालवाडी, पहिलीत दाखल होणारी मुलं खरंतर मोकळा श्वास घेतील. त्यांच्या स्नायूंचा आवश्यक विकास, हस्तनेत्र समन्वय, तोंडीभाषेचा विकास होण्याअगोदर पालकांना शिकवण्याची घाईच लागलेली असते!
शाळा सध्या चालू होणार नाहीत. लॉकडाऊनमुळे मुलं हल्ली पूणर्पणे घरी असल्यामुळे पालक आणि शिक्षक या दोघांनाही प्रश्न पडलाय की मुलांसाठी नेमकं काय करायचं. त्यासाठी सांगली येथील ‘लुल्ला फौंडेशन’च्या सहकार्याने मग पालक आणि शिक्षकांसाठी ‘वाचू आनंदे’ हा ऑनलाईन कोर्सही चालू केला गेला. अलाहाबादपासून गोव्यापर्यंतच्या निरनिराळ्या क्षेत्रांतील लोकांनी या कोर्सचा लाभ घेतला.
पालकांच्या मनात दुविधा आहे, लॉकडाऊन संपल्यावर मुलांना शाळेत पाठवायचं की नाही. काही पालक अशा निर्णयाप्रत आलेत की सप्टेंबरनंतर शाळा सुरू झाल्या तर केवळ ५ महिन्यांसाठी शाळेची वारी कशाला करायला लावायची…त्यात आरोग्य सुरक्षा हा कळीचा मुद्दा आहे. पुस्तकं तर आधीच पैसे खर्च करून मागवली आहेत. आम्ही दोघेही त्याला घरी शिकवू शकतो. इतर काही मटेरियल लागेल ते हवं तर आम्ही घेऊ. त्यामुळे आम्ही होम स्कूलिंगचा पर्याय निवडला आहे. मुलाला डायरेक्ट पुढच्या वर्षी शाळेत पाठवणार.
अंधेरीतील उमा मेस्त्रींनी सांगितले की शाळा कधी सुरू होणार याची निश्चिती नाही. त्यामुळे यावर्षी शाळेचा विचारच डोक्यातून काढून टाकायचा. एक वर्ष फुकट गेलं तरी चालेल. उगाच मुलांसाठी रिस्क कशाला घ्यायची?
शाळा कधी चालू करायची, चालू झाल्यावर शाळेचे स्वरूप कसे असेल, काय नियमावली हवी, या बाबतीत अजून तरी पारदर्शकता किंवा वाच्यता नाही.
वर्षोनुवर्षे अखंड चालू असणारी ही शालेय शिक्षणाची वारी, यावर्षी मात्र करोनामुळे खंडित झाली. सर्व काही सुरळीत होऊन लवकरात लवकर ही ज्ञानार्जनाची वारी पुन्हा त्याच जोशाने, उत्साहाने, नवचैतन्याने सुरू व्हावी हीच मनोमन प्रार्थना !
© पूर्णिमा नार्वेकर
पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,
भिकाजी लाड मार्ग,
दहिसर फाटक जवळ,
दहिसर (प.),
मुंबई – 400068